भोग आणि ईश्वर १८०
मी अश्या प्रकारची माणसं पाहिली आहेत, किंवा आपल्यालासुद्धा अश्या माणसांचा अनुभव आला असेल, जी सदोदित नकारात्मक भाव धरूनच असतात किंवा बोलतात. कदाचित कृती सकारात्मक करत असतील आणि त्यांच्या इच्छासुद्धा सकारात्मकच असतील, पण विचार अथवा मन सतत नकारत्मक असतं किंवा वाचेने नेहमी नकारात्मकच बोलतात. खरतर हा अश्या माणसांचा दोष आहे कि नाही हे पूर्णतः कळत नाही. परंतु यांच्या संपर्कात येणारी माणसं अश्या लोकांना एका ठराविक काळानंतर टाळण्याचा प्रयत्न करतात.
मुळात अशी माणसं नकारात्मक का बोलतात वा विचार करतात त्यावर आधी चर्चा करूया. याची बीजं आदल्या जन्मात असू शकतात किंवा यांच्या लहानपणीच्या वातावरणात. अर्थात असं वातावरणात जन्माला येणं किंवा लहानपणी असं वातावरण आजूबाजूला असण्यात, यांचा या जन्मीचा काही दोष असेल हे संभवत नाही. कारण कळायला आणि समज येऊन, आपल्या मनाप्रमाणे वागायला किंवा विचार करायला लागायच्या आतच ही माणसं अश्या वातावरणात वाढतात की, त्यांची मानसिक अवस्था नकारात्मक होण्यात या गोष्टीचा मोठा हातभार असतो.
कदाचित अशी माणसं वृत्तीने चांगली असतीलही किंवा मनात काही पाप असेल अश्यातला भाग नसेलही. परंतु प्रथम विचार करताना यांना नकारात्मक विचार पटकन सुचतात आणि ते न बोलण्याची वा नियंत्रण करण्याची बुद्धी यांच्यापाशी नसते. किंवा जी असते, त्यात न बोलणं यांना जमत नाही अथवा सुचत नाही. म्हणून हे आपल्या मनातील बोलून मोकळे होतात. पुढे यांचं काही नकारात्मक कृती करण्याचा विचारही नसतो. यातील बरेच जण हे चांगल्या मनाचे असू शकतात. पण यांच्या मनात, तत्क्षणी जो विचार येतो सर्वप्रथम विचार येतो, तो नकारात्मक बाजू सांगणारा असतो.
आपण लगेच अश्यावेळी अश्या लोकांच्या मताशी भिन्नता दर्शवून यांना सकारात्मक विचार करायला भाग पडतो, वाद घालतो, किन्वा बोलणं टाळतो किंवा सोडून देतो आणि पुढे जातो. कदाचित आपल्यापुरतं ते योग्य असेल. परंतु अश्या लोकांची मानसिकता, त्यांना सर्वात प्रथम नकाराचा विचार करायला लावते, ज्यामुळे यांना सतत वा अनेक गोष्टीत दीर्घ प्रतीक्षा करत यश वा योग्य मार्ग प्राप्ती होते. अश्या लोकांच्या अश्या मानसिकतेची कारणं हि त्यांच्या गत जन्मातील कर्म अथवा विचार यांमध्ये असू शकतात वा असतात. आपल्याकडे अशी म्हण आहे कि अन्ते मती सा गती. अर्थात मृत्यूसमयी जशी मती बुद्धी व विचार असतील त्यानुसार पुढील जन्म म्हणजे देह अर्थात मानसिकता सुद्धा प्राप्त होते. जी त्यांना त्रास देऊ शकते, जर त्यांच्या आधीच्या जन्मात मृत्यूसमयी विचार, बुद्धी हि नकारात्मक असेल तर.
म्हणजे मुळात हि वृत्ती त्यांना प्रारब्धात अथवा संचितात आलेली असते. ज्याचा परामर्श आपल्याला संचित किंवा प्रारब्ध यातील देणी अथवा घेणी याप्रमाणे करावा लागेल. सकृतदर्शनी असं आपण समजूया कि, बाकी वृत्तीने किंवा मनाने हे नकारात्मक वा वाईट नसतात. परंतु आधीच्या जन्मातील काही इच्छा, आकांशा, फलद्रुप न झाल्यामुळे त्या जन्माच्या शेवटात आलेली निराशा, यांना या जन्मात वारसाने मिळते. म्हणून अश्या लोकांशी बोलताना आपण स्वतः या गोष्टीचा विचार करायला हवा कि, मुळात हि लोकं कशी आहेत. जर बाकी वृत्तीने आणि विचारांनी हि सदवर्तनी किंवा योग्य असतील, तर आपण यांच्या या मानसिकतेचा आपल्यापुरता सकारात्मक विचार करूया. म्हणजेच आपल्या एखाद्या कार्यासंबंधी किंवा उद्देशासंबंधी किंवा प्रकल्पासंबंधी, जर हे लोकं बोलत असतील तर आपण त्यातून सावधानता स्वीकारून, आपल्या कार्याच्या अमलबजावणीबद्दल जागरून राहू. म्हणजे आपल्यापुरता प्रश्न संपला आणि यांच्या मनातील सूचक संदेशाचा आपल्याला सकारात्मक उपयोग झाला.
आता प्रश्न उरतो तो या लोकांच्या वृत्तीचा अथवा पटकन नकारात्मक बाजू बोलण्याचा, तर, याबाबत आपण जर त्यांना सांगण्याच्या अधिकारात असू, तर आपण यांना सांगू शकतो कि, जर असा काही विचार बोलण्याची वा विचार करण्याची वेळ आली, कि सर्वात प्रथम काही क्षण ध्यान धर अथवा तुझ्या इच्छित आदर्शाचं किंवा देवतेचं अथवा सद्गुरूंचं स्मरण कर. जर सद्गुरू नसतील तर कुलदेवतेचं स्मरण कर त्यानंतरच जो विचार करायचा किंवा बोलायचा असेल तो बोलून दाखवावा. यात दोन फायदे आहेत. एक म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम नकारात्मक ऐकायची वेळ येणार नाही आणि सर्वात महत्वाचं या लोकांना विचार करून मगच कृती आणि बोलणं करण्याची सवय लागू शकेल.
आपण आपल्या मनातील नकारात्मकता आणि तत्सम विचार, ज्याप्रमाणे झटकून टाकून, सकारात्मक बाजूचा विचार करतो किंवा धोके लक्षात घेऊन पुढील कृती करतो, त्याप्रकरची सवय या लोकांना लागू शकते. जर अश्या काही सूचना त्यांना करण्याचा अधिकार आपल्याकडे नसेलच, तर त्यांच्या बोलण्यातील धोके लक्षात घेऊन, त्यातील आपल्या उपयोगाचे असतील, तेवढे ध्यानात धरून, बाकी विचार व बोलणं सोडून देणं इष्ट.
उद्या अजून चिंतन करूया तोपर्यंत नाम घेतच रहा , अनेक तर्कांचं प्रश्नाचं आणि चुकीच्या विचारांचं उत्तर त्यातूनच मिळेल.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा. आता पहिल्या आवृत्तीच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment