भोग आणि ईश्वर २१
प्रत्येक कुढीत असलेलं तेच चैतन्य कुढी अर्थात देहाच्या गुणधर्मानुसार आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवतं. म्हणून ते जेंव्हा छत्रपतींच्या देहात प्रवेश करतं त्यावेळी एका ऐतिहासिक कामगिरीचा प्रत्यय संपूर्ण आयुष्यभर दाखवतं आणि तेच औरंजेबाच्या देहात मूर्तिमंत क्रौर्याचं प्रात्यक्षिक दाखवतं. अश्या या दोन टोकाच्या देहात असणारं एकच चैतन्यतत्व फक्त देह, देहातील वृत्ती, माया इत्यादी भिन्न असल्याकारणाने इतकं विरुद्ध रूप दर्शवतं, म्हणजे नक्की कोण श्रेष्ठ आत्मा की देह हा प्रश्न पडतो.
यासाठी पुन्हा आपण दिव्याच्या उदाहरणाकडे जाऊ. वीज आहे म्हणून दिवा लागतो किंवा गिझर चालतो की हे दोन्ही आहेत म्हणून वीज कार्य करते. प्रश्न क्लिष्ट वाटेल पण उत्तर तितकं कठीण नाही. यातून हेच सिद्ध होतं की, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
म्हणजेच चैतन्यविरहीत देह हा शून्य आहे त्याचप्रमाणे देहाशिवाय चैतन्यशक्ती अकार्यक्षम आहे. अन्यथा आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात गेलाच नसता. त्याला प्रत्येक वेळी कर्मफलाचा हिशोब चुकता करण्यासाठी देह हा लागतोच अन्यथा तो योग्य संधीसाठी अर्थात जन्मासाठी फिरत राहतो. जसा एक दिवा गेल्यावर आपण दुसरा दिवा लावतो, तोपर्यंत आतील वीज ही कार्यहीन असते.
आता अशी कल्पना करा की त्या दिव्याच्या होल्डर सॉकेट किंवा बटण यांपैकी कशातही किंवा सर्वात दोष आहे. त्याशिवाय दिव्यातसुद्धा दोष आहे. आपण वीजप्रवाह सुरू केला. परिणामी तो दिवा सदोष चालेल, किंवा कमी काळ चालेल किंवा लवकर निकामी होईल किंवा एखादे वेळी अपघातसुद्धा होईल.
यावर उपाय म्हणजे तो दोष कशात आहे ते पाहून ती गोष्ट बदलणे. म्हणजे वीजप्रवाह सुरळीत होऊन त्या दिव्याचं आयुष्य , उजेड आणि कार्यक्षमता वाढेल. अर्थातच तो दोष दूर होत नाही किंवा केला जात नाही तोपर्यंत तिथे कितीही दिवे बदलले तरीही दिवा सदोष चालेल वा लवकर जाईल.
आता असं समजूया की, तो दोष किंवा त्याच्या उपकरणांची अकार्यक्षमता म्हणजे आपल्या कर्माचे दोष आणि त्याचे संचित. म्हणजेच हे सदोष संचित घेऊन जन्माला आलेल्या देहात असलेल्या चैतन्यशक्तीचा तोपर्यंत काहीही सकारात्मक उपयोग होणार नाही जोपर्यंत ते दोष दूर केले जात नाहीत आणि जोपर्यंत ते दोष दूर होत नाहीत तोपर्यंत कितीही देहातून चैतन्यशक्ती फिरत राहिली तरी त्या चैतन्यशक्तीची प्रभा सदोष राहील.
त्या दिव्याबाबत त्यातील दोषांची माहिती त्यातील तज्ञ, अर्थात विद्युतशास्त्रवत्ता किंवा विद्युततंत्री, देईल त्यानंतर तो दोष दूर होऊन प्रवाह सुरळीत झाला की त्या वीजेचा पूर्ण वापर होऊन उत्तम उपयोग होईल. जीवाबाबत यातील तज्ञ अर्थात ऋषी मुनी, संत महंत, साधू सज्जन यांना अर्थातच या जीवाच्या कर्माचे दोष व त्यांचे निवारण यातील माहिती अनुभव, आत्मप्रचिती, तप, साधना, निष्ठा, भक्ती, ज्ञान, वैराग्य, समर्पण, ध्यान, धारणा यापैकी एक वा अनेक मार्गाने गेल्यामुळे जाण व जाणीव असते.
अर्थातच त्यांच्या वचनांवर व सूचनांवर विश्वासून आपण निश्चितपणे कर्माचे दोष, भोगाच्या कारणांना व संचितातील साचलेल्या दोषांना जाणून त्यांच्या निराकरणासाठी सिद्ध होऊ शकतो. यासाठी आधी आपली वैचारिक बैठक तयार होणं गरजेचं आहे.
कोणती वैचारिक बैठक ते पुढील भागात पाहूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/१२/२०२०
Comments
Post a Comment