Skip to main content

भोग आणि ईश्वर १६२

भोग आणि ईश्वर  १६२

काल आपण सद्यस्थितीसारखी स्थिती कशामुळे उद्धभवते याचा परामर्श दोन भागात घेतला. मुळात हि नकारात्मकता सामूहिक नसून अनेक प्रकारच्या नकारात्मकता एकत्रित आल्यामुळे उध्दभवलेली परिस्थिती आहे. संहारक वा विध्वंसक मानसिकता ही असुरी प्रेरणा प्राप्त झाल्यामुळे आणि असुरी वा नीच प्रकारच्या वासनेचा उगम व वृद्धी होत जाऊन त्यात इतरांना सामील करून मग ती सामूहिक असुरी प्रेरणा वा शक्ती तयार होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत वा राजकीय किंवा  इतर महत्वाकांक्षेपोटी सदर व्यक्ती आपली इच्छाशक्ती दृढ करून त्या इच्छाशक्तीच्या बळावर अनेकांना प्रेरित करून किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वागायला लावून आपल्या विध्वंसक कार्यात सामील करून घेते. 

अश्या सामूहिक उत्पात वा विध्वंस घडवणाऱ्या घटनांमागे कार्यरत असलेली शक्ती असुरी आणि महत्वाकांक्षी प्रेरणेने स्वतःसह संपूर्ण जगताचा विनाश घडवण्यास मागेपुढे पहात नाही. अर्थात एक नक्की या जगतात आजमितीस जिक्ती युगं होऊन गेली त्या सर्व युगात सर्व काळ सूर आणि असुर शक्ती आपलं स्थान टिकवून होत्या. कालांतराने सूर शक्ती या क्षीण होत आहेत असे वाटत असताना परमेश्वरी प्रेरणेने त्या त्या युगात सात्विक, ईश्वरी शक्तींनी सकारात्मक व सात्विक शक्तींच्या पाठीशी राहून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केलाच आहे. 

या कार्यात दैवी प्रेरणेने अनेकांनी हातभार लावून अंती असुरी शक्तींना परास्त केलंच. मतितार्थ काहीही असला तरीही सात्विक व सकारात्मक शक्तींना प्रत्येक युगात सत्व परीक्षेतून जावंच लागलं आणि लागणार. यात व्यक्तिगत पातळीवर अनेक जण क्षतिग्रस्त होऊन लयाला पावले. परंतु हा प्रत्येकाच्या प्रारब्धात असलेल्या योग व भोग याअनुसार घडलं आणि घडणार. म्हणजेच ज्याच्या प्रारब्धात अश्या कार्यकाळात कठीण परीक्षेतून जाणं पूर्वकर्मानुसार लिहिलं गेलं आहे, त्यांना यातून जावंच लागणार. त्यांचं या काळात काहीही चूक नसताना भोग भोगून, निघून जाणं हे नक्कीच दुर्दैवी आहे. परंतु यात एक गोष्ट स्पष्ट होते कि, त्यांना त्या भोगाद्वारे त्यांच्या कर्मफलातून मुक्तता होऊन पुढील मार्ग वा जन्म सुकर आणि संपन्न झाला.  कारण त्यांनी भोग भोगून मगच यातून त्या देहातून आपली सुटका करून घेतली. किंवा विधात्याने त्यांना अश्या काळात भोग भोगायला लावून एकप्रकारे त्यांच्या संचितातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. 

याची दुसरी बाजू म्हणजे ज्यांना यातून जावं लागत नाही वा लागलं नाही, ते पुण्यवान तरी म्हटले पाहिजेत किंवा सदर धोकादायक व अनिष्ट काळात त्यांना टिकवून त्यांना त्यांच्या प्रारब्धात शिल्लक असलेले कर्मफल भोगायची वा उपभोगायची अजून संधी प्रदान केली आहे. एकप्रकारे हे भाग्य आहे कि, अश्या काळात ते तगले , जगले आणि पूर्वसंचितातील पुण्यकर्माने पुन्हा आयुष्यात पुढे जाण्यास सिद्ध झाले. परंतु यातून दोन निष्कर्ष निघतात. ते असे कि, त्यांच्या संचितात पुण्यकर्म शिल्लक आहे ज्याच्या फलानुसार त्यांना अश्या अनिष्ट काळात ईश्वराने सुखरूप ठेवले. 

म्हणजेच अश्या काळात त्यांनी आपल्या संचितातील पुण्यकर्मांचा वापर करून सुरक्षा प्राप्त केली. म्हणजेच अश्या काळात वा त्यानंतर आपली जबाबदारी व्यक्तिगत पातळीवर जास्त वाढते. कारण सदर काळात खर्ची झालेलं पूर्वसंचितातील पुण्यकर्माची झालेली झीज भरून काढण्यासाठी सकारात्मकता, सतशीलता, सात्त्विकता वाढवून आपल्या संचिताला पुन्हा बेरजेत परिवर्तित करणं हे सर्वात महत्वाचं कार्य, अश्या काळातच हाती घेतलं पाहिजे. 
 या सर्वात आपल्या सद्गुरुकृपेचा लाभ हा अवर्णनीय आनंद आहे. कारण नुसतं व्यक्तिगत पुण्यकर्म हे सर्वसामान्य काळात उपयोगी होऊ शकतं . पण अश्या विपरीत व अनिष्ट काळात सुखरूप व सुरक्षित राहणं किंवा संकटात वा विपत्तीत अडकून पुन्हा बाहेर येणं हे सद्गुरुकृपेचा परिणाम आहे वा असतो हे मात्र नक्कीच. 

मुळात सद्गुरू हे एक प्रकारे छत्र वा छत्री किंवा कवच आहे ज्याच्या आधारे किंवा ज्यामुळे अश्या अनिष्ट किंवा सार्वत्रिक संकट काळात आपलं अस्तित्व सुरक्षित राहू शकतं . अर्थात याचा अर्थ असा नाही कि, जे या काळात निघून गेले त्यांना कोणत्याही सद्गुरुकृपेचा लाभ झाला नाही. किंबहुना त्यांना भोग संपवून पुन्हा नवीन जन्मात पुढे जाण्याची संधी देऊन कदाचित संर्व कर्मफल गणित बेरजेत आणण्याची आधी मिळाली. कारण आपण फक्त एका जन्माचं गणित वा अस्तित्व मोजू वा पाहू शकतो. सद्गुरू हे अनेक जन्मांच्या गणिताकडे पाहून योग्य व अयोग्य याचा निर्णय घेत असल्याने त्यांना प्रत्येक साधकाच्या आत्मबलाचा व भलंबुरं कशात आहे याची जण असते. म्हणून जे घडेल ते त्यांच्या कृपेने योग्य तेच घडेल. कारण हा देह आणि पुढील जन्मातील अनेक देह यांची त्यांनाच जाण असते. 

अजूनही हा विषय अपूर्ण असल्यामुळे उद्या हाच विषय पुढे चालू ठेवू. आज इथेच थांबू.  

नामात रहा, साधनेत रहा, सद्गुरू प्रेरणेचा महिमा अगाध आहे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील रहा .     

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...