भोग आणि ईश्वर ४
आयुष्यात येणारे भोग हे योगायोगाने येत नाहीत तर ते येण्याचा योग आपणच कधीतरी मागे (कदाचित या जन्मी वा गतजन्मांत) लिहून ठेवलेले असतात. काही उदाहरणं दिली तर कदाचित हा मुद्दा तुम्हाला पटेल.
जन्माला येताना असं कोणतं कर्म लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, धीरूभाई अंबानी, इत्यादींनी केलं होतं, की ते इतकी मोठी कर्मगंगा घेऊन जन्माला आले. कर्मगंगा यासाठी म्हटलं की, काही जण म्हणतील की यात त्यांच्या कष्टाचं मोल कमी होत नाही का?.
म्हणून कर्मगंगा. म्हणजे इतके कष्ट झेलून, यशस्वी होऊन, दिगंतात कीर्ती मिळवू शकले ते त्या कर्मगंगेच्या जोरावर. पण ते करण्यासाठीचा जन्म हा त्यांच्या मागील कित्येक जन्मातील पुण्याईचं फलित आहे. म्हणून आपण कर्मगंगा हा शब्द वापरू अश्या सर्व लोकांच्या बाबत.
कारण कर्म, करून कष्ट, त्रास अनेक जण त्या त्या क्षेत्रात सहन करतात. परंतु त्यात यशस्वी होऊन कीर्ती, मान सन्मान मिळवणं हे अतिदुर्लभ भाग्य यांच्या कर्मांना मिळालं.
छत्रपती शिवाजी महाराज. अत्यंत थोर, कर्मनिष्ठ, सर्व काही स्व कष्टाच्या बळावर प्राप्त केलेले. परंतु त्यांना योग्य वेळेला योग्य त्या व्यक्ती मिळाल्या व तल्लख बुद्धीच्या बळावर त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आखलेल्या योजना, जशाच्या तश्या यशस्वी होत जाणं, हे भाग्य त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फलित.
अश्याप्रकारे पूर्वसंचिताचा लाभ जन्मतः मिळून या जन्मातील कर्मगंगा साध्य होणं इतकं पूर्वसुकृत गाठीला बांधता येणं हे आपल्या बुद्धीवर, विचारांवर व शुद्ध स्वच्छ व सात्विक मनावर अवलंबून आहे. त्यासाठी मुळात वृत्ती व शील शुद्ध असणं महत्वाचं आहे. त्यासाठी विचारांची पक्की बैठक असावी लागते. मनाचा तोल कोणत्याही प्रलोभनाने, मोहाने, लोभाने धळता कामा नये आणि विचारांना विकार लागून ते कधी मलीन होता कामा नयेत.
बाह्य जगतासाठी तुंम्ही कोण आहात याने काहीही फरक पडत नाही. पण अंतर्मनात शुद्धता ही शंभर टक्के असावी. ती तशी असण्यासाठीच संचितात पुण्य गाठीशी असावे लागते. तसे पुण्य जोडण्यासाठी व संचिताचा टाकाऊ भार कमी करण्यासाठी भगवंताची कृपा असणं महत्वाचं आहे. अशी कृपा मिळवायला सतत त्याच्या जवळ वा समीप असणं गरजेचं आहे.
आता भगवंताच्या समीप असणं म्हणजे देवळात जाणं नसून मनात त्याची आठवण सतत करत राहणं. आता एखाद्याची आठवण सतत करणं म्हणजे काय तर त्याच्या नावाचा पुकारा सतत करणं. आपल्याला एखादी व्यक्ती हवी असेल तर आपण त्याचं नाव घेतो. इथे ईश्वर आत्मरूपाने हृदयाच्या अत्यंत समीप असताना मुद्दाम मंदिरात जाऊन शोध घेणं किती चुकीचं आहे हे वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही.
मग माझ्या संचितात मीच साठवून ठेवलेली नकारात्मक गाठोडी मलाच सोडवून त्यातील सलणारं, त्रासदायक व तापदायक भांडवल कमी करावंच लागेल. परंतु हे साध्य करणारे मार्ग कोणते आहेत हेदेखील बघावंच लागेल.
बघूया पुढील भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/१२/२०२०
Comments
Post a Comment