अध्यात्म विराम १०१
आध्यात्म विराम या लेखमालेने काल शंभर सलग दिवस आणि शंभर लेख पूर्ण केले, ही महाराजांची असीम कृपा आहे आणि वाचक सहयोग याचं उत्तम उदाहरण आहे).
आपण सख्य भक्तिच्या विवेचनातील पायरीवर आहोत. कालच्या विषयात आज पुढे जाऊ.
देहाचं हित ते खरं हित आणि देहाची क्षती ही खरी दु:स्थिती, हा एक मर्यादित अर्थ आपण अज्ञानातून जाणतो. पण हे अज्ञान अर्ध ज्ञान आहे, हे आपल्याला उमगत नाही. याचं महत्वाचं कारण आहे, आपल्याला ईश्वराने दिलेली मर्यादित स्मरण शक्ती. अर्थात हे वादातीत सत्य आहे की, ही मर्यादा सर्वानाच सम प्रमाणात लागू होते.ही मर्यादा देहाच्या त्रिमिती आणि त्रिकाल या अवस्थे मुळे आहे. कारण या तीन काला वस्थेतील आपण भूत आणि वर्तमान या दोनच स्थिती अनुभवतो आणि जाणतो.
ते आणि तितकंच जाणण्याची क्षमता हा देहाची मर्यादा आहे. पण मन आणि आत्मा यांची शक्ती आणि क्षमता अमर्याद आहे. विश्वाची पालनकर्ता शक्ती, त्याही अमर्याद या मिती पलीकडे आहे. पण मग या विश्व शक्तीला जाणण्याची काही सोय किंवा मार्ग नाही का. तर याचं उत्तर आहे, हो तसा मार्ग उपलब्ध आहे. त्या मार्गांना अनेक नावं, संज्ञा आहेत. त्यांना नवविधा भक्ती, अष्टांग योग अशी अनेक नावीन्यपूर्ण नावं देऊन,ईश्वराने आपल्या प्रतिनिधी मार्फत त्या मार्गांचं प्रात्यक्षिक, प्रयोग, प्रचिती आणि प्रमाण जगताला दाखवून दिलं.
ही सप्रमाण प्रचिती देणारे, ईश्वरी प्रतिनिधी, प्रारंभिक काळात सप्त ऋषी, ब्रम्हदेवाचे मानसपुत्र रुपात या भूतलावर अवतरले. प्रत्यक्ष ब्रम्हदेव हे श्रीमान नारायण यांच्या नाभीकमलातून प्रकट झालेले. त्यामुळे हे ईश्वर प्रतिनिधी एकप्रकारे श्री नारायणाचे अर्थात परम पित्याचे प्रतिनिधीच होते. त्यांनी घालून देलेले आदर्श, फक्त त्यांनी स्वतः पर्यंत मर्यादित न ठेवता ते ज्ञान,त्याचं प्रत्यक्ष प्रमाण घालून देऊन, ते पुढे चालू राहण्यासाठी,सामान्य माणसा तून अनेक असामान्य भक्त जन तयार करवून, ही भक्ती परंपरा, युगानयुगे सहजरीत्या सुरूच ठेवली.
कदाचित कलियुगातील काळाचा फेरा आणि त्यामुळे बदलू शकणारी, सांस्कृतिक परंपरा व जीवनशैली, यांचा दूरगामी माग व परिणाम, त्रिकालदर्शी जगत जनकाने कित्येक शतके आधीच जाणून,भक्तीची सामुदायिक, श्रवण, कीर्तन इत्यादी भक्तिमार्ग एकत्रित गुंफणारी, द्वैतातून अद्वैत योग साधणारी, वारकरी संप्रदायासारखी अद्वितीय परंपरा जन्माला घातली.
त्यासाठी पुंडलिक, पांडुरंग ही प्रतीकं आणि या परंपरेला जीवापाड जपणारे संत ज्ञानेश्वर माऊली ते संत तुकाराम महाराज हे अद्वैत प्रतिनिधी निर्माण करून, भक्तीची अजोड, सर्वसमावेशक, अद्वितीय परंपरा जागृत राहील, याची काळजी त्याच विधात्याने घेतली. याच विषयाला पुढे नेत, सख्य भक्तीची ओळख करून घेऊ आणि त्यातून अज्ञान, अर्ध ज्ञान व पूर्ण ज्ञान यावर उद्या चिंतन पुढे नेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment