भोग आणि ईश्वर २४
मनाला मना सांगता का न येते
स्थिरचित्त क्षणमात्रही ते न होते
विधिलिखित होणे प्राप्त असुनी
मला या मनाचे काही न उमगते
मुळात जी गोष्ट आजपर्यंत कधीही एका ठिकाणी स्थिर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही अथवा केला असेल तर सोडून दिला असेल, ती अचानक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्याला धरून बसवणं अशक्य वाटत आहे. बऱ्याच गोष्टींची सुरवात ही खूप लहान असताना करावी. कारण त्या वयात मनसुद्धा कोवळं असतं, कुंभाराच्या मातीसारखं. त्याला जशी सवय लावू तशी ती लागू शकते, त्या वयात.
अजूनही आठवून बघा, त्या वयात शिकलेली स्तोत्र, मंत्र, सुभाषितं, कविता, काही आवडत्या लेखकांची पुस्तकं इत्यादी सर्व आजसुद्धा बऱ्यापैकी पाठ असेल आणि थोड्याश्या प्रयत्नाने पुन्हा त्याच पद्धतीने परत सुरू करू शकतो आपण. कारण मनाला जे शिकवू, त्या वयात, ते आयुष्यभर शिदोरीसारखं पुरतं. खूपवेळा अगदी एकेकदा ऐकलेलं सुद्धा लक्षात राहतं.
कारण त्या वयात व्यावधानं, व्याप, व्यवहार, व्यस्तता कमी असते. मेंदूच्या पेशीत अजून काही ज्ञान माहिती साठलेली नसते. त्यामुळे जे जाईल ते साठत जातं. कायमस्वरूपी कोरलं जातं, किंवा डेटा कमी असल्यामुळे मेंदूच्या हार्डडिस्क मध्ये जागा जास्त असते. त्यामुळे जे येईल ते साठवलं जातं आणि कमी फाईल्स असल्याकारणाने पटकन कुठलीही फाईल उघडली जाते.
कोणताही डेटा पटकन मिळतो. एकाग्रता ही मेंदूच्या व्यस्ततेवर अवलंबून असते. जसं संगणक नवीन असताना अत्यंत वेगात कार्य करतो. परंतु जसजसा हार्डडिस्कवर डेटा वाढत जातो तसतशी त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते.
मेंदूच्या याच तत्वावर आधारित संगणक आहे. आपलंसुद्धा वय वाढत जातं. माहिती वाढत जाते, आलेलं, दिसलेलं, ऐकलेलं सर्व मेंदू साठवून ठेवतो आणि योग्य वेळी त्याचा वापर करण्यासाठी ती माहिती उपलब्ध करून देतो. पण संगणक बिघडला किंवा कमी वेगात काम करायला लागला किंवा कार्य करण्याचा थांबला की आपण संगणकतज्ञाला बोलावून बघायला सांगतो. तो सर्वात प्रथम एक नेहमीचं कारण तो सांगतो की, हार्डडिस्कच्या क्षमतेपेक्षा जास्त डेटा साठवला गेला आहे.
काही अनावश्यक फाईल्स काढून टाकाव्या लागतात, काही दुसऱ्या हार्डडिस्क मध्ये किंवा पेन ड्राईव्हमध्ये साठवून संगणकातून काढून टाकाव्या लागतात. कधी कधी काही तात्पुरत्या फाईल्स जमा झालेल्या असतात, ज्या तांत्रिकपणे साठत जातात, त्या काढून टाकणं गरजेचं असतं. हे सर्व उपाय केले की कार्यक्षमता वाढते.
आपण आपल्या मेंदूच्या संकल्पनेवरून संगणक जर केला असेल तर दोन्हीच्या कार्यपद्धती आणि अकार्यक्षम होण्याच्या पद्धतीत कुठेतरी साधर्म्य वा साम्य असलं पाहिजे. म्हणजेच आपण वयानुसार, अनुभवानुसार, येत जाणारे सर्व अनुभव, छोट्यातल्या छोट्या गोष्टी, अगदी बारीकसारीक अनुभव, राग दुःख, सुख, आनंद, वाद, चिंता, काळज्या, अवहेलना, अपमान, शंकाकुशंका, मत्सर, कामवासना, विकार, नकारात्मक अविचार, अनेक अनावश्यक व शुल्लक गोष्टी अकारण साठवत जातो. ज्या तात्पुरत्या फाईल्स सारख्या असतात आणि वेळोवेळी तात्पुरता फाईल्स प्रमाणे चक्क काढून टाकणं अत्यंत गरजेचं असतं.
त्यामुळे आजचा पहिला धडा. एक स्थिर पण सुखासन करून वेळ काढून मुद्दाम सुट्टीचा दिवस निवडून बसा, एकचित्त व्हा, मनात जे येतील ते विचार येऊद्या, त्यांचा माग घेऊ नका, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका, किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. फक्त होता होईल तितकं तटस्थ होऊन त्यांना पाहण्याचा प्रयत्न करा. यामध्ये काहीही अडचण येणार नाही.
कारण आपण विचारांना थांबवत नाही वा अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. बराच वेळ, म्हणजे शक्य असेल तितका वेळ, अश्या स्थितीत बसल्यानंतर मनाला या गोष्टीचा उबग वा कंटाळा येईल. कारण मनाला अडवलं न जाण्याची सवय नाही आणि मनाचा गुणधर्म अडवल्यानंतर जास्त जोरात उसळी मारणं हा आहे.
इथे आपण त्यातील काहीच न केल्यामुळे त्याला अडथळा येत नाही आणि ही गोष्ट मनासाठी अनपेक्षित असते. त्यामुळे अनपेक्षित गोष्टीसाठी मन तयार नसतं. त्यामुळे आपण फक्त त्याला जे हवं ते करू देण्याची मुभा देत आहोत. त्याचा खेळ बघावा. ही कृती जितका वेळ आणि जितक्या वेळा शक्य आहे, तितका वेळ आणि तितक्या वेळा करून बघा आणि निरीक्षण नोंदवून ठेवा. पुढील कृती वा पायरी उद्या बघूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/१२/२०२०
Comments
Post a Comment