भोग आणि ईश्वर ९
म्हणजेच आपण भोगत असलेले कर्माचे परिणाम हे किती जन्मातील आहेत, ते एक ईश्वरच जाणे. एक गोष्ट ध्यानात ठेवा आपल्याला येणारे चांगले व वाईट अनुभव हे आपल्याच मागच्या कर्माचं फलित आहे. म्हणजेच ती आपण केलेल्या क्रियेची प्रतिक्रिया आहे. कारण ते फलित वा परिणाम आहे आणि परिणाम हा नेहमी मूळ क्रियेइतकाच समप्रमाणात असतो. हाच गणिती सुद्धान्त न्यूटनने क्रिया आणि त्याची समान पण प्रीतिक्षिप्त क्रिया या नियमाने मांडला जो न्यूटनचा तिसरा सिद्धांत म्हणून ओळखला गेला. पण मुळात भारतीय कर्म सिद्धांताने हा नियम कित्येक युगं आधी लिहून, मांडून ठेवलाय.
प्रत्येक क्रियेची तितकीच पण विरुद्ध प्रतिक्रिया क्रिया करणाऱ्याकडे येते, हा तो नियम. तुम्ही एखाद्याचं मन दुखावणारं कटू बोललात की, तेच शब्द तितकाच परिणाम करणारे पण उलट दिशेने म्हणजेच आपल्याच दिशेने कधीतरी एखाद्या व्यक्ती वा प्रसंग रुपात येणारंच. स्वीकारार्ह असो वा नसो. आपण विचार करतो याचं तर मी काहीच घोडं मारलं नव्हतं. पण यांच्याकडून का ऐकावं लागलं. माझी काहीही चूक नसताना बॉस मला का बोलला. मी तर प्रामाणिक आहे, कामचुकार नाही, नियमात चूक करत नाही. तरीही दुसऱ्याच्या चुकीने तुम्हाला निष्कारण बोल लावला जातो.
आपल्याकडे पूर्वी बायका त्रास देणाऱ्या बाईला म्हणत की पाठी येऊन छळीन किंवा पोटी येऊन छळीन. म्हणजे आपल्याला छळणाऱ्या वा त्रास देणाऱ्या व्यक्तीला, आपण मागे या किंवा आधीच्या जन्मात छळलं असणार हे धरून चाला. या जन्मात आपण चांगले आहोत, कारण स्मृतिभ्रंश, म्हणजेच नवीन जन्म नवीन देह. ही काही उदाहरणं आहेत. अशी कित्येक असतील व्यक्तिपरत्वे.
आतापर्यंतच्या सर्व विवेचनातून हे लक्षात घ्या की, आपण आज जे भोगतो ते मागच्या कर्मानुसार आणि साहजिकच आज जे कर्म करू त्याचं फलित भविष्यात आपल्या समोर कोणत्या रुपात येईल हे ईश्वर जाणे. काळ फक्त त्या परिणामांना योग्य वेळी आपल्यापुढे मांडून आपलं कर्तव्य करतो. म्हणजे काळाच्या गणितात अंशाचासुद्धा बदल संभवत नाही.
कारण ते युगानुयुगांचं कर्तव्य त्याला सृष्टीकर्त्याने नेमून दिलंय. ते तो नियमित करणार. त्या पानावर, त्या दिवशी, त्यावेळी, त्या व्यक्तीला, ते सादर करायचं. काळ ते करतो. काळाच्या याच कर्तव्यामध्ये स्मृतिभ्रंश अर्थात एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आत्मा नेणे म्हणजेच जन्ममृत्युचं चक्र चालवणे हे अव्याहतपणे काळ करतो. त्यात कुठेही भावनेचा लवलेश नाही, किंवा कर्तव्यात कसूर नाही.
आता आपणच लिहिलेलं आपणच भोगतो, काळ हा वेटर प्रमाणे ते त्या त्या वेळी आपल्या समोर आणून ठेवतो. आपलं कर्तव्य ते ग्रहण करणं, मान्य असो वा अमान्य, आनंदी असो वा दुःखी. हे असं जन्मोजन्मी नित्य, नियमाने, अखंडपणे सुरू आहे. कित्येक जन्म आपण भोगले, अजून कित्येक बाकी आहेत हेदेखील आपल्याला ज्ञात नाही वा ज्ञात होणार नाही. यातील अजून काही गहन गोष्टी नन्तर बघू. तूर्तास परत मागे जाऊ.
आज जे भोग आले सुखाचे वा दुःखाचे ते आपणच आपल्यासाठी वाढून ठेवलेत हे एकदा मनात पक्के झालं की नकारात्मक, वाईट, कटू, अपचनीय, दुःखदायक, क्लेश कारक, सहन न करता येणारे अनुभव, प्रसंग, व्यक्ती, शब्द हे प्रतिक्रिया वा परिणाम आहेत. म्हणजेच त्यावर आपण पुन्हा देत असलेली प्रतिक्रिया ही नवीन कर्मसाखळी तयार करणार, हे ध्यानात आलं का.
म्हणजेच अश्या कटू प्रसंग, माणसं, शब्द यांच्यावर किती विचारपूर्वक प्रतिक्रिया द्यायला हवी आहे, हे आलं ना लक्षात. म्हणजेच एका कर्माच्या परिणामांमधून मुक्त होत असताना, आपण आपल्याचसाठी, आपल्याच नकळत, नवीन कर्मशृंखला तयार करून ठेवतो वा नवीन गणित काळाच्या स्वाधीन करतो. म्हणजेच एखाद्याशी आपण आपणहून क्रोधाने बोलतो तेंव्हा वा त्याच्या एखाद्या कृतीमुळे रागावून तिखट बोलतो तेंव्हा दोन्ही वेळा एक नवीन कर्मसाखळी तयार केली, जी भविष्यात येणार आपल्यासमोर.
आता विचार करा, कृती करण्याआधी वा बोलण्याआधी. Think Twice before you do or say, हे इंग्रज आपल्याला शिकवतात आणि आपण वा म्हणतो. पण हे आपल्याच पूर्वजांनी गीता, पुराणं, वेद, ग्रंथ व संतांनी अभंगातून स्वतःचं आयुष्य खर्चून मांडलंय. ते मात्र आपण अवलंबत नाही. चिंतन करा यावर. उद्या अजून पुढे नेऊ हा विषय.
असो हा विषय उद्या पुढे नेऊया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/१२/२०२०
Comments
Post a Comment