भोग आणि ईश्वर ६
असं समजूया की, त्या हुशार मुलाला आपण ओळखतो, त्याच्या मेहनतीला आपण पाहिलंय. आता आज सर्वात ढ मुलाचा विचार करूया. परीक्षेला येताना व वर्षभर अभ्यास न केलेला एखादा मुलगा परीक्षेच्या वेळी निरुत्तर होतो, नुसतं बसून राहतो, काहीही लिहू शकत नाही. परंतु भराभर पेपर सोडवणाऱ्या त्या मुलाला पाहून विचार करतो काय नशीबवान आहे. याला सर्व येतंय किंवा याने वाचलेलंच सर्व पेपरात आलंय. खरच मी कमनशिबी.
हा नशीबवान शब्द म्हणजे खरतर त्या हुशार मुलाच्या मेहनतीची किंमत कमी करणारा शब्द आहे, हे आपण जाणतो. का तर वर म्हटल्याप्रमाणे आपण सर्व पाहिलेलं आहे वा जाणतो. निदान त्या मुलाची आपल्याला कल्पना आहे. म्हणजे नशीब या त्याच्या शब्दाचा आपल्याला राग आणि हसू दोन्ही येतं वा येऊ शकतं. म्हणजे प्राप्त परिस्थिती नाकारून वा ती माहीत करून न घेता तो ढ विद्यार्थी हुशार मुलाच्या मेहनतीला नशीब या एका शब्दात गुंडाळून मोकळा होतो.
म्हणजेच जर माहिती असेल तर किंवा कल्पना करता आली तर आपण त्या ढ मुलाला नक्की म्हणू की, तुला काही माहीत नसताना उगाच त्या मुलाच्या मेहनतीला कमी लेखू नकोस आणि त्याच्या अभ्यासाला नशीबाचं लेबल लावून त्याला कमी ठरवू नकोस. तसाच नेटाने तू अभ्यास केला असतास तर आज तू सुद्धा चांगला पेपर सोडवू शकला असतास. आता निदान पुढच्या परीक्षेसाठीतरी तयारी कर म्हणजे जरा बर होईल.
जीवनातील अनेक बऱ्यावाईट घटना आपण वेगवेगळ्या पाहतो जोखतो आणि पारखून आपल्या ज्ञानाने स्वतःशी विश्लेषित करतो त्या ढ मुलासारख्या. कदाचित अगदी तसं नसेल तरीही आपण अनुमान हे आपल्या तर्कानुसार काढतो. कारण आपल्यालादेखील त्या ढ मुलासारखी माहितीची व ज्ञानाची मर्यादा आणि गतजन्मांच्या विस्मृतीचा शाप आहे. म्हणून आपण अनुमान काढतो ते मर्यादित ज्ञानावर व माहितीवर आधारित. म्हणजेच खरी परिस्थिती ही आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. ती या जन्मात आपल्याला प्रत्यक्ष कधीच कळणार वा दिसणार नाही.
म्हणजेच आपले सर्व आडाखे, अंदाज, तर्क, आकलन व त्यावर आधारित निर्णय हे मर्यादित असणार हे नक्की. म्हणूनच आपण मर्यादित अंदाज बांधून म्हणतो की माझं नशीबच खोटं म्हणून अस घडलं वा घडतंय. पण त्या हुशार अथवा ढ मुलांप्रमाणे आपण केलेल्या तयारीचा आपल्याला स्वतःला अंदाज नाही, हे तर नक्की. इथे दोन व्याख्या स्पष्ट झाल्या.
एक परीक्षा म्हणजे जीवन जे क्षणोक्षणी जगतो ते आणि अभ्यास म्हणजे कर्म, पूर्व, सद्य वा भविष्यातील. आपण कुठेतरी त्या मुलांसारखे असू. इथे आपण दोन्ही विद्यार्थ्यांना जाणत होतो म्हणून हे समजू शकलो की, ढ मुलाची विचारपद्धती चुकीची आहे. मग कोण आहेत जे जीवनामध्ये वा या जन्ममध्ये, आपला अभ्यास आहे की नाही व असलाच तर किती, हे जाणणारे आहेत. असणार हे नक्की. पण ते पुढे बघूया.
आता शालेय परिक्षेसारखी आपल्याला ठराविक वयात ठराविक गोष्टी करायची सवय आहे. तोच विचार जीवना बाबत आपण करतो. म्हणजे आता काय करायचं अभ्यास करून (कर्म सुधारून), आता वय गेलं आणि उरले किती. किंवा तरुण असतील तर उलट विचार करतील की जाऊदे पुढे बघू अजून विचार करायचं वय आलं नाही. इतका सहज विचार करून आपण सोडून देऊ. म्हणजे पुन्हा पुढच्याच क्षणी आपला ढ विद्यार्थी झाला.
पण एक साधा विचार करा की, गीतेतसुद्धा सांगितल्याप्रमाणे आत्म्याचा प्रवास अनंतापर्यंत आहे. म्हणजे ही साठ सत्तर वर्ष ही काही सेकंदाप्रमाणे आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणी बघितलंय. पण आधीच्या भागातील उदाहरण पुन्हा देतो. लतादीदींना जन्मतः नैसर्गिक आवाजाची विलक्षण देणगी कशी काय मिळू शकते. काहीतरी पूर्वजन्मीचा अभ्यास, पुण्य कर्माचा, भक्तीचा, असूच शकेल. ज्याचा वारसा वा लाभ जन्मतः त्यांना लाभला. नन्तर त्यांनी मेहनतीने तो फुलवला हे नाकारायचा प्रश्न यात येतच नाही,हे नक्की.
किंवा सचिन आणि विनोद एकाच वेळी आलेले दोन तुल्यबळ खेळाडू. तितकीच नैसर्गिक क्षमता घेऊन आलेले, एकत्रच सुरवात केलेले. पण कोण कुठे कोण कुठे. एकाला गतजन्मातील लाभ आणि सद्य जन्मातील मेहनत, एकाग्रता यांनी कुठे पोचवलं आणि एकाला ती एकाग्रता व मेहनत नन्तर टिकवता न आल्यामुळे कुठे नेलं. म्हणजे पूर्वसुकृत आणि या जन्मातील कर्माचा मेळ कुठेतरी माणसाला जीवनात उपयोगी येत असावा, असा तर्क करायला वाव आहे. कदाचित चांगल्या व वाईट कर्माचं गणित कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/१२/२०२०
Comments
Post a Comment