भोग आणि ईश्वर १५७
आपल्या आयुष्यात येणारी माणसं हा खरतर आपल्याच कर्मगतीचा भाग आहे, जो फलस्वरूप आपल्यासमोर त्या व्यक्तीच्या स्वरूपात येतो. कार्य करतो आणि फलप्राप्ती संपली कि, सदर व्यक्ती दूर जाते, निघून जाते. खरंतर या विषयावर पूर्वीच्या भागात लिहिलं आहे. परंतु आज पुन्हा हा विषय घ्यावासा वाटला. कदाचित काही नवीन पैलू समोर येऊ शकतात. मुळात कर्मगतीच्या फेऱ्यानुसार आपण सर्व गोष्टी करतो आणि आपल्याला सर्व काही मिळतं. हे खरंतर आपल्याला भेटणाऱ्या माणसांबाबत सुद्धा आहे. तरीही आपली दृढ इच्छाशक्ती त्या बाबत योग्य व्यक्तीला आपल्यापर्यंत पोचवते. याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील किंवा पाहायला मिळतील. कारण अजून आयुष्य बरंच बाकी आहे. आज या योगायोगाबद्दल बोलूया.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आलेली सर्व माणसं कर्मधर्मसंयोगाने आली असं सर्वसाधारण वाटलं तरीही, त्यामागे निश्चित कारणं आणि कोणतानाकोणता कर्माचा भाग भोगण्यासाठी येणं हे अध्याहृत आहेच. हा योग वा योगायोग आपल्याला भेटणाऱ्या सर्व व्यक्तींबाबत आहे. पण काही व्यक्ती आपल्या तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला भेटतात. कदाचित आपल्या इच्छित कार्यात त्या मदत करतात. त्यानंतर त्यांचा आणि आपला संबंध राहीलच असं काही सांगता येत नाही. पण कार्य सिद्धीस नेण्यास या व्यक्ती येतात. कार्य झाल्यानंतर क्वचितच त्या पुन्हा भेटतात वा आपले संबंध टिकतात. पण अश्या गोष्टी योगायोगाने घडत नाहीत.
यात पुन्हा आपलं पूर्वकर्म आणि इच्छाशक्ती यांचा संगम सुद्धा असू शकतो. कारण तशी इच्छाशक्ती असायला, विचारांची तशीच पक्की बैठक आणि दृढ इच्छा असावी लागते. याचं सर्वात उत्तम उदाहरण दिलं जाऊ शकतं ते म्हणजे आपल्या मनात असलेली किंवा खूप दिवस आपल्याला भेटावी अथवा बोलावी असं वाटणारी एखादी व्यक्ती अचानक आपल्यासमोर वा संपर्कात येते. हा कर्मधर्मसंयोग असतो. कर्मधर्मसंयोग म्हणजे कर्मात फलस्वरूप लिहिलेलं, इच्छाशक्तीच्या कर्माने (कारण काया वाचा आणि मन तिन्ही मार्गाने कर्म घडतच असतं) शक्य होतं. हा अनुभव बरेचदा मी स्वतः घेतला आहे. म्हणजे आयुष्यातील पडत्या काळात तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर अर्थात तीव्र मनोबलाने मला प्रवासात लोकल मध्ये कर्मधर्मसंयोगाने एखादा अनोळखी वा प्लेसमेंट एजंट भेटून मला नोकरी लागल्याची उदाहरणं आहेत. हा योगायोग नसून पूर्वकर्मातील पुण्याई, तीव्र इच्छाशक्ती त्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि अर्थात सद्गुरुकृपा यांचा संगम असू शकेल.
अशी कित्येक उदाहरणं माझ्या आयुष्यात घडली आहेत. कदाचित आपल्यापैकी अनेकांना याचा अनुभव आलाहि असेल. सध्याचं नुकताच घडलेला एक संयोग म्हणजे भोग आणि ईश्वर या लेखांचं श्रवण माध्यमातून प्रसारण होऊन त्याचा लाभ सर्वांना व्हावा यासाठी मी स्वतः एक दोन भाग ध्वनिमुद्रित केले. पण ते मला स्वतःलासुद्धा आवडले नाहीत. म्हणून प्रयत्न सोडून दिला. एक दोन वाचकांनादेखील यात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. पण मनासारखा परिणाम घडला नाही. अगदी घरातसुद्धा प्रयत्न करून पहिला, पण इच्छित परिणाम मिळाला नाही. पण साधारण महिन्यापूर्वी अचानक पुण्याच्या चित्राताई ताम्हणकर, ज्यांना मी ओळखतसुद्धा नव्हतो, त्यांनी आपणहून
दोन भाग मिळवून ध्वनिमुद्रित करून, माझा भ्रमणध्वनी क्रमांक पाहून, मला एक भाग पाठवला. अर्थातच त्या आकाशवाणी निवेदिका असल्यामुळे त्यांनी केलेलं ध्वनिमुद्रण मनाजोगतं झालं होतंच. त्यामुळे त्यांना पुढील भाग पाठवून ते काम पुढे सुरु ठेवण्यास संमती दिली. कारण त्यासाठीच त्यांनी हे ध्वनिमुद्रण पाठवलं होतं. आजपासून त्याचा लाभ अनेकांना होईल.
सांगण्याचा उद्देश कि, मनात एखादी तीव्र इच्छा असेल आणि त्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करत असू तर, त्या कामासाठी योग्य व्यक्ती विधाता तुमच्यापर्यंत पोचवतो. पण त्यासाठीची तयारी म्हणजे तीव्र इच्छा आणि त्या इच्छेमागे असलेलं आपलं मनोबल. या दोन बैठकीवर आपण प्रयत्न करत पुढे जात राहिलो कि, विधाता सुयोग्य व्यक्तीपर्यंत तुम्हाला किंवा त्या व्यक्तीला तुमच्यापर्यँत पोचवतोच. म्हणूनच कोणतीही सद् इच्छा असेल तर त्यामागे आपलं मनोबल लावून त्यापुढे आपले प्रयत्न सुरु ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या मनातील लहरी व कंपनं आणि सदर व्यक्तीच्या मनातील लहरी व कंपनं यांचा समसमासंयोग होऊन कार्य सिद्धी अवश्य प्राप्त होते. हेच तत्व आपण करत असलेल्या साधनेच्या बाबतसुद्धा आहे. ज्यावेळी आपल्या साधनेच्या लहरी इच्छित वा इष्ट देवतेपर्यंत पोचतात, त्यावेळी आपल्याला त्याचा प्रत्यय अथवा अनुभव मनात उमटणाऱ्या आनंद लहरीस्वरूपात मिळायला सुरवात होते. हा प्रत्यय आयुष्यात घ्या आणि साधनेतसुद्धा घ्या. नाम घेत रहा चांगल्या दोष इच्छा करत रहा आणि त्यामागे आपली तीव्र इच्छाशक्ती जोडून शक्य असलेले प्रयत्न करत रहा. जिथे आपले प्रयत्न तोकडे असतील वा तोकडे पडतील, तिथे आपली इच्छाशक्ती व साधना कार्य करेल,या बाबत विश्वास व श्रद्धा बाळगून पुढे जात रहा .
नामात राहा साधनेत रहा विधात्याचा कृपाप्रसाद कधी आपल्यापर्यंत पोचेल हे विधातासुद्धा जाणत नाही. भेटूया उद्याच्या भागात पुन्हा एकदा.
अजूनही ज्यांना भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment