Skip to main content

भोग आणि ईश्वर २८

भोग आणि ईश्वर  २८
   
गुरुपदी जो आसनस्थ झाला
तयांसी विशेषाधिकार मिळाला
आत्म्यासी करुनी उन्नत जगती
सद्गुरूने त्याचा कार्यभार वाहिला

जगताच्या उद्धारात आणि आत्म्याच्या प्रवासात जन्ममृत्युचं स्थानक येतं जातं. आत्मा नित्य एका देहातून दुसऱ्या देहात मृत्यूच्या माध्यमातून अनंतकाळपर्यंत फिरत राहतो. कर्माच्या राशी नित्य ओतून, त्यांचे मोल मोजून, अवनती करत राहून, कधी मागे तर कधी पुढे असा उलटसुलट प्रवास करून आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं हे कळत नसल्यामुळे पथभ्रष्ट, मतीभ्रष्ट अवस्थेत फक्त भोग भोगत आणि कर्माचा पसारा मांडत जीव हरवून जातो. 

आपण भोगतोय ते का आणि माझी काही चूक नसताना मी का या चक्रातून आणि चरकातून फिरतोय हे उमगत नाही आणि उमगलं तरी मार्ग सुचत नाही. अश्याच अभागी आणि दुर्दैवी जीवांच्या उद्धारासाठी परम ईश्वर परम आत्म्याने एक व्यवस्था निर्माण केली, ती म्हणजे सद्गुरू. व्यवस्थापनाच्या परिभाषेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मधला दुवा असलेल्या व्यवस्थापकांसम मध्यस्थ म्हणजे सद्गुरू. यांचा अधिकार हा प्रसंगी विधात्यासमान असतो. म्हणूनच तश्याच अधिकाराची व्यक्ती त्या पदी विराजमान होते.

गुरूंची गरज. जगतपित्याला विश्वातील आत्म्याच्या उन्नतीची चिंता लागून राहिली. त्या चिंतेतून भगवंताला जाणवलं की मी स्वतः सर्व ठिकाणी, नित्यकाळ उपस्थित राहून भक्त तारण करू शकणार नाही, त्यामुळे अशी काही व्यवस्था असावी ज्यायोगे भक्तांचं रक्षण, उद्धार आणि उन्नती नित्य होत राहील, त्यांना त्यांना मार्ग सापडेल, पथभ्रष्ट झाले असतील त्यांना मार्ग मिळेल, कर्मफलात हरवून आपलं स्वत्व गमावलेले असतील त्यांना स्वत्व मिळेल, इच्छा आहे पण शक्तीहीन आहेत त्यांच्या इच्छेला बळ प्राप्त होईल.

गुरुपदाची महती खरतर सांगण्याची माझी पात्रता नाही. तरीही माझ्या सदुगुरूंची क्षमा मागून मी त्यांच्या महतीवर काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरू हा भक्तांचा, साधकांचा आणि पथभ्रष्ट जीवांचा जन्मजन्माचा साथीदार, मार्गदर्शक आणि सहृद असतात. त्यांच्या हृदयी ममत्व माया आईचं प्रेम आणि हृदयी नित्य विराजित भगवंत असतो. आपल्या साधकांची नित्य चिंता वाहण्यासाठीच आणि सदोदित त्यांच्या उन्नतीच्या चिंतेत खरे सद्गुरू जळत असतात. त्यांचा अधिकार परमेश्वराचा आणि प्रसंगी 
त्याहून श्रेष्ठ असतो.

हा अधिकार प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना बहाल केलेला असतो आणि परमेश्वर स्वतः त्यांच्या आधीन असतो. प्रत्येक जडजीवाला आत्मउद्धाराचा  अधिकार असताना आणि त्याचा मार्ग त्याला सापडत नसताना सदेही राहून भक्तांना  मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता परमेश्वराला वाटली. सद्गुरूच्या कृपाछायेत आलेल्या प्रत्येक जीवाचं योगक्षेम ही सद्गुरूंची चिंता असते आणि ती चिंता वाहण्यास समर्थ असलेली व्यक्तीच तो भार वाहू शकते. 

आपल्या सद्गुरूंवर अनन्यसाधारण प्रेम व श्रद्धा असणाऱ्या आणि गुरूला अखंड शरण राहून त्यांच्या आज्ञेचे नित्य पालन करणारे भक्त व साधक सद्गुरुंच्या कृपाप्रसादास पात्र होतात. त्यांनी नेमून दिलेलं नित्यकर्म करून, त्यांच्या सेवेचा मतितार्थ जाणून, त्यानुसार आपल्या साधनेला जो केंद्रीभूत मानतो तोच खरा साधक. साधकाचं साधन गुरुभक्ती आणि गुरुसेवा आणि साध्य गुरुकृपा. कारण गुरुकृपा प्राप्त झालेल्या साधकाची चिंता आणि उद्धाराचा भार हा सद्गुरू करून घेतात आणि सद्गुरूंनी दिलेल्या वाचनांना ईश्वर स्वतः बांधील असतो, हा सद्गुरू महिमा आहे. 

आपण आपली साधना नेमाने करत असताना, त्यात येणाऱ्या  अडचणी ही आपली नाही तर गुरूंची जबाबदारी आहे, हे मानून आपलं कर्म करणं आणि साधना करणं सुरू ठेवतो तो खरा साधक. अश्या साधकांचा भार गुरू नित्य वाहतात. गुरूंची महती सांगताना एकच उदाहरण देतो की शीख पंथामध्ये गुरू हाच परमेश्वर मानला आहे आणि गुरुसेवा हीच पपरमेश्वर भक्ती मानली आहे.  म्हणूनच आपल्या साधकांसाठी गुरू हाच परमेश्वर आहे आणि असला पाहिजे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/१२/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...