Skip to main content

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ५

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ५

त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय
 
ज्ञान विज्ञान वाङ्मय चिन्मय यांचा विस्तृत अभ्यास केल्यानंतर, आता आनंदमय या शब्दकडे वळूया. आनंद हा खरतर एक अद्भुत ठेवा विधात्याने मानवाच्या मनात भरून अनंत उपकार केलेत. राग क्रोध भय हे भाव प्राण्यांच्या ठायी सुद्धा भरून आहेत. पण ते फक्त विशिष्ट करणांसाठीच. 

म्हणजे आपल्या हद्दीत आलेल्या एखाद्या श्वानाला, त्या भागातील इतर सर्व श्वान, ओरडा आरडा करून निघून जाण्यास भाग पाडतात. हे वानगीदाखल सांगितलं म्हणजे प्राण्यांच्या ठायी असलेल्या राग वा क्रोध याची कल्पना येईल. पण त्याचा वास्तविक संबंध हा फक्त भूक आणि भय याच गोष्टींशी असते, जी निसर्गतः त्यांना प्राप्त आहे. 

मानवाला वैचारिक देणगी, अगदी विपरीत परिस्थितीत सुदधा आपला तोल वा संतुलन जाऊ न देता, परिस्थितीच्या विरुद्ध जाऊन, आपले भाव संयत पद्धतीने मांडणं किंवा अव्यक्त राहणं. पण तरीही, हे केवळ ज्ञानी माणसाला शक्य आहे. कारण ज्ञानी माणूस जाणतो  की, प्राप्त परिस्थितीत मी काय करू शकतो आणि काय नाही. 

याशिवाय समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून नेमका मतितार्थ घेऊन बाकीचे त्याचे निरुपयोगी व्यक्त भाव व बोल हे अर्थहीन जाणून सोडून देणं , ज्ञानी माणसाला सहज साध्य होतं. हे ज्ञान व्यावहारिक ज्ञानाशी संबंधित नाही, तर आत्मिक उंची वाढवणारं आणि आत्म्याला उन्नतीकडे नेणारं ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती त्या गोष्टी सहजी सोडून देते, ज्या आपल्या प्रगतीला मारक ठरतात, किंवा अर्थाअर्थी माझ्या कर्मगतीच्या कक्षेत जे येत नाही, त्या प्रत्येक प्रतिक्रियेचा विचार न करणं तो इष्ट समजतो. 

अश्या या ज्ञानी अज्ञानी जगतासाठी विधाता इतका कृपाळू आणि कनवाळू आहे की, त्याने एक असा अलौकिक भाव निर्माण केला आणि मानवी मनाच्या आकाशातील प्रत्येक कोपऱ्यात, किंबहुना मनाच्या  प्रत्येक अनुरेणुत, त्याने हा भाव भरून ठेवला आहे. तो भाव म्हणजे आनंद. या आनंदाच्या व्याख्या अनेक केल्या जातात.

तरीही या सर्वात, सात्विक आनंद हा अत्यंत उच्च पातळीवर आहे. कारण आनंदाच्या अनेक व्याख्येत अनेक प्रकार सुद्धा आहेत. द्वेषयुक्त आनंद, इर्षायूक्त आनंद, मत्सरयुक्त आनंद, गर्वयुक्त आनंद, असुरी आनंद, असे जे नकारात्मक आणि विकारात्मक आनंदाचे प्रकार आहेत, ते मानवी मनातील छुप्या मायेचा व वासनेचा व्यक्त आविष्कार आहे.

विधात्याने वा सृष्टीकर्त्याने मात्र, सात्विक आनंदाचं एक गाठोडं मानवाला या देही येताना बांधून दिलं. त्या आनंदाचं वैशिष्ट्य हे की, तो वाटला की, वाढतो आणि दडपला की, मावळतो. एखाद्या भुकेल्या जीवाला चार घास दिल्यानंतर, त्याच्या समाधानाने मिळणारा आनंद किंवा कोणाच्या अडचणीच्या काळात मात्र एखादा उपयुक्त सल्ला किंवा बोल बोलून, त्याच्या दुःखाची मात्रा किंचित का होईना जर कमी झाली असेल तर, त्याच्या चेहऱ्यावरील वा आत्म्याला मिळालेला संतोष पाहून झालेला आनंद. 

असा हा आनंद जो कोणत्याही व्यावहारिक सीमेच्या पलीकडे असून देणारा आणि घेणारा दोघांनाही फक्त आनंद देतो. हा परोपकार आणि पुण्यकर्म दानधर्म इत्यादीमधून प्राप्त होणारा आनंद, जो बीजरहीत आहे. म्हणजे ज्या आनंदापोटी कोणताही इतर भाव उत्पन्न होऊ शकत नाही, असा हा आनंद ही त्या श्रीगणेशाच्या कृपेची बरसात या जगतावर आहे, असं माझं मत आहे.

आनंदमय म्हणजे त्या आनंदाने युक्त असा आत्मा ज्याच्याकडे पाहून प्रत्यक्ष श्रीगणेशाच्या मुखकमलावर आनंद निर्माण होऊन, त्या आनंदाच्या लाटेवर तो श्रीगणेश सुखाने हरवून जातो. आनंदमय म्हणजे आनंदाने व्याप्त, अर्थात ज्या श्रीगणेशामध्ये आनंद आणि जो श्रीगणेश त्या आनंदमध्ये ओतप्रोत भरून पुन्हा त्या आनंदाबाहेरही उरला आहे, असा श्रीगणेश

पण हा आनंद वर सांगितल्याप्रमाणे सात्विक, विषय रहीत, निर्गुण, निराकार, कोणतेही इतर भावतरंग निर्माण न करता, मात्र या आत्म्याने त्या आत्म्याला दिलेला आनंद म्हणजेच श्रीगणेशाचं स्वरूप आहे. अश्या व्यक्त सात्विक भावात प्रकट होऊन, विश्वरूप श्रीगणेश हा अश्या सात्विक आनंदासाठी व त्या आनंदात तल्लीन होऊन जातो. जसं नादमय म्हणजे त्या नादाच्या लहरित हरवलेला, तसा आनंदमय म्हणजे सात्विक, शुद्ध आनंदाच्या आत व बाहेर भरून उरलेला श्रीगणेश. 

उद्या यातील पुढील मय पाहूया.

जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏

©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०५/२०२१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...