भोग आणि ईश्वर १७५
याच जन्माचा विचार करून प्रतिदिन, चिंतन, मनन, श्रवण, वाचन, नामस्मरण या अनेक मार्गांनी नित्य ईश्वर सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करावा. कारण या जन्मातून पुढे कुठे जाऊ हे माहीत नाही, मागचं स्मरणात नाही. म्हणून सध्याच्या जन्माचाच सर्वार्थाने विचार, उद्धार व उन्नती यासाठी करावा. हे साधण्याची जाणीव झाली, तीच सकाळ आणि तीच पूर्वदिशा. या जणीवेतच भगवंताची इच्छा वा संकल्प दडला आहे, हे नक्कीच समजा.
यामागे अजून एक विचार आहे. कर्मगतीच्या चुकलेल्या फेऱ्याला कर्मानेच सुधारता येतं. ते कर्म भक्तीचं, परोपकरचं, दान पुण्याचं, कोणत्याही मार्गाने केलेलं असू शकतं. म्हणून व्यवहारात तसच परमार्थात, कर्मरत राहणं अत्यंत गरजेचं आहे. नव्हे चार पुरुषार्थांपैकी धर्म पालन आणि मोक्षप्राप्ती साठी प्रयत्न करणं हे कर्तव्य असल्यामुळेसुद्धा आत्म्याला त्याच्या निहित मार्गावर घेऊन जाणं, हे देहाचं आणि मनाचं आद्यकर्तव्य आहे.
गीतेत श्रीकृष्ण भगवान यांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्य करणं हे मानवाचं ब्रीद आहे. जसे भगवंत आपल्या ब्रीदासाठी अनेक रुपात प्रकट होऊन नित्य आपलं कर्तव्य बजावतात, त्याचप्रमाणे, आत्म्याला त्याच्या उद्धाराच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणं, अर्थात त्यासाठी प्रयत्न करण्यात सर्व सहाय्य करणं, हे देहाचं आणि देहासह मनाचं कर्तव्यच आहे. कारण ईश्वराने मानवाला देह हा मात्र उधारसाठीच दिला आहे.
त्याला संसारासह इतर व्यापात आपण गुंतवून, व्याप, संचित आणि जन्मांची चढण वाढवतो आणि प्रत्येक जन्मात या व्यापात, देहाकडून जे अपेक्षित आहे, ते न करता, माया, वासना, मोह, संसार, नातीगोती या जोखडात अडकवून, सरतेशेवटी शेवटच्या श्वासाला जागे होतो, की, निजधर्माचं पालन करण्यात आपण कसूर केली आणि आता वेळ गेली. म्हणूनच ज्यावेळी, ज्याक्षणी जाग आली आणि जाणीव झाली, तिथून सकाळ समजून भगवतप्राप्तीच्या आत्म्याच्या यज्ञात साधनेच्या, नामाच्या, ईश्वर स्मरणाच्या, काहीतरी समिधा, या जन्मी पडू देत, म्हणजे पुढील जन्मात त्या सुरवातीपासून स्मरणात व कर्मात येतील.
ज्यामुळे पुढील जन्मात त्या मार्गावर अजून एक पाऊल वा काही पावलं पुढे जाऊ. हल्लीच्या व्यापामुळे आणि तापामुळे खूपजण म्हणताना आढळतात, पुढील जन्मच नको. माझा साधा प्रश्न आहे, त्यासाठी लागणारी कर्म, कर्मफलाचा राहिलेला हिस्सा संपवण्यासाठी, या चक्रातून बाहेर पडून जन्ममृत्यू न व्हावा याकरता काही करताय का तुम्ही. मग कशाच्या आधारावर हे म्हणतो आपण की, पुढील जन्म नको.
बरं या जन्मात घडलेला वनवास, मिळालेलं दुःख, मनाला घडलेला ताप, वाट्याला आलेले भोग हे सर्व मागील कर्माचा परिणाम आहे. हे समजलंय का. कारण हे समजलं तरच पुढे काही विचार करता येईल. बरं नसेल समजलं तर कशाच्या आधारावर हे म्हणताय की पुढील जन्म नको. समजलं असेल तर काय पावलं उचललीत त्याकरता. नाही ना, म्हणजे जन्म नको हे ध्येय आहे, तर त्यासाठी तसे प्रयत्न नकोत का करायला.
नुसतं म्हणून काय उपयोग. विधातासुद्धा म्हणत असेल, अरे जन्ममृत्युच्या साखळीत अडकू नयेस, यासाठी मी किती प्रयास केलेत, किती मार्ग योजलेत, कितीक वाटा करून दिल्यात, कितीक उदाहरणं घालून दिलीत, कित्येक वेळा मानवी देहात येऊन, अवताररूप, संत, महंत, सद्गुरू, साधू, या सर्व माध्यमातून मार्ग दिला, साधनं दिलीत, तरीही तू फक्त रिता म्हणत बसलास आणि त्यादृष्टीने काहीच पावलं उचलली नाहीत, तर मीतरी तुला, मदत कशी करणार. मार्ग तुझा, मन तुझ्या हाती, इच्छा तुझी आणि प्रयास तुझे असतील, तरच मी सहाय्यार्थ येईन. नव्हे ते ब्रीदच आहे माझं. पण तू निघ आणि सुरू कर. ते तुलाच करायचं आहे.
उद्या पुढे हेच निरूपण सुरू ठेवू आज थांबू. पण नाम घ्या, नित्य नाम घ्या, ईश्वर कोणत्यातरी रुपात सहाय्य करेलच, इच्छा दृढ करा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा. आता पहिल्या आवृत्तीच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment