Skip to main content

भोग आणि ईश्वर १६३

भोग आणि ईश्वर  १६३

कालचाच विषय पुढे नेताना एक उदाहरण घेऊया म्हणजे सद्गुरू महती विशेषत्वाने लक्षात येईल.  संकटं येणं हा प्रारब्धाचा भाग आणि भोग दोन्ही आहे. एखादा बैल वा वळू, माजलेला आणि मस्तवाल, अचानक रस्त्यात समोरून आला. आपण गोंधळलो आणि कळत नाही वाचायचं कसं आणि सुटायचं कसं. 

इतक्यात कोणीतरी अश्या वेगात येतं आणि आपल्याला, त्या वळूच्या मार्गातून बाहेर काढतं, ढकलतं आणि वळू आपल्या मार्गाने सरळ निघून जातो, किंवा त्याचवेळी आपल्या आणि त्याच्या मार्गात एखादी मोठी गाडी, बस ट्रक येतो आणि वळू मार्ग बदलतो. हे उदाहरण प्रतिकात्मक समजून पुढे बोलूया. 

हे असे आयत्या वेळचे आणि आपल्या कर्माशिवाय मिळालेले वा आपसूक आलेले सहाय्य, म्हणजे साधनेतील गती आणि सद्गुरुकृपेचा महिमा समजावा. कारण आपलं कर्म सुटकेसाठी काहीच नाही. आपण तर सावरायच्या आत कोणीतरी आलं आणि आपल्याला वाचवलं. किंवा थोड्याश्याच कष्टाने संकटात सहाय्य मिळणं आणि जेवढं  अपेक्षित होतं, तेवढं नुकसान न होता, आपण संकटातून बाहेर पडू शकणं, हे एखाद्या चमत्काराप्रमाणे भासतं.

पण मुळात हा चमत्कार नसून, सद्गुरुकृपेने साध्य झालेला योग आहे. कृपावंत सद्गुरू भक्तांना संकटातून योग्य प्रकारे, योग्यवेळी, योग्य मार्गाने सुखरूप बाहेर काढून पुन्हा योग्य मार्गी व जागी आणून सोडतात. अशावेळी आपली खर्ची पडलेली पुण्याई, आपण पुनः सद्गुरू सेवा व साधना यांचा जोर वाढवून भरून काढली पाहिजे. कारण कोणतेही सद्गुरू आपल्या साधकांनी पुनः संसार चक्रात गुंतून मार्गभ्रष्ट वा पथभ्रष्ट व्हावं म्हणून कधीही संकटातून सुटका करत नाहीत. 

त्यांचा उद्देश आपल्या ध्यानात आला पाहिजे. या संकेतांचा अर्थ आपण या जन्मात अजूनही उद्देशांच्या  बरेच मागे आहोत आणि त्याचा संकेत म्हणून ईश्वराने सद्गुरू रुपात आपल्याला संकटातून सुटकेचा मार्ग दाखवून, नक्कीच काही विधायक अपेक्षेने सद्गुरुकृपा साध्य केली, हे नक्की. म्हणून कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचे संकेत हे नेहमी आपल्या साधनेच्या वृद्धीसाठी आहेत आणि संसाराचा मार्ग सद्गुरु प्रशस्त करतील, आपण साधनेचा जोर वाढवून, पुढील मार्गातील संकटं दूर करण्याची कृपा, सद्गुरूंनी करावी यासाठी प्रयत्नशील राहावं. 

आता याची दुसरी बाजू पाहूया. सद्गुरुकृपेने आपण संकटातून सुखरूप वाचलो, म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का की, जे वाचले नाहीत किंवा ज्यांना संकटांनी जेरीस आणलं, पण काही मदत प्राप्त होऊ शकली नाही, त्यांना सद्गुरुकृपा प्राप्त झालीच नाही. तर यात दोन उत्तरं आहेत. एक म्हणजे त्यांच्या भोगाच्या मानाने त्यांच्या संचितातील पूर्वपुण्याई आणि सद्यजन्मातील पुण्याई ही अश्या कोणत्याही सहाय्यासाठी कमी आहे, किंवा त्यांनी अजून परीक्षेतून जाण्याची सद्गुरूंची इच्छा आहे.

अश्या संकेतांचे अर्थ तुम्ही कसे घेता त्यावर सर्व अवलंबून आहे. दुसरं असं की, कधीकधी आपली पुण्याई व पूर्वसुकृत उत्तम आहे, पण ती पुढील संकटात कामी यावी ही सद्गुरुंची इच्छा आहे आणि सद्य संकटातून आपण आपल्या आत्म बळावर बाहेर यावं असं सद्गुरूंना वाटत असावं. म्हणूनच श्रीकृष्ण सखा असूनही अर्जुनाला,  सर्वोच्च संकटात वा परीक्षेत, श्रीकेशवाने गीता सांगून उद्धार केला आणि कर्मासाठी उद्युक्त केलं. स्वतः युद्ध केलं नाही. जरासंधाला भिमाकडून मारलं, स्वतः ईश्वर असून काही केलं नाही. 

म्हणजेच कोणत्या संकटात आपण सहाय्य करावं आणि कोणत्या संकटात आपण साधकांच्या क्षमतेला कार्यसिद्ध करावं, याचं अचूक ज्ञान सद्गुरूंना  असतं. म्हणूनच एखाद्या संकटात सद्गुरू प्रत्यक्ष सहाय्यार्थ आले नाहीत तरी आपल्या आत्मबळाच्या रूपाने ते पाठीशी आहेत आणि आपल्या कडूनच त्यांना हे कार्य अपेक्षित आहे, हे जाणावं. योग्यवेळी ते सहाय्यासाठी येतीलच हा विश्वास आणि श्रद्धा दृढ असू द्यावी. 

यात अजून काही मुद्दे शिल्लक आहेत, म्हणून हीच चर्चा उद्या सुरू ठेऊ आणि आज इथेच थांबू.  म्हणूनच नामात रहा, साधनेत रहा, सद्गुरू प्रेरणेचा महिमा अगाध आहे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील रहा .     

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...