भोग आणि ईश्वर १८१
काल आपण पाहिलं की सकृतदर्शनी नकारात्मक भाव प्रकट करणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्यातील सुधारणेसाठी उपाय काय केला जावा, त्याबद्दल. आज आपण याविरुद्ध विचार, स्वभाव, वृत्ती आणि कृती असलेल्या लोकांबद्दल विचार करूया आणि काही शिकता येईल का याचा विचार करू. अर्थातच काही लोक नेहमी सकारात्मक वृत्तीचे असतात, कोणत्याही प्रसंगात, आपत्तीत, विपत्तीत ज्यांचा तोल कधीच ढळत नाही, ज्यांना पाहून वा ज्यांच्याशी बोलून आपल्यालासुद्धा सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
अश्या व्यक्तींच्या भोवती नेहमी एक सकारात्मकतेचं वलय असतं. ज्याचा लाभ त्यांना तर होतोच, पण त्यांच्या संपर्कात येणाऱ्या, प्रत्येक व्यक्तीला होतो. यांना आपल्या बोलण्याने, वागण्याने किंवा नुसत्या अस्तित्वाने सर्वांना उत्तम मानसिकतेचा लाभ देता येतो. अनेक संकटं, समस्या, प्रश्न, अडचणी यांच्यासमोर आल्या तरी, यांच्या विचारात काडीचा सुद्धा फरक पडत नाही. म्हणजे यांची वृत्ती वा मती तसुभर सुद्धा बदलत नाही.
या व्यक्तींना अश्या व्यक्तित्वाचा लाभ अर्थातच आधीच्या जन्मातील, त्यांच्या उत्तम कर्माचं फलस्वरुप म्हणून बहुतेक वेळा जन्मतः प्राप्त झालेलं असतं. म्हणूनच प्रत्येक प्राप्त जन्मात, प्रत्येक कर्म हे उत्तमच करावं, विचार उत्तमच असावेत आणि सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असावं. अशी मानसिकता दीर्घकाळासाठी लाभणं, अशी मानसिकता लाभल्यानंतर ती तशी टिकवून ठेवणं, यासाठी काही गोष्टी आपल्याला नेहमी करत राहणं गरजेचं आहे.
यात सर्वात महत्वाचं म्हणजे काहीही घडो, काहीही कानावर येवो, काहीही दृश्य समोर येवो, आपण दृढतेने सकारात्मक मानसिकतेचाच विचार करूया आणि हा निश्चय दृढपणे अवलंबण्यासाठी आपण सतत आपल्या मनाला समजावलं पाहिजे की प्रत्येक क्षण हा जगण्याचा नवीन मंत्र घेऊन जन्माला येतो. अर्थातच या प्रत्येक क्षणाला, आपण मनाचा ताजेपणा व उत्साह टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.
प्रत्येक क्षणी आपण आपल्या नामाला, साधनेला सांभाळ ण्याचा विचार, जर सतत करत गेलो, तर आपण इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही आणि मनावर देखील कोणत्याही घटनेचा, कोणाच्याही नकारात्मक वा तिखट अथवा मनावर आघात करणाऱ्या कोणत्याही बोलण्याचा, वाक्याचा अथवा शब्दाचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या ज्यावेळी अश्या प्रसंगातून किंवा एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात आपण येऊ अथवा असू, त्या त्यावेळेस हा मनाचा दृढ निश्चय आपण आपल्याच मनाला सतत आठवण करून, त्यावर बिंबवणं महत्वाचं आहे.
कारण तरच हा दृढ निश्चय टिकू शकेल. अन्यथा एखाद्या शब्दाच्या ओरखड्याने दीर्घकाळ मन विचारहीन, दिशाहीन होऊन मार्ग भटकू शकतं. म्हणून आपला मार्ग हा सकारात्मकतेचा आहे आणि त्या मार्गात येणारी प्रत्येक अडचण, ही आपल्या निश्चयातील अडथळा आहे, हे नेहमी ध्यानात ठेवा. म्हणून ज्यावेळी अशी व्यक्ती, प्रसंग अथवा वाक्य मनाला आघात करेल असं वाटेल, त्यावेळी आपल्या नामाची, साधनेची आणि सद्गुरूंची आठवण त्वरित काढावी, जेणेकरून ती वेळ, तो क्षण, ती नकारात्मकता मनावर कोणताही आघात वा परिणाम करू शकणार नाही.
एकदा याची सवय झाली की, मग बघा आपल्यालासुद्धा त्या व्यक्तींच्या सकारात्मक मानसिकतेप्रमाणे नेहमी आनंदी व नाममय आयुष्य जगता येईल. इतकंच नव्हे तर आपणही तशीच सकारात्मकता प्रसारित करत राहू आणि आपल्या प्रमाणे इतरांना सकारात्मक होण्यास मदत करू. येणारा प्रत्येक क्षण आपल्या सकारात्मकतेची परीक्षा घेणारा आहे आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीत, मी सकारात्मकतेचा मार्ग सोडणार नाही, हा दृढनिश्चय धरा, मार्गस्थ व्हा, आपलं ध्येय, नाम, साधना व सद्गुरू नित्य आपल्या पाठीशी असतील, याचा अनुभव व प्रत्यय तुम्हाला येईलच, याची मी खात्री देतो.
सकारात्मक व्हा आणि सकारात्मक जगा, नित्य नाम घ्या आणि प्रफुल्लित रहा. भेटूया उद्या तोपर्यंत साधना करत रहा, तोच प्राण समजा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक, ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा. आता पहिल्या आवृत्तीच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment