भोग आणि ईश्वर १७४
परीक्षा, मोठ्या वर्गातली परीक्षा, उच्च पातळीची परीक्षा या त्याच विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात, जे पुढे जाण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी बाळगून असतात. म्हणजेच जे अश्या परीक्षेला बसून त्यात उत्तीर्ण होण्यास इच्छुक असतात. बसण्याची इच्छा, पुढे जाण्याची मनीषा किंवा आकांक्षा आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास करण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांनाच खडतर मार्गावरून जावं लागतं.
अश्या उच्चपदप्राप्ती करून देणाऱ्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील कष्ट व नन्तर प्राप्त गुणवत्ता,या बळावर पुढील आयुष्य हे उत्तम जातं. अर्थात त्यानंतर कष्ट संपतील असं अजिबात नाही, पण त्या कष्टाचं चीज करणारं वेतन, भत्ते इत्यादी मिळून व्यावहारिक जगण्याचा उत्तम आनंद स्वतःबरोबरच कुटुंबियांना मिळून घेता येतो.
अगदी हीच अवस्था आत्मोन्नतीच्या मार्गावर असणाऱ्या साधक, भक्त आदींची होते. आपण कोणत्या जन्मात या आत्मउन्नतीच्या मार्गावर मार्गक्रमण सुरू केलं, हे वास्तविक आपणही जाणत नाही. पण विश्वचालक , विधाता,नियती आणि संचित यांना त्याची माहिती असतेच असते. त्यानुसार आपली नियती, तसेच प्रश्न आयुष्यात आपल्याप्रत पोचवते. यातील बऱ्याच गोष्टी, प्रश्न, समस्या, अडचणी या सूचक असतात.
अनेकांना असा प्रश्न पडतो की काही लोकांना आयुष्यात काही समस्या येतच नाहीत, किंवा आल्याच तरी त्या सोडवण्याची क्षमता किंवा पैसा अडका हे पाठबळ त्यांच्याकडे, पुरेसं असतं. मला मात्र आयुष्यात प्रत्येक पावलावर परीक्षा, तीसुद्धा कठीण परीक्षा, द्यावी लागते. यातील त्यांच्या बाजूचा विचार करूया.
जरा मगाशी घेतलेलं उदाहरण दुसऱ्या बाजूने बघूया. यात जे विद्यार्थी हे शालेय जीवनात आणि शिक्षणाच्या बहुमूल्य वर्षात वेळ वाया घालवून, मजा करतात, ते सकृतदर्शनी आणि त्या काळात सुखी वाटतात. पण शिक्षणाचं वय संपल्यानंतर, नोकरीच्या वयात आल्यावर, परीक्षा देऊन पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत, या विद्यार्थ्यांना, कमी पगाराची जास्त श्रमाची आणि तात्पुरती किंवा फार प्रगती न करू देणारी नोकरी स्वीकारावी लागते. जगाकडून, कुटुंबियांकडून, नोकरीवर वरिष्ठांकडून सतत अपमान किंवा दुय्यम वागणूक मिळते. त्यापुढील पूर्ण आयुष्य अश्याच वातावरणात व कष्टात आणि हालअपेष्टा सहन करत काढावं लागतं.
म्हणजेच योग्य वयात योग्य प्रकारे परीक्षा देऊन, समजून पुढे गेल्यास नन्तरचं आयुष्य समाधानाचं जाऊ शकतं. मग हाच नियम व तर्क आत्म्याच्या प्रवासाला, त्यातील प्रत्येक देहातील प्रत्येक कर्माला, क्रिया प्रतिक्रियेला, वागणुकीला लागू पडतो. म्हणजेच आलेली संकटं, दुःख, काळज्या, चिंता, भोग, समस्या, विवंचना या, आपल्या आत्मोन्नतीच्या मार्गावरील स्थानकं आहेत, ज्यावर उतरून प्रवास अर्धा ठेवायचा की, या स्थानकांचा विचार न करता, तो त्रास प्रारब्ध आणि देह यांच्यावर सोडून, आत्म्याच्या प्रवासाची ही गाडी पुढे, प्रगतीपथावर जाऊ द्यायची, हे ठरवण्याचा काळ म्हणजेच हा जन्म, या जन्मातील हे क्षण आहेत.
याचाच अजून परामर्ष उद्या पुढे घेऊया. पण तोपर्यंत नामात रहा, प्रवासात रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment