भोग आणि ईश्वर १६७
बदललेल्या काळाने आणि बदलणाऱ्या सांस्कृतिक वाऱ्याने एकूणच हाव, लोभ आणि मत्सर या विकारांचा फैलाव करून तो वाढवला. काळाच्या ओघात पैसा हे माध्यम न राहता, त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. तो कमावण्याच्या नादात, आपल्या मूळ सांस्कृतिक समृद्धीचा पाया व प्रतीक असलेलं समाधान मात्र हरवून गेलं.
त्यामुळे समाधान हे अध्यात्मिक जीवनातच नव्हे तर एकूणच सर्वच स्तरावर हरवून गेलं. पण जे गेलं आहे ते परत मिळवणं हाच सूज्ञपणा आहे. निदान अध्यात्मिक मार्गावर स्मरण, चिंतन, श्रवण करताना, आपण या समाधानाचा धागा धरून पुढे गेलो तर, कर्मगतीच्या नियमाप्रमाणे आणि लहरी तरंग व कंपनं या शास्त्रीय सिद्धांतानुसारसुद्धा आपल्याला त्या समाधानाचा योग्य तो परतावा ईश्वरी प्रेरणेने परत मिळेल.
पण हे साधणार कसं. तर आनंद हा समाधानाचा पाया आहे आणि तो आनंद आपण ईश्वर स्मरण करताना अनुभवू शकतो. मुळात एखाद्या कृतीत मन ओतलं की, त्या कृतीतून आनंद नक्कीच मिळतो. आपण नेहमीच्या कामात वा अभ्यासात किंवा परीक्षेत अथवा कार्यालयीन कामातसुद्धा अनुभवलं असेल की, जेंव्हा आपण ते काम जीव लावून, मनापासून व आपला स्व शंभर टक्के ओतून करतो, त्यावेळी त्या कामाला लागलेला वेळ, श्रम यांचा भार शरीर व मन दोन्हीनाही भासत नाही आणि भासला तरी त्यातून आनंद मिळतो.
त्या आनंदासाठी जर ते कार्य केलं, तर नक्कीच आपण समाधान मिळवू शकतो. हाच नियम आपण स्मरण तेही ईश्वराचं स्मरण या कामासाठी लावला आणि थोडा थोडा वेळ
करत त्यात मनाला गुंतवत गेलो तर, आपण अलौकिक आनंद आणि त्यायोगे समाधान नक्कीच प्राप्त करू शकतो. मुळात समाधान हा सम् आणि आधान या दोन शब्दांची संधी आहे.
सम् म्हणजे समान किंवा बरोबरीचे किंवा बरोबर, समतुल्य आणि आधान म्हणजे स्थापित करणे, आणून ठेवणे, साधणे. म्हणजेच या दोन शब्दांच्या संधीतून निर्माण होणारा अर्थ म्हणजे ज्या कृतीने, क्रियेने, कर्माने आपले मन, मनातील धन आणि ऋण बल अथवा सकारात्मक आणि नकारात्मक लहरी व तरंग हे समान पातळीवर आणून ठेवले जातात अर्थात जिथे निर्गुणत्व, neutrality साधली जाते म्हणजेच मन आणि आत्मा भाररहीत होतात, त्या स्थितीला समाधान असं म्हणतात.
कोणत्याही प्रकारचा भार हा मनाला काही विशिष्ट दाबाकडे खेचून नेतो आणि त्या स्थितीत मन त्या भाराने भारले जाते. म्हणजेच आनंदाने भारलेले मन हे उत्तेजित होऊन त्याचा भार देह आणि आत्मा यावर पडतो आणि त्याप्रमाणे शारीरिक व मानसिक बदल संभवतात. म्हणून अति आनंदाने हृदयावर भार येऊ शकतो असं म्हटलं जातं. ह्याच्या उलट दुःखाचं आहे, त्याचाही ताण शरीर व मन यावर पडून शरीरात नकारात्मक बदल घडतात.
या आनंद आणि दुःख किंवा सकारात्मक व नकारात्मक अर्थात धन व ऋण भाराला समसमान पातळीवर आणून त्यांच्यात बरोबरी साधून भाररहित अवस्थेला आणून ठेवतं ते सम् आधान अर्थात समाधान. तुम्ही स्वतः कधी समाधानी झाल्याचा अनुभव घेतला असेल तर आठवून बघा, त्यावेळी खरच भाररहित अवस्था जाणवते. उदाहरणार्थ आपण खूप श्रमपूर्वक एखादं काम करतो, परीक्षा देतो, त्याच्या योग्य त्या परिणामनंतर, आपल्याला समाधान मिळतं आणि खरच शांत वाटतं.
याचं कारण झालेल्या श्रमाने शरीरात व मनात अति ऊर्जा अर्थात इलेक्ट्रिसिटी निर्माण झालेली असते आणि अपेक्षित निकाल, कामाचं कौतुक झाल्यानंतर त्या निर्माण झालेल्या उर्जेला neutralise म्हणजे पूर्ण खाली आणून शून्य पातळीवर आणून ठेवतं ते समाधान. म्हणजेच अतिरिक्त निर्माण झालेली ऊर्जा आणि पडलेले श्रम यांचा मेळ साधण्याचं काम, हे समाधान नामक बल करतं आणि श्रमाचं चीज झाल्याचं समाधान प्राप्त होतं. अर्थात धन व ऋण भार एकसमान पातळीवर आणले जातात.
अध्यात्माच्या दृष्टीने या समाधानाचा काय फायदा वा गरज हे उद्या बघूया. तोपर्यंत नाम घ्या, अखंड नाम घ्या.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment