भोग आणि ईश्वर १७६
एकदा दृढ संकल्प केला की, त्यामागे ईश्वर ठाम उभा राहतो. हे आपण जाणतोच. अगदी पुराणकाळापासून सूर असुर आणि मानव यांच्या दृढ संकल्पमागे ईश्वर उभा राहिला. त्याने त्या प्रत्येकाची परीक्षा जरूर घेतली. पण जे त्यात खरे उतरले आणि जे आपल्या ध्येयासाठी, संकल्पासाठी कठोर इच्छा शक्तीने उभे राहिले, त्यांना ईश्वर सर्वतोपरी सहाय्यार्थ धावून आला.
म्हणजे आपण जी साधना करतो, त्या मार्गावर आपण ठाम आहात हे ईश्वर कधीही कशाप्रकारे पाहू शकतो. अर्थात त्या पायरीवर पोचायला वेळ आहे, असा चुकीचा विचार कधीही करू नये. कारण आपण नाम घेत आहोत, ही साधीशी सुरवातसुद्धा आपल्या सद्गुरूनमार्फत ईश्वरापर्यंत नक्की पोचलेलं असतं. अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
कारण जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंवरसुद्धा ईश्वराचं लक्ष असतं. म्हणून तर आपण म्हणतो की, ईश्वराच्या मर्जीशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. याचा वास्तविक अर्थ, सर्व चराचरावर सत्ता असलेल्या ईश्वराच्या संकल्पनेतून निर्माण झालेली सृष्टी आणि सृष्टीतील प्रत्येक त्या वस्तू व सजीव यांच्या प्रत्येक बारीकबारीक हालचालीसुद्धा ईश्वराच्या मनात नोंदल्या जातात.
पण त्यातही ईश्वराचं, विशेष लक्ष, त्या जीवांवर असतं, जे निरागस आहेत. म्हणून त्या सर्व जीवांच्या श्वासांची चिंता ईश्वर स्वतः वाहतो, जे आपल्या मनाने निष्पाप आणि निरागस आहेत. संकल्पाची दृढता ही अश्या मनाच्या निरागसतेवर देखील अवलंबून आहे. कारण निरागस आणि निष्पाप मनात कोणत्याही संकटाबद्दल किंतु असत नाही. किंतु यासाठी नसतो की, अशी निरागस मनाची माणसं, कोणत्याही प्रकारच्या संकटांचा संबंध ईश्वराशी जोडत नाहीत, तर हसत आणि धैर्याने त्याला सामोरे जाऊन, आपल्या पात्रतेची कसोटी समजतात.
त्यामुळे अश्या मनात द्वैत नसतं. उद्देश सरळ, हेतू शुद्ध, प्रयत्न पूर्ण आणि कर्मावर गाढा विश्वास असतो. द्वैत त्याच मनात असतं, जिथे कर्म आणि कर्मफल यांवर विश्वास नसतो, ईश्वराचा संबंध स्वतःच्या चांगल्या आणि वाईट फलांशी जोडला जातो आणि भोग भोगण्याची तयारी नसते किंवा भीती वाटते, तिथे द्वैत असतं. जिथे द्वैत आहे तिथे ईश्वर नाही . कारण हे द्वैत ईश्वराच्या अस्तित्वाबरोबर, आपलं कर्म, आपला कर्मावरचा विश्वास, स्वतःच्या श्रद्धेवर, साधनेवर, नामजपावर अपूर्ण निष्ठा, यातूनच हे द्वैत उभं राहतं.
कारण अद्वैत चिंतन करणारा साधक हा मी आणि ईश्वर हे भिन्न मानतच नाही.जर मी आणि तो भिन्न नाही, तर मला होणारा ताप, भोग हे त्याच्याप्रत पोचतीलच. कारण तो आतच आहे आणि आत आहे म्हणजे जे घडतंय, मनात, तनात आणि जगात हे तो जाणतोच. त्यामुळे जर तो जाणतो आणि तरीही भोग संपत नसतील तर, यामध्ये ईश्वराचा नक्की असा काही वेगळा उद्देश असेल, ज्यामुळे त्याच्या माझ्या कडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी हा जन्म, देह, मन, बुद्धी,जाणिवा, समज हे सर्व दिलंय.
माझ्या या अपेक्षांच्या मार्गात मी ठाम आहे की नाही, यासाठीच वेगवेगळी वादळं ही दुःख, दैन्य, षड्रिपु, माया या स्वरूपात तोच धाडून सत्व पाहतो आहे. त्यामध्ये पूर्ण उतरण्यासाठी मी सक्षम असायला हवं. म्हणून साधन दृढतेने करणं गरजेचं आहे. असा तो चक्रव्यूह आहे. तो आपल्यालाच भेदायचा आहे.
यावर अजूनही चिंतन आवश्यक आहे. उद्या बोलू. तोपर्यंत नाम घ्या, सक्षम व्हा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा. आता पहिल्या आवृत्तीच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment