Skip to main content

करुणाष्टके आणि भावार्थ १.

करुणाष्टके  आणि भावार्थ १. 


।। श्रीगणेशाय नमः ।।

।। श्रीराम जयराम जय जयराम ।।


श्रीरामरक्षा आणि मारुतीस्तोत्र यांचं विवेचन झाल्यावर मला सूचना आल्या कि पुढील विवेचनाचा विषय करुणाष्टके असावी. म्हणून अभ्यासाला सुरवात करताना सर्वात प्रथम या ३४ श्लोकी करुणाष्टकांना मी खालीलप्रमाणे ५ भागात विभागलं आहे.


भाग १- श्लोक १ ते १५  - व्यथा वा विषाद वा खेद

भाग २ - श्लोक १६ ते २३  - अजाणतेपणा

भाग ३-  श्लोक २४ – आशा

भाग ४ - श्लोक २५ ते ३० – उपाय

भाग ५ - श्लोक ३१ ते ३४   -  आर्जव.


करुणाष्टके हि वास्तविक समर्थांनी आपल्या वतीने रामाजवळ केलेला आर्जव आहे. पण एक सद्भक्त म्हणून अत्यंत लीनतेने प्रत्येक ठिकाणी,  प्रत्येक दुर्गुणात, प्रत्येक विकारात, प्रत्येक वासनेत स्वतःला कल्पून व योजून समर्थ समस्त मानव जातीच्या वतीने रामाजवळ ते दुर्गुण, त्या व्यथा मांडून त्यांचा उपाय देखील सांगतात. खरतर अश्यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउली, तुकोबाराय, नाथमहाराज यांच्या समान विश्वमाऊली भासतात. 


कारण ज्यांनी रामरायाचं दर्शन घेतलंय, त्यांना आता मिळवण्यासारखं काहीही उरलेलं नसताना, मी किती दीन, पतित, दुराचारी, आत्मघातकी आहे हे वदून, त्यावरील उपाय जेंव्हा सुचवतात आणि तो योजण्यासाठी कधी दासबोध, कधी मनाचे श्लोक, कधी मारुती स्तोत्र, कधी अनेक आरत्या लिहितात आणि भ्रमित झालेल्या, थकलेल्या, शिणलेल्या, तापलेल्या, ग्रासलेल्या मनाला फुंकर घालून, चैतन्य निर्माण करून सार्थपणे मार्गदर्शक हात पाठीवरून फिरवतात, त्यावेळी ते सर्व वाचल्यानंतर आईचीच आठवण येते, इतकी समर्थांना लेकरांची, समाजाची चिंता आहे आणि रामाबद्दल दृढ विश्वास. 


धर्माची, राष्ट्राची, सनातन कार्याची ध्वजा कमकुवत वाटत असताना, त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करून स्वस्थ, सुदृढ समाज घडवत राष्ट्रउभारणीसाठी सक्षम युवा तयार व्हावेत यासाठी बालवयातच त्यांना संस्काराचा योग्य मार्ग मांडून ठेवला. करुणाष्टके हा त्यातीलच एक अर्चनेचा, प्रार्थनेचा प्रकार रचून, त्यांनी प्रत्येक मनातील न्यून पकडून ती व्यथा, योग्य प्रकारे मांडून त्यावरील उपाय सांगून सांगितला कि, मनातील करुणा आर्जव न्यून रामाला सांगा.  तो नक्की, आहे त्या स्वरूपात तुम्हाला स्वीकारून उध्दरील. हा आहे त्या स्वरूपातील म्हणजे काय तर पहिल्या ३ भागातील श्लोक क्रमांक १ ते २४. 


म्हणून हे वाचताना अशी कल्पना करूया कि, आपण एकटे एकाग्रचित्ताने श्रीरामासमोर बसलो आहोत. आपण आणि राम यांच्यात प्रत्यक्ष काळही नाही. आता मनात खोल शिरून आपल्या मनातील स्वतःविषयीचे खरे चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करूया. हे चित्र डोळ्यासमोर आणल्यावर प्रचंड विषण्णता, विषाद, खेद  कदाचित जाणवू लागेल. 


