भोग आणि ईश्वर १४
देह आणि आत्मा यांच्यामध्ये संधीसाठी देवाने अजून एक इंद्रिय निर्माण केलं, मन. पण ते इतर इंद्रियांसारखं दिसत नाही, समजून येत नाही, कळत नाही पण कार्य करतं हे नक्की. विचार जे इच्छांना गती देऊन कार्यरत करतं. कर्म करण्यास प्रवृत्त करतं. इच्छा ज्यांचं अस्तित्व हे मनामुळे कळतं. वासना ज्या इच्छांना प्रवृत्त करतात व इच्छांच्या माध्यमातून देहाला प्रवृत्त करतात, पण ज्यांचा जन्म मनात होतो. कर्मरहीत स्थिती अस्तित्वात नाही ती मनामुळे कारण काया वाचा आणि मन तिन्ही मार्गाने केलेलं कर्म फल देणास बद्ध करतं.
म्हणजेच फक्त विचार वा विचारातून केलेलं चांगलं वा वाईट चिंतनसुद्धा माणसाला फल प्राप्ती करून देते. याचाच अर्थ आपण प्रत्येक विचार, विचारपूर्वक करायला हवा. इथे द्विरुक्ती नाही केली. तर विचार करताना एक नियम वा शिस्त असावी. कारण केलेला प्रत्येक विचार हा चिरस्थायी नोंदवला जातो आणि त्याप्रमाणे त्याचे तरंग व त्या तरंगांच्या लहरी आपलं कार्य साध्य करतात.
आता प्रत्येक विचार हा अश्या प्रकारे कार्य करतो असं आहे का, बघूया. सर्वसाधारणपणे येणारे सर्व विचार हे नोंदवले जातातच, कारण शेवटी मस्तिष्क आणि त्याअंतर्गत असणारं सुप्त मन अचाट शक्तिशाली आणि उच्चतम क्षमता असलेलं अजब इंद्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक विचार हा एक तरंग आणि त्यायोगे लहरी तयार करतो. परंतु त्याची शक्ती ही त्या विचाराच्या दृढतेवर अवलंबून आहे. जितका विचार दृढ तितके शक्तिशाली त्याचे तरंग आणि तितक्याच शक्तिशाली त्यांच्या लहरी.
आता सर्व विचार काहीतरी तरंग आणि त्यांच्या लहरी निर्माण करतात म्हणजे त्यांचे परिणाम थोड्याफार प्रमाणात होत असतीलच हे नक्की. पण त्याने कार्य साधलं जात नाही आणि इच्छित फल लाभत नाही असं सकृतदर्शनी वाटतं वा भासतं. पण भविष्यात त्याचं काही फलित होत असेलही. फक्त आज आपल्याला असं वाटतं की त्याचा परिणाम दिसला नाही. विचार मग तो कोणताही असो, काही तरंग, काही लहरी आणि शास्त्रीय भाषेत हार्मोन्स वा अंतस्त्राव निर्माण करून शरीरांतर्गत काहीतरी बदल वा परिणाम घडवतो.
शारीरिक परिणाम होतोच. परंतु लहरींचा अनंतात परिणाम होतो. कारण समस्त ब्रह्मांड लहरींवर कार्य करतं. लहरी या लहरी आहेत व असतात. गुरुत्वाकर्षण हया देखील लहरिक आहेत. अश्या सर्व लहरी अनंतात एकमेकांवर आदळून त्यांचा कुठेतरी एकत्रित परिणाम होत असतोच. पण क्षीण लहरी या फार दूरवर न जाता कदाचित विरून जात असतील, किंवा कदाचित परिणाम साधण्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत अनंतात फिरत राहत असतील. परंतु सृष्टीच्या नियमाप्रमाणे जो कमजोर व दुबळा आहे तो नष्ट होतो. म्हणजेच क्षीण लहरी नष्ट होत असणार.
आता इथे एक मुद्दा येतो की, ज्या लहरी नष्टच होणार आहेत त्या निर्माणच का होतात, निर्माणच का करायच्या. निर्माण का करायच्या या शब्दांचं आश्चर्य वाटलं ना. कारण तुम्ही म्हणाल आपल्याच मनावर आपलच नियंत्रण नाही. मग आपण कसं काय त्या लहरींना व पर्यायाने त्या विचारांना निर्माण करतो. किंवा कोण आहे जो या विचारांना वा लहरींना नियंत्रित करतो.
उद्या बघूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/१२/२०२०
Comments
Post a Comment