Skip to main content

भोग आणि ईश्वर १५३

भोग आणि ईश्वर  १५३
 
सकारात्मक मनःस्थितीत नाम घेणं म्हणजे काय याचा विचार करूया. नाम घेताना कोणताही नकारात्मक विचार, भाव वा क्रोधादी विकार येणं म्हणजे अस्थिर मनःस्थितीत नाम घेणं. अश्या मनःस्थितीत घेतलेलं नाम कोणतीही सकारात्मक ऊर्जा निर्माण करत नाही. कारण अश्या स्थितीत घेतलेल्या नामाने निर्माण झालेली ऊर्जा व चैतन्य मनातील नकारात्मकता साफ अथवा नष्ट करण्यात वाया जाते.

म्हणून खूप वेळा आपण तक्रार करतो अथवा आपल्याला जाणवतं की कितीही नाम घेतलं तरी, आपल्या मनाला शांतता वा समाधान मिळत नाही. याचं कारण मनातील हे भाव त्या नामाचा लाभ शून्यवत अर्थात neutralise करतात. त्यामुळे आपण साधना करत जातो आणि ही नकारात्मकता त्याला शोषून घेते. म्हणून सर्वात प्रथम या नकारात्मक मनःस्थितीचा त्याग करून नाम घेणं महत्वाचं आहे.

त्यासाठी नित्य नाम घेण्याआधी काही क्षण शांत बसून मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून नकारात्मक, मन अशांत करणाऱ्या, मनाला नामापासून प्रवृत्त करणाऱ्या लहरी या शांत होऊन, मन नकारात्मक व विकार निर्माण करणारे भाव, पूर्ण निष्प्रभ होतील. नामा आधीच्या या काही क्षणांनी नामाचा उचित लाभ मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.

नामामध्ये एकाग्रता न होण्याचं अजून एक कारण चिंता. अनेक प्रकारचे प्रश्न, काळज्या ज्यांचा विचार नेमका नाम घेतानाच आपल्या मनात अवेळी उमटत जातो आणि मन नामामागे न धावता, त्या विचारापाठी धावत जाऊन आपल्याला सुद्धा त्यामागे नेतं. आपल्याला म्हणजे देहातील आत्म्याला. कारण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यांमध्ये मन नेहमी देहबुद्धीला जाणतं. देहबुद्धी ही समोर असलेल्या पंचमहाभूतरुप देहाला स्थूलरूपात पाहते. जे चर्मचक्षूंना दिसतं, अर्थात जे मेंदूद्वारे जाणवतं, त्यालाच आपण खरं मानतो. 

म्हणून देहाने बुद्धीने व ज्ञानेंद्रियांनी पाहिलेले व जाणलेले तेच सत्य हे आपल्या ठायी जन्मतः, अर्थात या देहात आल्या पासून ठसवलं जातं आणि तेच आपण जाणतो किंवा समजतो. म्हणजेच जे दिसतंय , जे घडतंय तेच आपल्या मेंदूत व स्मरणात नोंदलं जातं. त्याच गोष्टी आपण गृहीत धरून चालतो. त्याच विचारांची कंपनं मनात फिरत राहून त्याच तरंगांनी भावनिर्मिती होते. त्याच भावनेत बद्ध मन त्याच प्रकारच्या जाणिवा उत्पन्न करतं. त्या जाणिवा आपला स्वभावधर्म होतो. 

म्हणून अश्या प्रकारच्या देहबुद्धीयुक्त जाणिवांना आत्मबुद्धी कडे नेण्यासाठी तितकीच ताकदीची ऊर्जा आवश्यक असते. तरच देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे मन, भाव आणि जाणिवा  जाऊ शकतात. सदर कार्य नवविधा भक्ती, योगयाग, इत्यादी अनेक मार्गांनी शक्य आहे.  परंतु यातील सर्वसमान्यांच्या आवाक्यातील मार्ग म्हणजे स्मरण, चिंतन, मनन, श्रवण. 

चर्मचक्षूंच्या माध्यमातून देहातील बुद्धीचा वापर करून त्या विश्वरूप चैतन्यशक्तीच्या सगुण रुपाला सतत पाहून, आत्मसुखाची अनुभूती घेणं, त्या चैतन्यमय नामाचं  नित्य स्मरण करत राहून, मनाद्वारे आत्म्याला त्याचा आनंद मिळवून देणं, त्याच्या नामस्मरणाच्या, संकीर्तनाच्या श्रवणरुप  आनंदात देहबुद्धी विसरून, आत्मबुद्धीला जागृत करणं, हे कार्य नामस्मरण साध्य करतं. त्यामुळे अवेळी येणारे विचार व विकार हे या मार्गातील कंटक अर्थात काटे आहेत. 

यामुळे ते काटे, आपणच आपल्या देहबुद्धीला बाजूला सारून आत्मबुद्धीला जाणवणारा आनंद देत आहोत हा भाव मनात दृढ केला तर, नामाच्या चैतन्याचा आनंद नित्य मनाला सुखावत व खुणावत  राहील. मन नित्य त्या स्मरणात राहील वा राहण्याचा प्रयत्न करेल आणि नामस्मरणात अडथळा निर्माण करणारे काटे, हे आपोआप मनच बाजूला करेल. या मनःस्थितीत जाऊन नाम घेण्याचा प्रयत्न करा मन देहबुद्धी पलीकडे जाईल. पहा प्रयत्न करून. 

उद्या पुढे चिंतन नेऊया. नाम घेत रहा सकारात्मक रहा.  

अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...