भोग आणि ईश्वर २९
आतापर्यंत आपण जे वाचलं त्याचा भावार्थ, आपल्या भोगाचे भागीदार फक्त आपण आहोत. त्याचं फलित कधी, कुठे आणि कोणत्या रुपात व कोणत्या जन्मात समोर येईल हे ईश्वरसुद्धा सांगू शकणार नाही. अनेक जन्मातील हे भोग असतात ते व्यक्ती, प्रसंग, संकटं अश्या कोणत्याही रुपात समोर येऊन आपला धर्म बजावून जातात. कित्येकवेळा आपण बेसावध असताना हल्ला केल्यासारखं हे फलित समोर येतं.
आपणच त्याचे कर्ता धर्ता असल्यामुळे या सर्वांचा हर्ता जो ईश्वर आहे, त्याच्या चरणांशी जाऊन, त्याच्याकडे घडलेल्या प्रमादांची क्षमायाचना करून, कृपेची कामना करणं हा एक उपाय आहे. अन्यथा भोग असल्यामुळे ते भोगूनच संपवणं हा निरुपाय आहेच आपल्यासमोर. परंतु ज्यावेळी एखादा विकल्प उपलब्ध असेल, त्यावेळी त्या विकल्पाचा विचार उपचार म्हणून वा रोगमुक्त होण्याचा पर्याय म्हणून करायला हरकत नाही.
पण प्रत्यक्ष परमेश्वराला साद घालून, त्याच्याकडे आपली हाक जायला, आपल्या पदरी तेवढं पुण्य असायला हवं. तसं पुण्य जोडण्याचा कलियुगात सोप्पा उपाय म्हणजे नामस्मरण. असं नाम चिरंतन, नित्य घेत मार्गक्रमण करताना अनेक युगांच्या पापांच्या राशी जळून माणूस कित्येक कर्माच्या भोगातून मुक्त होऊ शकतो. पण मायेचा फेरा अजब असतो. तो भल्या भल्यांना चकवतो आणि चकवा म्हटलं की, तो पथभ्रष्ट करतो आणि एकदा पथभ्रष्ट झालेला जीव पुन्हा पथावर येण्यासाठी कित्येक जन्माची पुण्याई जोडावी लागते.
पण माया ही अत्यंत चलाख व चतुर असते, ती बुद्धी आणि मन यांचा ताबा घेऊन असा खेळ दाखवते की, माणूस बुद्धिभ्रष्ट होऊन जातो आणि इप्सित विसरून पुन्हा मार्गावरून दूर होतो. म्हणून यासाठीच विधात्याने गुरूंची निर्मिती करून समस्त जगतावर अनन्य उपकार केले आहेत. समस्त विश्वाच्या माउलीने, गुरुरूपात त्या जन्मदात्या माऊलींचं प्रतीक गुरू या प्रतिमाऊलीला विश्व तारण्यासाठी महत्वाचं कार्य सुपूर्द केलं.
एक माता जन्म देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी या जगतात आणते, कारण पंचमहाभूतरुप या देहातूनच मुक्तीचा मार्ग प्राप्त होतो, त्यामुळे जन्मदाती माऊली श्रेष्ठ. परंतु जगताच्या या जंजाळातून आपल्या अफाट पुण्ययीच्या जोरावर लाखो साधक भक्तांचं हित साधून त्यांना एक एक पायरी मुक्तीच्या वाटेवर नेऊन ठेवण्याचं असाधारण कार्य करणारी गुरुमाऊली ही जन्मदात्या मातेहून श्रेष्ठ ठरते. कारण गुरूमाऊली ही साधकांना पुन्हा उदरी जन्म न येण्यासाठी कार्यरत असते.
साधकांच्या हिताची चिंता ही सदैव त्यांच्या गुरूंना असते. साधकाचं काम फक्त गुरूआज्ञेचं पालन करून गुरूच्या समोर बसून राहणे. बाकी सर्व कार्य गुरू करवून घेतात.
मज गुरू भेटले
माझे पाप फिटले
चरणरज गुरूंची
मी मस्तकी लावली
इतकं केलं आणि साधनेचा जोर जागृत्सवस्थेत वाढवला की, सुप्त व निद्रावस्थेत ती साधना करवून घेण्याची जबाबदारी गुरू स्वतः घेतात. अश्या या परम पवित्र गुरू पदाला त्रिवार वंदन करूया. मायेचा फेरा चुकवून वाममार्गी होण्याचं टाळण्यासाठी गुरुचरणसेवा हाच धर्म मानून आणि नामस्मरण हेच कर्म मानून राहण्याने अनेक युगांची व जन्माची पापं नष्ट होऊ शकतात. त्या सर्वसमर्पण भावाचा अंगीकार करून, सर्व इच्छा आकांक्षा त्यांनाच समर्पित करू, जेणेकरून काय योग्य व काय अयोग्य हे तेच ठरवतील.
बघूया पुढील भागात समर्पण म्हणजे काय.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/१२/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment