Skip to main content

भोग आणि ईश्वर १७०

भोग आणि ईश्वर  १७०

वास्तविक देह हा आत्म्याला सदेही येऊन, आत्मोद्धार आणि आत्मोन्नती साधण्यासाठी देवाने दिलेलं एक साधन आहे. मूळ पूर्णांशातून विलग होऊन आत्मा मर्त्यलोकात देह धारण करण्यासाठी येतो, हे निमित्त नसून खरतर ती विधात्याचीच खेळी आहे. बर या देही येऊन पुनरुत्पादन करण्याचं तंत्र याच देहाला देऊन आपल्यासह पुढील जीवांचा उद्धार करण्याचं कार्य या देहातून घडावं हासुद्धा उद्देश ईश्वराने मनात योजला.

हा उद्देश आत्मा अवकाशातून जीवसृष्टीवर येईपर्यंत त्याचा मंत्रच असतो. सोहम. म्हणजे मीच त्या अविनाशी आत्म तत्वाचा अंश आहे. पुढे जीवसृष्टीत येऊन गर्भात आल्यानंतर हाच आत्मा देहाच्या प्रकृतीनुसार सर्व विसरून, मायेच्या अधीन होतो. देहधारणेचं मूळ कारण विसरून गेल्यामुळे, या जीवसृष्टीला भुलून, खेळात दंग होऊन जातो. 

एक उदाहरण घेऊ म्हणजे समजेल. एका लहान मुलाने हट्ट केला की, मी शेजारी जाऊन खेळतो. आधी नाही म्हणणारी आई, नन्तर हो म्हणते, पण एका अटीवर तयार होते. जेवायच्या वेळेपर्यंत परत ये. मुलगा म्हणतो चालेल तू साद घाल मी येईन. आईला खात्री असते की आपला मुलगा काही लवकर व साद घालून बोलावल्याशिवाय येणार नाही. ती वेगवेगळ्या प्रकारे साद घालते. 

कधी संत महंत, ऋषीमुनी, सज्जन साधू, आत्मतत्वी रममाण असणारे, देहधारी लोकोत्तर सत्पुरुष या आईने घातलेल्या, वेगवेगळ्या सादांना, ते मूल काही प्रतिसाद देत नाही, इतकं ते शेजारच्या घरात हरवून जातं. आई धाकदपटशा माहीत व्हावा म्हणून भोगरूपी साद घालून स्वकर्मात रत आपल्या लेकरांना पुनः पुनः बोलावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असते, नित्य करते. 

पण तिचे कोणतेच बोल, साद कानी पडूनसुद्धा मूल त्याकडे दुर्लक्ष करतं आणि खेळ सुरूच ठेवतं. आईच्या कोणत्याच सादाला प्रतिसाद न देता, त्या शेजारच्या घरातील माया, षड्रिपुरूप पुत्रांना मित्र समजून, त्यांच्या पूर्ण अंकित जाऊन, आईच्या सादांकडे पूर्ण दुर्लक्ष करते. किंवा हे मित्र त्याचा बुद्धिभेद करून, न जाण्याविषयी प्रत्यक्ष काही न सांगता, जगाच्या पसाऱ्याचा मोह,लोभ, वासना यांचं जाळं निर्माण करून, त्यातून ते आईचं मूल, आईकडे परत जाऊ शकणार नाही, किंबहुना जाण्याची त्याला बुद्धीच होणार नाही याची सोय करतात.

मूल जितकं जास्त काळ आपल्याकडे राहील, तितका काळ या शत्रूरुप मित्रांना, आईच्या होणाऱ्या त्राग्यामुळे असुरी आनंद होतो. कारण मुलाला आईकडे न जाऊ देता, आपल्याच घरात खेळात गुंगवणं, त्यांना आनंददायक वाटतं. आई परत परत, ठराविक वेळेनंतर, मुलाला अनेक रूपातील साद घालतच असते. त्या सर्व सादातून आईने एक संदेश धाडलेला असतो की, जर तुला येणं शक्य नसेल, पण यायची इच्छा उत्पन्न झाली असेल तर, 

तू मनापासून मला बोलावशील, माझं नाव घेशील,माझा पुकारा करशील,त्यावेळी मी तुला न्यायला, या अतृप्त, विघ्नसंतोषी मित्ररूप शत्रूंपासून सोडवायला नक्की येईन. 
असा हा इतका सोपा सहजसाध्य सर्वफलदायक मार्ग जो या मानवी देहातूनच आपल्या खऱ्या आईकडे नेतो, तो या देहातूनच साध्य होतो.  या देहाचं महत्व अनन्य आहे. 

या देहातूनच नामाच्या आधारे, आईला साद घालता येते, बोलवता येत, पुकारा करता येतो. ज्यांना हा देह प्राप्त होऊ शकत नाही किंवा जे यातून मुक्त झालेत त्यांच्याविषयी, कृष्णरूपातील भगवंताच्या लीलांना पाहून, ब्रम्हर्षी नारद, गहिवरून म्हणतात, मला या सर्व देह नसलेल्या आणि मुक्त झालेल्यांची कीव येते की ते हे नरदेहातील भगवंताच्या बाललीला पाहूच शकत नाहीत. 

इतकं अनमोल शरीर लाभल्यानंतर आणि पुन्हा हाच मानवी देह कधी म्हणजे किती काळानंतर प्राप्त होईल हे माहीत नसताना, आत्मोद्धार व आत्मोन्नती या मार्गावर, श्रध्दायुक्त अंतःकरणाने, फक्त नाममात्रेचा नाममात्र आधार घेऊन आपण का योग साधत नाही, हे ईश्वरालाही कोडं आहे. तरीही ती माऊली आपल्या पुत्रांना परत परत साद घालत आहे आणि सांगत आहे, तुम्ही फक्त मनापासून अंतःकरणाने मला पुकारा, मी त्वरित सुटकेसाठी नक्की धावून येईन, पण त्यासाठी साद तुलाच घालायची आहे, लेकरा. 

अजूनही या विषयात विवेचन बाकी आहे,ते उद्या पाहूया. तोपर्यंत नाम घेत रहा, परमेश्वराला साद घालत रहा.कोणती साद तिथपर्यंत पोचेल हे तोच जाणेल. पण आपण प्रत्येक शब्द, साद, नाम त्यांच्यापर्यंत पोचेलच या भावनेने साद घालत राहू.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...