अध्यात्म विराम ९७
प्रत्येक गोष्टीचे आपल्याला संकेत मिळतात असं माझं मत आहे. कदाचित हे शंभर टक्के सत्य नसेल तरीही अनेक घटनांमध्ये आपल्याला विधी, आधी संकेत किंवा पूर्वकल्पना देत असतो, असं मला वाटतं. कारण मुळातच हा देह, संकेत व संदेश प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवण्यात आलेलं एक खास यंत्र आहे आणि त्यामधे इंद्रिये आणि इतर सर्व स्वयंचलित व्यवस्था विधात्याने निर्माण केलेली आहे. शास्त्रीय परिभाषेत सांगायचं तर, आपण लहरी केंद्र आहोत, प्रसारित करणारी आणि प्राप्त करणारी. हा विषय थोडा सविस्तर, नंतर घेऊ.
कालच्या विषयात पुढे जाऊ. आपल्या हिताची गोष्ट पाहणारा हा आयुष्यात सर्वात जवळ असावा लागतो किंवा तसा तो मनाने सर्वात जवळ असतो देखील. आता इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की, खरं हित कशात आहे किंवा खरं हित कोणतं. जे हित अंतिमतः आनंद देते आणि अंतिम सुखाच्या मार्गावर जीवाला घेऊन जाते, ते खरं हित, हे नक्की. जीवनात विचार केला तर, ज्यामुळे खरं सुख, समृद्धी आणि समाधान मिळतं, ते आपल खरं हित आहे.
ते हित जपणारा, जाणणारा, कळणारा, समजून घेणारा व त्यानुसार आपल्याला सल्ला देणारा असतो, तोच खरा हितेशी.म्हणजेच एखादा बद्सल्ला देणारा व असा सल्ला तात्पुरतं सुख दाखवणारा असला तरीही, अंती तो सल्ला अहिताचा व त्रासदायक ठरतो.म्हणजे मग अश्या व्यक्तीला हितेशि म्हणता येणार नाही. आता आपल्या एकूण जीवनाचा विचार केला तर, आपल्याला स्वतःच्या कर्माने आलेले भोग,दुःख,दैन्य हे टाळण्यासाठी मिळालेले चुकीचे सल्ले किंवा मार्ग हे अंतिमतः अहितकारक ठरतात.
कारण आपल्याला, जे आज टाळता आलय, ते उद्या पुन्हा केंव्हातरी समोर येऊन, भोगावं लागणार आहेच. कारण याबाबत प्रापंचिक सांसारिक आणि अध्यात्मिक दोन्ही मार्गीचं एकमत आहेत. हे वादातीत सत्य आहे. मग ते नंतर, या जन्मात असेल किंवा पुढील पैकी कोणत्याही जन्मात असू शकेल, पण भोगूनच संपवावं लागतं.
अशी परिस्थिती असताना, आपण, आपल्याला काही काही भोग काळात, दुःखाच्या काळात सहाय्य न केलेल्या किंवा आपल्या समजुती प्रमाणे, धावून न आलेल्या ईश्वराला किंवा सद्गुरुना दोष देऊ की उलट त्यांचे आभार मानू, याचा विचार आपणच केला पाहिजे.
म्हणजे खरा हितदर्शी, खरा पथदर्शी तोच आहे, जो अंतिम सुखासाठी, अंतिम आनंदासाठी आपल्याला योग्य मार्गावर नेतो. तोच खरा सखा आहे आणि त्याचाच आपण विचार केला पाहिजे.
या सखा विषयाचा आणि त्या अनुषंगाने, भक्ती मार्गा तील पुढील भक्तीचा विचार आपण पुढच्या लेखात करूया. तोपर्यंत त्या हीतदर्शी ईश्वराच्या स्मरणात मनाला गुंगवून टाकण्याचा प्रयत्न करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment