Skip to main content

श्रीकृष्णनीती भाग १८

श्रीकृष्णनीती भाग १८ 
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

अश्वत्थामाच्या स्वभावातील पाशवीपणा, जो त्याने रण भूमीवर काही प्रमाणात दाखवला अवेळी नारायणास्त्र वापरून, तो बहुदा त्याच्या लहानपणच्या गरिबी आणि अपमानकारक वागणुकीमध्ये असावा. कारण लहानपणी इतर मुलं दूध पिऊन यायची, त्यावेळी माता कृपी, त्याला पाण्यात पीठ कालवून हेच दूध आहे म्हणून द्यायची. परंतु खरी परिस्थिती समजल्यावर त्याला आपल्या आईची अगतिकता आणि वडिलांचा नाईलाज समजला. त्याच्या वर त्या परिस्थितीत, एकूणच नियतीचा , परिस्थितीचा आणि द्रुपद दरबारात द्रोणांच्या झालेल्या अपमानाचा खोलवर परिणाम झाला असावा. त्याकारणाने त्याचा स्वभाव टोकाचा झाला असेल. हिटलर सारख्या अनेक हुकूमशहांच्या वागण्यात आलेली क्रूरता,त्यांच्या बाल पणीच्या काळात पहाव्या आणि सोसाव्या लागलेल्या हाल अपेष्टा किंवा मिळालेल्या विचित्र वागणूक यांमध्ये असतं. अर्थात त्याने यांच्या वागणुकीचं समर्थन होऊ शकत नाही, पण विश्लेषण जरूर करता येईल.असो. 

याविरुद्ध स्थिती हस्तिनापूरला आल्यावर झाली. तिथे वास्तविक भीष्मांच्या कृपेने,पण सकृतदर्शनी धृतराष्ट्रांच्या कृपेने, सर्व साध्य झालं. दुःख दैन्य दूर झालं. परंतु त्याचा सरळसरळ संबंध सत्ताधीशांशी हातमिळवणी व त्यांची पाठराखण यात परिवर्तित झाली.म्हणजेच जर दुर्यो धनाची मर्जी राखली की अगदी पितामह भीष्म यांची सुद्धा तमा बाळगायचं कारण नाही हे दोघांनी चांगलं हेरलं होतं. ते दोन म्हणजे, एक कर्ण आणि दुसरा अश्वत्थामा. कदाचित चोराचं मन चोराला माहीत या न्यायाने शकुनी या दोघांचा हा स्वभाव ओळखून असावा. म्हणूनच तो या दोघांनाही फार किंमत देत नव्हता. किंबहुना पाण्यात पाहात होता. 

अश्वत्थामाच्या आक्रमक स्वभावाला पाशवीपणाचा असलेला आधार हा विनाशाला कारणीभूत होतोच. कारण कर्णाप्रमाणे अश्वत्थामा हा सुद्धा अभिमन्यूच्या हत्येत तितकाच सहभागी होता. हा एक राग त्याच्यावर होता. परंतु त्याने युद्धाच्या शेवटच्या दिवशी दुर्योधन जायबंदी झाल्यानंतर दुर्योधनाच्या आदेशाने, सेनापती पद स्वीकारून, मरणोन्मुख दुर्योधनाला आश्वस्त केलं की तो पांडवांचा वध करून, या सर्वाचा प्रतिशोध घेऊनच परत येईल. हा कौरवांचा शेवटचा सेनापती. कौरवांकडे त्यावेळी तीनच जण शिल्लक होते. अश्वत्थामा कृपाचार्य आणि कृतवर्मा.

त्याने या दोघांना हाताशी घेऊन पांडवांच्या शिबिरावर चाल केली. मुळात त्यावेळी दुर्योधन जायबंदी झाला होता आणि वेळ रात्रीची होती. नियमाप्रमाणे युद्ध समाप्त झालं होतं.तरीही अश्वत्थामा निश्चय करून,शिबिरावर आक्रमण करून आला. त्याने सर्वप्रथम द्रुपद पुत्र आणि पांडवांचा अपराजित सेनापती द्रष्टद्युम्न, याला तलवारीने झोपेतच ठार केलं आणि आपला मोर्चा पांडव निजले होते त्या तंबू कडे वळवला. पाचही भावांना यमसदनी पाठवून आणि आपल्याला अडवायला आलेल्या पांडवांच्या सैनिकांना संपवून तो पुनः दुर्योधनाकडे आला. परंतु तोपर्यंत दुर्योधन इहलोकीची यात्रा संपवून यमलोकी पोचता झाला होता. 

अश्वत्थामा आपल्या हातुन घडलेल्या कृत्याची कबुली द्यायला व्यासमहर्षींकडे आला. त्यांना सर्व सांगताच त्यांनी अंतर्ज्ञानाने त्याला हे सांगितले की त्याने पांडव समजून ज्या पाच जणांना मारलं, ते पाच द्रौपदी पुत्र होते. परंतु थोड्याच क्षणापूर्वी पश्चातापदग्ध अश्वत्थामा,खजील झाला आणि चडफडला. यात त्यांच्यातील पाशवीवृत्ती पूर्णपणे प्रकट होते आणि पश्चात्ताप भाव किती खोटे होते, हे लक्षात येतं. या घडीपर्यंत पांडव श्रीकृष्णाला घेऊन तिथे पाचले. कारण त्यांना सर्व प्रकार, त्याचा कर्ता आणि त्याचं ठिकाण कळलं होतं.

पांडवांना पाहून त्याने त्वरित ब्रम्हास्त्र काढलं.ते पाहून श्रीकृष्णाने अर्जुनाला देखील ब्रम्हास्त्राने त्याला उत्तर द्यायला सांगितलं. परंतु आपल्या योगसामर्थ्याने व्यासांनी ती दोन्ही अस्त्र अडवून, परत घेण्याची आज्ञा दोघांनाही केली. अर्जुनाने त्वरित आज्ञापालन करून अस्त्र परत घेतलं. अश्वत्थामा म्हणाला मला अस्त्र परत घेता येत नाही, पण मी अस्त्राची दिशा बदलतो. असं म्हणून क्षणात त्याने अस्त्राला, पांडवांना निर्वंश करण्याच्या उद्देशाने, उत्तरेच्या गर्भाची दिशा दिली. म्हणजे या क्षणीही त्याच्या तील पाशवीपण तसूभर सुद्धा कमी झालेलं नव्हतं. 

अर्थात श्रीकृष्णांनी योगशक्तीने त्या बालकाला पुनः जीवित केले. पण गर्भातल्या बालकाला मारण्याइतकी पाशवी वृत्ती कंसाकडेही नव्हती आणि म्हणून बाळ जन्माला येईपर्यंत थांबून तो मारत असे. इतकी नीच वृत्ती असलेल्या अश्वत्थामाला खर तर तितकच क्रूर शासन होणं क्रमप्राप्त होतं. पण त्याचा मृत्यू हा त्याच्या सुटकेचा मार्ग ठरला असता. म्हणून श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या कपाळावरील मणी,काढुन घेण्यास सांगितले आणि अश्वत्थामाला शाप दिला की साडेतीन हजार वर्षे पर्यंत तू या जखमेचा दाह सहन करत जीवित राहशील. 

कदाचित इतक्या अधमवृत्तीच्या अश्वत्थामाला याहून श्रेष्ठ शासन अन्य काही ठरलं नसतं. म्हणून अशी वदंता आहे की, आजही अश्वत्थामा जीवित असल्याचे, प्रमाण वा दृष्टांत काही जणांना मिळतो.माझ्यामते हे शासन सर्वोत्तम आहे. जेणेकरून त्याला त्याच्या प्रमादांचं परिमार्जन न करता येऊन फक्त पश्चाताप होत राहील आणि अन्य काही उपाय नसेल. 

हीच श्रीकृष्णानिती, हाच योग्य न्याय, कल्पांतापर्यंत भोग. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
२०/०५/२०२०
भाग अष्टदश समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री ॐ

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...