Skip to main content

भोग आणि ईश्वर १५९

 भोग आणि ईश्वर  १५९

  
काल आपण पाहिलं त्याप्रमाणे काही स्तोत्र आणि मंत्र हि सकाळच्या वेळी नक्कीच एक वेगळी ऊर्जा आणि चैतन्य देऊन पूर्ण दिवस  त्याचा लाभ घडवून देतात. किंबहुना त्या ऊर्जेमध्ये पूर्ण दिवसाचं कामकाज सुलभ करण्याचं सामर्थ्य आहे हे नक्कीच. पण यावरून अजून एक गोष्ट लक्षात येते कि, त्या त्या स्तोत्र व मंत्र यांना घडवणाऱ्या ऋषीमुनी, संत महंत यांची दृष्टी किती विशाल आणि बुद्धिमत्ता किती उच्च असेल. कारण संपूर्ण समाज, नव्हे पुढील हजारो पिढ्या त्या आनंदाचा लाभ घेऊ शकतील असं लिहून ठेवणं हे नक्कीच अद्भुत कार्य त्या सर्वांनी करून ठेवलं आहे. त्याबद्दल त्यांना खरंतर शतशः प्रणाम.  

काही स्तोत्राचं इथे उदाहरण देता येईल. जसं श्रीरामरक्षा ,श्रीमारुतीस्तोत्र,  श्रीगुरुदेवदत्तरूपातील कोणताही मंत्र वा स्तोत्र  अथवा दुर्गाष्टक हे वा यासारखी स्तोत्र वा मंत्र हे कवच वा तारक स्तोत्र/ मंत्र  असल्या कारणाने आणि संध्याकाळी नकारात्मक वा अनिष्ट लहरी घरात प्रवेशण्याचा काळ असल्यामुळे, हि दोन्ही स्तोत्र त्या वेळी अश्या प्रकारच्या अनिष्ट लहरींना प्रवेश करण्यापासून रोखतात. संध्याकाळची वेळ सूर्य असत झालेला असल्यामुळे नैसर्गिक सात्विक व सकारात्मक लहरींचा संचार हा थांबलेला असतो. त्यामुळे अनिष्ट वा  नकारात्मक लहरींचा संचार सुरु होतो अर्थात त्यांना उत्पन्न होण्यास योग्य काळ असतो. म्हणून अश्यावेळी तारक वा कवच मंत्र आणि स्तोत्र यासाठी उत्तम काळ आहे.  

आता काही स्तोत्र हि अशी असतात कि ज्यांना विशिष्ट वेळीच म्हटलं पाहिजे असं नाही. म्हणजेच म्हणणाऱ्याच्या सोयी वा मनस्थिती अथवा वेळेनुसार म्हटलं तरी चालण्यासारखं असतं . अश्यावेळी आपण आपल्या सोयीनुसार त्या स्तोत्र वा मंत्र यांचं पठण करून आपल्या मनाला त्याचा लाभ अर्थात संतोष मिळवतो. यामध्ये मूळ एक गोष्ट जी दोन्ही प्रकारच्या स्तोत्राबाबत ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे आपण कोणतंही स्तोत्र वा मंत्र म्हणताना मनाची पूर्ण एकाग्रता, सहभाग त्यात असणं हे मुख्य अपेक्षित आहे. कारण तरच योग्य त्या लहरी निर्माण होऊन त्यांचा आपल्याला इच्छित लाभ प्राप्त होऊ शकतो. 

म्हणून कोणतंही स्तोत्र वा मंत्र सुरु करण्याआधी काही क्षण शांत बसून डोळे मिटून मनात एक विचार वा इच्छा दृढ धरावी कि, मी आता जो मंत्र वा स्तोत्र म्हणणार आहे, त्यामध्ये माझं मन एकाग्र होऊन, त्या मंत्र वा स्तोत्र यांच्या पठणाने उच्च प्रतीच्या लहरी निर्माण होऊन, त्या लहरी  मंत्रांच्या वा स्तोत्राच्या इष्टदेवतेपर्यंत पोचाव्यात आणि त्या इष्टदेवतेची कृपा माझ्यावर अशीच कायमस्वरूपी रहावी. या हेतूंप्रीत्यर्थ मी या मंत्राचं किंवा स्तोत्राचं पठण सुरु करत आहे. आपण विशिष्ट उद्देशाने जर हे पठण करत असू तर, तो संकल्प आपण सोडलेला असेलच, पण हा विचार वा इच्छा प्रतिदिन, ज्यावेळी ते स्तोत्र वा मंत्र म्हणू त्या त्यावेळी आपण मनात योजून मग पठण  सुरु करावे. विनासंकल्प नित्य पठणाच्या वेळी सुद्धा असा काही क्षणाचा दृढ विचार मनात योजण्यास हरकत नाही. त्यामुळे सदर पठणाला मनाचं पाठबळ मिळून, पूर्ण क्षमतेने आपण त्यात सहभागी होऊ. कारण शेवटी सर्व मनाच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. 

मनाच्या सहभागाचा लाभ आणि गरज दोन्ही, असणं  कुठल्याही कार्यात महत्वाचं आहे, हे आपण जाणतोच. परंतु जिथे आपल्याला अश्या परमशक्तीशी मंत्र वा स्तोत्र या माध्यमातून संपर्क साधायचा आहे ज्या  ठिकाणी वा ज्या कार्यात तर फक्त आपलं मन हेच आपले चक्षु व ज्ञानेंद्रिय आहेत हे ध्यानात असू द्या. अगदी नुसतं शांत बसून ध्यान लावताना सुद्धा आपण प्रत्येक कार्य मनाच्या सहाय्याने करतो. म्हणूनच ज्यावेळी इच्छित कार्य हे लहरींच्या माध्यमातून साध्य करायचं आहे आणि त्या लहरी मनाच्या क्षमतेवर अवलंबून आहेत, म्हणजे आपण पूर्ण एकाग्रतेने ते कार्य हाती घेणं किती महत्वाचं आहे ते लक्षात येईल. म्हणून कोणताही मंत्र वा स्तोत्र त्यामागे मनाची पूर्ण शक्ती लावून अर्थात पूर्ण एकाग्रतेने म्हणावं म्हणजे त्याचा इच्छित लाभ नक्की मिळेल. 

हे विशेष करण्याचं अजून एक कारण म्हणजे ज्या ज्यावेळी सध्याच्या सारखी  गंभीर आणि वैयक्तिक चिंताजनक परिस्थिती येते आणि मनाची अवस्था दोलायमान होण्याचा संभव असतो, अश्यावेळी आपण करत असलेली साधना वा पठण आपल्या मनाला नक्कीच उभारी देऊन जातं, शास्त्रीय दृष्टीनेसुद्धा मनाच्या खंबीरतेवर शरीराची अवस्था बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते आणि ज्याप्रमाणे मनाची अवस्था असेल त्याप्रमाणे रसनिष्पत्ती अर्थात हार्मोन्स पाझरून शरीराला लाभ अथवा हानी होते. अश्या काळात मन खंबीर ठेवण्यासाठी आपण जर आधीपासून काही उपाय करत असू तर, अश्या काळात आपलं मन स्थिर राखायला ते नक्कीच उपयोगी येईल आणि मन स्थिर असेल तर कितीही वादळ वा संकटं आली तरी आपण डगमगणार नाही. म्हणजे मन आत्म्याला जसा संतोष देईल आत्मा त्याप्रमाणेच अश्या  काळात मनाला आणि मनाद्वारे देहाला योग्य ती साथ देईल. 

आज इथेच थांबूया उद्या पुन्हा नवीन विषयावर चर्चा करूया.   

नामात रहा, साधनेत रहा, विधात्याचा कृपाप्रसाद कधी आपल्यापर्यंत  पोचेल हे विधातासुद्धा जाणत नाही. भेटूया उद्याच्या भागात पुन्हा एकदा.    

अजूनही ज्यांना भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...