भोग आणि ईश्वर १७
मनाचा व्यापार, वावर आणि आवाका खूप मोठा असल्या कारणाने त्याचे ताळतंत्र सांभाळणं अवघड कार्य आहे. किंबहुना जाणीवपूर्वक प्रयत्न करून, मनाला आवर घालायचा प्रयत्न केला नाही, तर मन कधी तुमच्या ताब्यातून निसटून तुमच्यावर स्वार होऊन अनिश्चल, चल व अनिर्बंध मन हाच तुमचा स्वभाव होईल हे कळणार सुद्धा नाही.
त्यानंतर तो स्वभाव हीच तुमची ओळख होऊन बसते. क्षणात निर्णय बदलणं, सतत नसत्या गोष्टींचा विचार करत राहणं, वागण्या बोलण्यात सतत अस्थिरता असणं, एकसंगतीने विचार न करू शकणं आक्रस्ताळेपणा करणं, विचलित असणं या पैकी अनेक गोष्टींचा प्रत्यय अश्या व्यक्तीच्या वागण्यातून येतो.
अगदी टोकाचं वागणं हा मनाच्या अनिर्बंधतेचा प्रत्यय आहे. अश्या या मनाला या स्थितीप्रत जाऊ न देणं किंवा गेलेल्या मनाला प्रयत्नपूर्वक माघारी आणून योग्य मार्गवर लावून, मग आपल्याबरोबर घडणाऱ्या गोष्टींचं अनुमान काढणं, हे जिकिरीचं आहे वा असतं. आपल्याच मनाशी आपला संवाद असावा. मुळात आपलं ध्येय हे आपल्याला आलेल्या अनुभवावरून ताडून मग ठरवावं. भाग्य उत्तम असेल तरीही आणि भाग्य गर्तेत असेल तरीही डोक्यात हवा जाऊ नये यासाठी मन ताब्यात असणं अत्यंत निकडीचं आहे.
मनाच्या या अश्या अवस्थांमुळे माणसाला भरकटत जावं लागतं. चुकीची कर्म हातून घडतात त्याचा परिणाम संचित साठत जातं. फलित भोगता भोगता आयुष्य निघून जातं. सरतेशेवटी शेवटच्या टप्प्यावर समजतं की आता मागे जाणं अशक्य आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. मग आत्मा मनोमय कोषासोबत पुढील प्रवासासाठी, हा देह त्यागून निघून जातो. पुढे गत प्रारब्धानुसार चौऱ्यांशी लक्ष योनीतुन फिरून भोग भोगून पुन्हा थोडं पुण्य गाठीशी जोडून मानव देहात आत्मा येतो.
या सर्व प्रवासात प्राणी देह हा फक्त भोगयोनी आहे. तिथे पापाचा अर्थात वाईट कर्मांचा हिशोब चुकता करून मग क्रमाक्रमाने पायरी चढत आत्मा मनुष्य योगीत पोहोचतो. भय , निद्रा, भूक आणि मैथुन या पलीकडे आत्म्याला काही बेरीज करायला फक्त आणि फक्त मनुष्य जन्मच आहे. अति पुण्यवान आत्मा देव लोकांत जाऊन पुण्याच्या हिशेबानुसार सुख आनंद उपभोगून पुण्यसंचय संपल्यावर पुन्हा मनुष्य योनीत परत येतो.
चुका, प्रमाद, अपराध, गुन्हे, पाप, धर्माबाह्य गोष्टी मनाच्या साहाय्याने देह करतो. तो देह या जन्मीचे व आधीच्या प्रमादांचे भोग भोगून अंतकाळ आला की पुन्हा पंचप्राण त्यागून पंचमहाभूतात विलीन होतो. गत जन्मांच्या व या जन्मातील उणे वा अधिक झालेल्या चुकांचा हिशोब सोबत घेऊन, त्यांची पुनः बाकी चुकती करण्यासाठी जन्ममृत्युच्या फेऱ्यात पुढे पुढे जातो. काल किंवा आधीच्या जन्मात केलं, ते भोगून संपवण्यासाठी घेतलेल्या जन्मात, पुन्हा चुकांची भर घालून मार्ग अजून बिकट करत प्रवास अखंड सुरू राहतो. या सर्व चक्रातून वास्तविक आत्म्याला साथ देण्यासाठी नेमलेलं मन, सहा शत्रूंच्या फेऱ्यात देहाला गुंतवून अव्यापरेशु व्यापार करतं.
एक कर्ज बाकी असताना त्यात अजून कर्जाची भर टाकणं हे किती हानिकारक आहे, याचा अंदाज आता येऊ लागला असेल. पण करायचं काय आणि कसं. याचसाठी जगतपालक भगवंताने अनेक मार्ग सांगितलेत,ज्यांचा मूळ उद्देश मनाला सन्मार्गाला लावून, त्याद्वारे देहाला कार्यरत करून, चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी बंद करून योग्य ते घडवण्यासाठी माणसाला प्रवृत्त करणं हा आहे. याचसाठी योगयाग, ज्ञान, ध्यान, धारणा, नवविधा भक्ती, पूजा, अर्चना, प्रार्थना, शरणागती, नमस्कार, व्रतं, वैकल्य, नेम, संकल्प, भजन, कीर्तन, इत्यादी अनेक मार्ग सांगितले.
या सर्वांचा उद्देश सतत मनाला स्मरण करून देत राहणं की, तुझ्या भाग्याचे भोग भोगता भोगता वा पुण्याचा हिशोब चुकता करता करता तुला तुझ्यातील आत्म्याच्या उन्नतीसाठी कार्यरत राहायचं आहे. या सर्वांचा साक्षीदार असलेल्या परम दयाळू ईश्वराला साद घालून, पुढील भोग भोगण्याची शक्ती आणि सुखोपभोग आले तर ते ताकदीने पेलून, मूळ उद्देशाचा
विसर न पडता, त्या ईश्वराचं स्मरण करत राहणं, हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे वा असावी.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/१२/२०२०
Comments
Post a Comment