कारण समस्त विश्वातील चैतन्य या पंचमहाभुतरूप देहात साकारताना निःसंशय सर्व विश्वाची प्राणशक्ती आपल्याला दिली. परंतु आपण आपल्या संसारात रममाण होऊन, त्यावर कधीही लक्ष दिलं नाही. संसाराच्या चिंता, ताप, व्याप, जंजाळ यात स्वतःला गुंतून घेतलं. या जीवनात  येण्याचा खरा उद्देश जो जन्मतः सोहम स्वरुपात माहित होता, तो जन्माला आल्यानंतर कोहम मध्ये कधी परिवर्तित होऊन नंतर तो कोहमसुद्धा पूर्ण हरवून बसलो, ते कळलंदेखील नाही. 


कल्पना करा आपण  हात जोडून रामापुढे बसलो आहोत. फक्त राम आणि आपण. ध्यान आत म्हणजे अंतर्मनात लावून विचार एकाग्र करण्याचा प्रयत्न करतोय. चित्त स्थिर होत नाही, कारण अनेक विचार वर्षानुवर्षे मनात बाळगण्याचा ध्यास आपण करत आलो आहोत. त्यामुळे स्थिरचित्त म्हणजे काय हे फक्त ध्यान लावलं, योग केला तरच माहीत पडतं. तरीही प्रयत्न केले तर कुठेतरी सुरवात होईल हा दृढनिश्चय करूया. शांत एकाग्र होऊया आणि आता स्वतःला आठवूया, त्रयस्थ होऊन. 


अंतर्मनात डोकावून तिथून बाह्यरुपाला शोधण्याचा प्रयत्न करूया. जसं आणि जितकं होईल तितकं करत जाऊया. प्रयत्न केला कि, सध्या होईल. समर्थांनीच म्हटलंय यत्न तो देव जाणावा.  मात्र जोर जबरदस्ती न करता मनाला आत नेण्याचा प्रयत्न करूया. काहींना थोड्या प्रयत्नाने सध्या होईल. काहींना फार वेळ लागेल, काहीच नाही घडलं तरी चित्त शांत होत जाईल, काही काळानंतर. मनाचा वारू इतक्या सहजी हाती येईल असे नाही, पण शांतपणे नेटाने पण सहज प्रयत्न केले तर जमेल, हे नक्की. 


आता अंतर्मनात डोकावल्यानंतर आणि तिथून त्रयस्थपणे बाह्य रुपाला पाहिल्यानंतर जे दिसेल जे जाणवेल ते श्रीरामाला माझ्या श्रीरामाला मी सांगत आहे अशी कल्पना करा. जे डोळ्यासमोर दिसेल, जे अंतर्श्रुतींना ऐकू येईल, तो आवाज म्हणजे समर्थांची करुणाष्टके. 


परंतु आता या क्षणी फक्त मी आणि माझा राम याव्यतिरिक्त या विश्वात कोणीही नाही. श्रीराम जो पतितांचा उद्धारकर्ता आहे, सूक्ष्मातील सूक्ष्म ज्याला हृदयात दिसतं, त्याला आपल्या व्यथा, न्यून, काळज्या, उलाढाल्या, समस्या माहित आहेतच. परंतु त्यात किती चिंता सार्थ होत्या आणि किती व्यर्थ होत्या हे आज सांगणं कठीण आहे. परंतु याच मनःस्थितीचा विचार करून समर्थानी लिहिलेल्या करुणाष्टकांचा आपण मागोवा घेऊ आणि त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया,पुढील भागापासून. 


क्रमशः ....... 


भाग  १   


|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||

|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||


©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

०३/१२/२०२०

९०४९३५३८०९ wap

९९६०७६२१७९


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...