अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ३
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।
वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय
वास्तविक श्रीगणेशाचं महत्व फक्त अग्रपूजा हा सन्मान सोडुन अनेक दृष्टीने अनेक पट आहे. जगाच्या इतिहासात आजपर्यंत हे काही आपण साधू शकलो, शोधू शकलो, मिळवलं, म्हणजे संशोधन, नवनिर्मिती, रासायनशास्त्र, पदार्थविज्ञान, जैविक व वनस्पती यांसह सूक्ष्मजीवशास्त्र, संगणकीय शास्त्र, सॉफ्टवेअर हार्डवेअर, त्यातील सर्व तांत्रिक गोष्टी, अंतराळशास्त्र, समस्त ब्रह्मांडात भरारी मारून सर्व जगत शोधण्यासाठी मानव करत असलेलं संशोधनकार्य या सर्व वैज्ञानिक आकलनाच्या गोष्टी आहेत.
त्यासाठी विविध क्षेत्रात, विविध देशात विविध संशोधक, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, हे सर्व करत असलेलं कार्य आणि त्या कार्यामागची शक्ती, प्रेरणास्थान, प्रेरणास्रोत आणि यशस्वीतेमागची कर्मगती प्रत्यक्ष श्रीगणेशाचीच आहे. व्यापक रुपात व स्वरूपात, आपलं अस्तित्व व त्या अस्तित्वाने सर्व जगत, व्यापून सर्व कार्यामागील विद्येचा, अनुसंधानाचा, वेगवेगळ्या नवीन कार्यक्षेत्रांच्या उदया मागची बौद्धिक व नैतिक ऊर्जा, चेतना हे सर्व श्रीगणेशाच्या ठायी वास करून आहे.
किंबहुना समस्त जगत अध्यात्मिक कारणाकडून वैज्ञानिक कारणांकडे वळलं. पण त्या कारणांचं संशोधन यामागील प्रेरणा अर्थातच प्रत्यक्ष श्रीगणेशच आहे. म्हणजे अंधपणे शास्त्र, मंत्र, इत्यादी पाळण्यापेक्षा त्यामागचं गणित, समीकरण, तार्किक जाणून अधिक दृढ श्रद्धेने, त्या सर्व शास्त्र, मंत्र ज्ञान मार्गावरून, समस्त जगताने चालावे याचसाठी गेल्या दोन ते तीन शतकात वैज्ञानिक क्रांती येऊन समस्त जगत एका पुनरुत्थानातून मार्गक्रमण करत होते.
या सर्व स्थित्यंतरामागची प्रेरणा व कार्यकारक शक्ती ही श्रीगणेश आहे. त्वं विज्ञानमयोसी याचा अर्थ फक्त वैज्ञानिक प्रगतीच नाही तर, त्या प्रगतीला गति, ऊर्जा, दिशा आणि योग्य वळण देण्याचं महत्वाचं कार्य आणि त्याचं प्रेरणादायी तत्व हे श्रीगणेश आहे. मुळात या सर्व शास्त्रांची निर्मिती वेद शास्त्र, पुराणं यांमधून प्राचीन ऋषीमुनींनी संस्कृत परिभाषेत जतन करून ठेवली होती.
पण काळाच्या ओघात ते फक्त शास्त्र आणि विधीच्या जोखडात अडकून पडल्यामुळे, त्यातून संपूर्ण जगताला बाहेर काढण्यासाठी, आधी शास्त्रांची प्रगती, त्याचं शास्त्रीय ज्ञानात व भाषेत परिवर्तन, त्यातून उच्च कोटीचं संशोधन, त्या संशोधनातून प्रगती, त्या प्रगतीतून पुन्हा संशोधन, असं करत करत जगाला एका वेगळ्या वळणावर आणून, आता विधायक व विध्वंसक शास्त्राच्या संघर्षातून, पुन्हा नवनिर्मितीच्या वाटेकडे जगाला नेण्याचा उद्देश सद्यसंकटात वा सद्यस्थितीत मला तरी जाणवतो.
कदाचित आताचं संकट हे उद्याच्या नवनिर्मिताची प्रभात वा पहाट असू शकेल आणि यातून श्रीगणेशाच्या विज्ञान मयोसी रूपाचं अजून प्रेरणादायी दर्शन बघायला मिळेल.
विषय मोठा असल्यामुळे उद्या यावर पुढे चर्चा करूया.
जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०५/२०२१
Comments
Post a Comment