भोग आणि ईश्वर १५५
कालच्या लेखावरून काही जणांनी प्रश्न केला की आम्ही बरेच जप वा स्तोत्र , मंत्र इत्यादी करतो, मग त्याचा काय परिणाम होत असेल. आज यावर विचार करू. आपण थोडे मागे जाऊ. ज्ञानोबा माऊलीपासून आतापर्यंतच्या सर्व संतांनी एकाच देवतेची वा देवीची वा सगुणरूपाची निस्सीम भक्ती करून संतपद प्राप्त केलं. प्रत्येकाने आपल्या मनात एकाच ईश्वराची मूर्त स्थापित करून, त्याच स्वरूपाला आपल्या भक्तीचं सर्वस्व अर्पण केलं.
या गोष्टीचा आपण कधी विचार करतो का की, संत रामदास स्वामींसारख्या महान संतांनी तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या रुपात सुद्धा प्रभू श्रीराम पाहिले आणि विचारलं की, इथे का रे उभा श्रीरामा. संत मीराबाई यांनी कृष्णभक्ती करून सर्वत्र कृष्णच पाहिला, नव्हे सर्व ब्रह्मांड कृष्णमय पाहिलं, संत कबीर व संत तुलसीदास यांनी श्रीराम सर्वत्र पाहिले, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, या सर्वांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला सर्वस्व अर्पण करून भक्ती केली.
या सर्वांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराने हाच संकेत दिला आहे की, एकाच स्वरूपाला रुपाला नामाला सर्वस्व अर्पण करा म्हणजेच हित साधता येईल. अनेकात एक पहा आणि तेच ध्यान मनात योजून साधना करा, नित्य करा, पण एकाग्र होऊन करा. यात शास्त्रीय आणि आध्यात्मिक दोन्ही कारणं लपलेली आहेत, त्या दोन्हींचा शोध घेऊ. अध्यात्मिक दृष्टीने आधी विचार करूया. आत्मतत्त्व अर्थात सर्व देही विराजित आत्मा हा एकाच ईश्वरी अंशातून आला आहे आणि पंचमहा भूतरुप देहातून स्वनिर्मितीच्या ईश्वर प्रणित नियमाने विस्तारत गेला.
म्हणजे जशी देहांची संख्या वाढत गेली तसा त्या आत्म तत्वाचा विस्तार होत गेला. ईश्वराने यात कधीही ढवळाढवळ केली नाही किंवा कोणताही अडथळा निर्माण केला नाही. कारण एकच, आपण निर्माण केलेल्या विधीचं आणि नियमांचं आपणच उल्लंघन करता कामा नये हे ब्रीद आणि हा आदर्श जपण्यासाठी. प्रसंगी वेगळं रूप वा देह धारण करून व त्या देहाचे सर्व नियम पाळून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आत्म्यांना शासन करून आपलंच ब्रीद व नियम राखले.
या नियमांत राहून, पण अज्ञानामुळे आपलं स्वत्व गमावलेल्या आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग माहीत नसलेल्या वा विसरलेल्या अज्ञ जीवांना अनेक संत महंत, ऋषीमुनी महान विभूती यांचं रूप घेऊन, पुन्हा पुन्हा येऊन, एकच तत्व परत परत सांगण्याचा प्रयत्न केला की, एकच नाम एकच साधना एकचित्ताने करा, पारमार्थिक नियमांत राहून सांसारिक रहा कर्मरत रहा, मोहात गुंतू नका, भोगांना टाळू नका, त्यामुळे घाबरू सुद्धा नका, सुख आणि दुःख दोन्ही तात्पुरतं आहे दुःख आलं तर खचू नका, ते जाईल आणि सुख आलंय तर उन्माद करू नका, तेदेखील तात्पुरतं आहे.
यासर्वात ईश्वर आराधना श्रेष्ठ माना, दुःखात आणि सुखात दोन्हीमध्ये साधन व नाम सोडू नका, त्यानेच कार्यसिद्धी होईल. पण त्यासाठी लागणारा वेळ व कर्मफलाचं गणित यांना लक्षात ठेवा. हे सर्व आपल्या ध्यानात तात्पुरतं राहातं हे माहीत असल्यामुळे, प्रत्येक युगात, शतकात काळात अनेकानेक विभूतीरुपात प्रकट होऊन एकाच तत्वाला अनेका नेक वेळा सिद्ध केलं. उद्देश हा की कोणत्याही शक्तीरुपाला प्राप्त करण्यासाठी, त्या शक्तीचं रुपाचं स्मरण करून त्या त्या शक्तीचा लाभ प्राप्त करून अंती मोक्षाचं लक्ष ठेवा. म्हणजे त्याचं स्मरण आणि भोगांचं विस्मरण दोन्ही साधता येईल.
विषय थोडा मोठा आहे त्यामुळे उद्या हाच विषय पुढे नेऊया. नाम मात्र घेत रहा, साधनेचा लाभ अमूल्य आहे, न जाणता सुद्धा नाम घेत रहा. कारण तुम्हाला जरी माहीत नाही नाम पवित्र आहे, तरी नामकर्त्याला माहीत आहे की त्याचं कार्य काय आहे. म्हणून नाम घेत रहा.
अजूनही ज्यांना भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment