Skip to main content

भोग आणि ईश्वर २०

भोग आणि ईश्वर  २०
  
आतापर्यंतच्या सर्व भागात अजूनही मी कोण याचा पुरेसा उलगडा झाला नसेल, अस मानून, पुन्हा एकदा थोडा वेगळा विचार वा वेगळं चिंतन करूया.

अनेक स्तोत्रात, मंत्रात देवाविषयी लिहिताना जे लिहिलं जातं, त्यातील अथर्वशीर्षातील प्रातिनिधिक समजून विचार करूया. त्वमेव केवलं कर्तासी, धर्तासी, हर्तासी,त्व साक्षादात्माऽसि नित्यम्, त्वं प्रत्यक्षं ब्रम्हासी, त्वं मूलाधारस्थितोसी नित्यम, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति,सर्वं जगदिदं त्वयिलयमेष्यति,सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. याचा अर्थ  विस्तारपूर्वक लिहिता येईल, पण आता याचा संक्षिप्त अर्थ पाहूया.

तूच कर्ता, धर्ता, हर्ता म्हणजे करणारा, धरणारा आणि हरणारा. म्हणजे तूच कार्य करता व करविता आहेस, तूच जगाला धारण करणारा आहेस आणि तूच संकट हरण करणारा आहेस. तूच स्वतः प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस, अर्थात ब्रम्ह म्हणजे सर्व ब्रह्मांड तूच आहेस. सर्व जगात तुझंच अस्तित्व आहे, सर्व जग तुझ्या ठायी आहे, सर्व जग तुझंच प्रतिरूप आहे, सर्व जगात तुझाच प्रत्यय येतो आहे.

या सर्वातून लक्षात येणारा अर्थ म्हणजे तूच तू सर्वत्र आहेस, तुझाच प्रत्यय सर्व जगातील चल अचल वस्तूंमध्ये आहे आणि सर्वत्र तुझाच वास आहे, सर्व जग तुझं प्रतिरूप आहे. या सर्वाचा अर्थ या चराचरात तूच तू आहेस. म्हणजे सर्व जीवितातील आत्मतत्त्व रुपात नित्य विराजित तूच आहेस. याचा अर्थ आपल्या सर्वांमध्ये स्थित आत्मा हा एकाच ईश्वराचं अस्तित्व आहे.

इथे खरतर सर्व प्रश्न मिटायला हवेत. पण इथे प्रश्न निर्माण होतात. जर सर्वत्र तोच आहे, तर मग हे भेदाभेद, भिन्नता, सकारात्मक नकारात्मक, मानव असुर, नशीब प्रारब्ध इत्यादी सर्व चक्रावून टाकणाऱ्या समस्या, जन्ममृत्यचं चक्र हे निर्माण कसं होतं. इथेच विचारांची गती खुंटते. मुळात हे लक्षात घ्या की, ते चिरंतन आत्मतत्त्व हे तेजोरूपात संपूर्ण ब्रह्मांड व्यापून उरलं आहे. त्यामुळे ते येतही नाही आणि जातही नाही.

ज्या ज्याक्षणी प्राप्त परिस्थिती आणि संचिताची सोबत एकत्र येते, त्यावेळी संचित भोगण्यासाठी पंचनहाभूतरूप देहाची निर्मिती होऊन, त्यात हे अविनाशी तत्व, आत्मरूपात, प्रकट होऊन, नवीन जीव जन्माला येतो. हे तत्व पूर्वी दुसऱ्या एका देहाचा भाग होतं. ते योग्य वेळेसाठी काळाच्या उदरात फिरत असतं आणि कर्मगतीनुसार, योग्यवेळ येताच, ते योग्य त्या उदरी धारण होऊन, पुनः एकवार भुवर, नवीन देहात स्थापित होऊन, अर्धवट राहिलेला डाव नवीन देहात सुरू करतं.

आता जर तो आत्मा अंश ईश्वराच्या तेजाचा अंश आहे मग हा काय खेळ आहे. देवाचाच अंश आहे तर मग हे सर्व का. याचं खूप महत्वाचं कारण हे की ही चैतन्यशक्ती ज्या देहात स्थापित होतं त्या देहाचे गुणधर्म धारण करते. कारण या देहाचं विशेषत्व हेच आहे की जे आत येईल ते या देहानुसार परिवर्तित होईल. याच तत्वानुसार जे या देहाशी जुळवून घेत नाही ते देहाबाहेर फेकलं जातं. अन्नातील दोष असेच शरीराबाहेर फेकले जातात. 

पण याचमुळे हे तत्व देहाला फक्त शक्ती देऊन कार्य करण्याचं चैतन्य प्रदान करतं. पण देहाच्या कार्यात काहीही ढवळाढवळ करत नाही. याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे तीच वीज परंतु गीझरमध्ये गेल्यावर गरम पाणी देतं आणि फ्रीजमध्ये गेल्यावर थंड पाणी देतं. म्हणजेच त्या चैतन्याचा उपयोग आपण जसा करून घेऊ,  तसं कार्य करायला ती चैतन्यशक्ती सहाय्य करेल. हेतू, इच्छा, कर्म, प्रयत्न, श्रम, मेहनत त्या देहाची व देहातील माया मोह आदि साथ देणाऱ्या रीपूंची आणि शक्ती त्या चैतन्याची, फक्त विजेसमान उपकरणाच्या गुणधर्मानुसार कार्य करणार. 

बघूया उद्या पुढे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...