अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख २
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।
वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय
या सर्व शब्दात मय हा शब्द समान आहे. या शब्दाने श्रीगणेशाची व्याप्ती, महती आणि कीर्ती अधोरेखित केली गेली आहे. तरीही या शब्दांचे सखोल विश्लेषण करून खालील निरूपण मांडत आहे.
वाङ्मय हे साहित्य, भाषा व त्यासंबंधातील कला म्हणजे लेखन, काव्य, नाट्य, इत्यादी सर्व कला यांच्याशी निगडित आहे म्हणजेच हे सर्व या एका शब्दात व्याप्त आहेत. तरीही या सर्वांना व्यापून श्रीगणेश त्यावर विराजित आहे. म्हणजेच भविष्यात येऊ शकणाऱ्या या क्षेत्रातील कलांचा सुद्धा प्रणेता प्रत्यक्ष बाप्पाच आहे.
काल आपण ज्ञानाबद्दल बोललो , ते विश्वव्यापक ज्ञान हे भाषा या ज्ञानातून सुरू होऊन अनेक प्रकारे विस्तार पावून जगत आपल्या कवेत घेऊ इच्छिते. ज्ञानाचा विचार करता त्यामध्ये गणित, शास्त्र, वेद, पुराणं यांसह समस्त ब्रह्मांडाचं ज्ञान समाविष्ट आहे आणि याचा कर्ता प्रत्यक्ष श्रीगणेश आहे.
चिन्मय म्हणजे विशुद्ध ज्ञानयुक्त. मय म्हणजे व्यापक किंवा परिपूर्ण. अर्थात ज्ञानमय हा शब्द एकदा वापरून पुन्हा ज्ञान हा शब्द चिन्मय या शब्दाने वेदकार वापरतील हे संभवत नाही. कारण अथर्वशीर्ष हे वेदांचं उपअंग असलेल्या उपनिषदातील आहे. म्हणजे दोन्ही शब्दां मधून दोन भिन्न अर्थ अपेक्षित आहेत हे नक्की.
ज्ञान हा शब्द विश्वातील घटकांचं अर्थात विश्वातील चराचर यांना जाणणं दर्शवतं. अर्थात विश्वाच्या अंतर्गत जे सर्व येतं, त्याचं किंवा त्यासंबंधाचं ज्ञान हे ज्ञान या शब्दाने अधोरेखित होतं. परंतु या विश्वापलीकडे असलेलं चिरंतन गुह्य, गहन, पारमार्थिक, अध्यात्मिक ज्ञान ज्याच्या मध्ये आहे असा श्रीगणेशच आहे. म्हणजेच चिन्मय शब्दात विश्वाच्या परम सत्याचं ज्ञान ज्यामध्ये वेद, पुराण यांसह असंख्य स्तोत्र, मंत्र हे या ज्ञानाला प्राप्त करण्याचे मार्ग आहेत, या सर्वांचा समावेश होतो.
म्हणजेच ज्या ज्ञानाने या विश्वापलीकडील अर्थात ब्रह्मांडाच्या पार असलेल्या परम गुह्यला जाणलं जातं, त्या संबंधीचं ज्ञान हे चिन्मय शब्दाने अपेक्षित आहे. चिन्मय याचा दुसरा अर्थ चित् मय अर्थात चित्तात म्हणजेच हृदयात वसलेल्या गुह्य आत्म्याला जाणून त्याच्या माध्यमातून ब्रह्मांडाच्या रचनाकाराला जाणण्या संबंधातील ज्ञान अर्थात अमूल्य ज्ञान.
हे ज्ञान मिळवण्यासाठी ऋषीमुनीं, साधू संत, ज्ञानी, योगी, महर्षी, आपला जन्म नव्हे कित्येक जन्म घालवतात, ते ज्ञान मात्र श्रीगणेशाच्याच कृपाप्रसादाने प्राप्त होऊ शकतं. म्हणूनच सर्व स्तोत्र, मन्त्र, पूजा अर्चना प्रार्थना, आरती, पंचारती, जपतप, ध्यान धारणा इत्यादी सर्व करण्याआधी श्रीगणेशाची उपासना अत्यंत जरुरीची आहे.
म्हणूनच कोणतंही स्तोत्र म्हणण्याआधी आपण श्रीगणेशाय नमः म्हणून सुरवात करतो. कारण या सर्व गुह्य, गहन, सहजसाध्य नसलेल्या, जन्मजन्म खर्चावे लागणाऱ्या, ज्ञानाच्या प्राप्तीचं किलक अर्थात चावी, पिन किंवा पासवर्ड श्रीगणेशापाशीच किंवा श्रीगणेशच आहे. म्हणूनच श्रीगणेशाला प्रसन्न करून, त्याचं पूजन करून, त्याला नैवेद्यर्पण करूनच कोणतीही पूजा केली जाते.
याचं अजून विस्तारपूर्वक विवेचन पुढील भागात पाहूया.
जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०५/२०२१
Comments
Post a Comment