भोग आणि ईश्वर ८
आता विरुद्ध बाजूला जाऊया. स्मृतिभ्रंश झालेला तो माणूस ज्या घरातील होता, तिथे काही दिवस गोंधळ, दुःख रडारड झालं. काही दिवस लोकांची सहानुभूती मिळाली. पण काही दिवसात देणेकरी दारात यायला लागले. घरच्यांना काही कळेना की इतकं सर्व वाईट कर्म या माणसाने करून ठेवलं आहे. हे देवा आमच्याच नशिबात हे का लिहून ठेवलंस. सर्व गोंधळाचा बाजार झाला.
आता इकडे कुटुंबाकडे बघूया. त्या माणसाच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा जो त्याने मागे ठेवलाय तो, देणेकऱ्यांच्या रुपात घरी येऊन तगादा लावतो आहे. रोजच्या रोज,मागे राहिलेल्या लोकांना नसत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. ते कुटुंबीय, त्या सोडून गेलेल्या कुटुंबाप्रमुखाच्या नावे, शंख करत असतात, काय देणी ठेवून गेले, मालमत्ता तर काहीच नाही पण उत्तरदायित्व सोडून गेले.
इथे एक गोष्ट लक्षात आली असेल. या उदाहरणात मुद्दाम मी नकारात्मक बाजू घेतली, त्या स्मृतिभ्रंश झालेल्या इसमाची आणि त्यांच्यामुळे त्रस्त झालेल्या कुटुंबाची. आता इथे आपण मुद्यावर येऊया. एक गोष्ट सर्वांना कळली असेल की
- तुम्ही जे कर्म करता ते वा त्याचे घडणारे परिणाम घेऊन माणूस या जन्मातून पुढच्या जन्मात जातो. ही साखळी निरंतर आहे, नित्य आहे आणि शृंखलेसारखी बद्धसुद्धा आहे.
- प्रत्येक जन्म हा त्या स्मृतिभ्रंशासारखा आहे. आपण प्रत्येक जन्मात नव्याने सुरवात करतो. तरीही काही अनाकलनीय गोष्टी, गूढ घटना, अकल्पनिय परिणाम आपल्या समोर येतात. जे अनपेक्षित असतात.
- किंबहुना ते चुकीच्या वेळी येतात असा आपला समज असतो. परंतु कालच्या उदाहरणात तो घेणेकरी मित्र, त्याच्या दृष्टीने योग्य वेळीच सदर स्मृतिभ्रंश झालेल्या इसमाला धरतो.
- म्हणजेच काळ योग्य वेळीच सर्व घटना घडवतो. फक्त आपण या जन्माचंच बघू शकतो म्हणून अर्धवट चित्रावरून चुकीचे ग्रह, समज करून चुकीचे निष्कर्ष काढतो.
- निष्कर्ष चुकतात, त्यामुळे निर्णय चुकतात आणि मग सर्वच गणितं चुकत जातात.
- म्हणजेच आपण समजतो तसं चांगल्या आणि वाईट घटनांचं काळाचं गणित चुकलेलं नसतं. परंतु आपल्या स्मृतीत गत जन्मातील आठवणी नसल्यामुळे आपल्याला संदर्भ लागत नाहीत इतकंच.
- वरील घटनेत तो स्मृतिभ्रंश झालेला गृहस्थ, आधीच्या काळात सज्जन असता तर त्याला स्मृतिभ्रंश झाल्यानंतर सुद्धा सज्जन माणसंच भेटली असती, जरी याच्या स्मृतीत काहीच नसलं तरी. म्हणजेच कर भला हो भला.
- त्यामुळे आता परिणाम वाईट दिसतात म्हणजेच, आधी कधीतरी, या किंवा मागच्या जन्मात आपणच, काही वाईट कर्म करून, त्याचं बीज लावून ठेवलं असणार हे नक्की, मान्य असो वा नसो.
- म्हणजेच निदान पुढे परिणाम वा फळ चांगलं मिळण्यासाठी आजचं कर्म तरी मला सुधारवं लागेल.
- त्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे पाहून एक निष्कर्ष काढता येतो तो म्हणजे आई वडील जे कर्म करतात, त्या कर्मांचे चांगले अथवा वाईट परिणाम हे पुढील पिढ्यांना भोगावे लागतात.
- त्या उदाहरणातील देणेकरी म्हणजे सोडून गेलेल्या व्यक्तीच्या कुकर्माची फळं, जे कुटुंबाला विशेषतः संतांनाला भोगावी लागतात. म्हणजेच ज्याप्रमाणे स्थावर, जंगम व मिळकत याबरोबर देणी मांडून ताळेबंद काढला जातो व त्यानुसार वारसाला हिस्से मिळतात. त्याचप्रमाणे आधीच्या पिढीच्या कर्माचा हिस्सा पुढील पिढीला हस्तांतरित होतो, आपसूक, नकळतपणे आणि नैसर्गिकरित्या.
अजून काही निष्कर्ष बघूया पुढील भागात.
असो हा विषय उद्या पुढे नेऊया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/१२/२०२०
Comments
Post a Comment