Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०

भोग आणि ईश्वर  ३०
   
गुरुकृपेचा महिमा अपरंपार आहे आणि गुरूंची महती अनंत आहे. प्रारब्धाच्या भोगातून ईश्वरसुद्धा वाचवू शकत नाही. परंतु त्या भोगातून सुटका करण्याची अथवा त्या भोगाचा ओघ कमी करण्याची अपार शक्ती सद्गुरूंकडे आहे. कारण गुरू हा करुणेचा सागर आणि कृपेचा सिंधू आहे. सद्गुरूंकडे फक्त क्षमा, सुख, समाधान, शांती आहे आणि याचीच साधकाला जरुरी असते.

आपण भोगाच्या वाटेवर असताना भोग भोगण्याचा एक विकल्प मनुष्याकडे असतो. पण मनुष्य योनी सोडून बाकी सर्व योनींमध्ये फक्त भोग हा एकच विकल्प आहे. मानवाला अफाट बुद्धी, मनाची अनंत शक्ती आणि कोहम ते सोहम पर्यंत जाण्याची क्षमता आहे.  मुळात मी त्रस्त का आहे हे जाणण्याची जिज्ञासा माणसाला सुटकेच्या जवळ पोहोचवते, मात्र इच्छा उत्पन्न व्हायला हवी. 

परंतु या नंतरची वाटचाल ही भोगमुक्तीकडे व्हायची असेल तर सर्वात सुलभ मार्ग म्हणजे सद्गुरू कृपा आणि पूर्ण शरणागती. सद्गुरू यासाठी की आपल्याला काहीच माहित नसलेल्या वाटेवर मार्गक्रमण करणार आहोत आणि सद्गुरू हे त्या वाटेवर जाऊन त्याचा अनुभव घेऊन स्वतःला त्यातून सोडवून आणलेले असतात. त्यामुळे त्याच्या खाचाखोचा, अडचणी हे सर्व ते जाणत असतात. त्याशिवाय प्रत्येक साधकाची वृत्ती, भोग इत्यादींची पूर्ण माहिती व जाण त्यांना असल्यामुळे, प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या पद्धतीने योग्य मार्गवर ठेवण्याची कला वा हातोटी त्यांना ज्ञात असते. 

सद्गुरुकृपा हा एक अनंताचा विषय आहे. गुरुकृपेने प्रत्यक्ष पर्वत उचलण्याची शक्ती प्राप्त होते. परंतु ही गुरुकृपा प्राप्त कशी व्हावी. गुरुकृपा प्राप्तीसाठी गुरूला संपूर्ण शरण जाणं हा एकच उत्तम उपाय. आता संपूर्ण शरणागती म्हणजे काय तर मी चा पूर्ण विसर, स्वत्वाचा स्वाहाकार, अहंचा त्याग. शरणागती म्हणजे मला काही सांगायची, मागायची जरुरी नाही. 

मी हा गुरुमय करणे म्हणजे सर्व कर्ता धर्ता आणि हर्ता गुरू आहेत हे आत्म्याने मनाला समजावून सुप्त मनापर्यंत ते पोहोचणे. इतके की साधनेच्या मार्गात व काळात काही वाईट घडल्यास तीसुद्धा गुरुकृपा आहे असे मानून त्यातून काही योग्य घडणार आहे आणि ते सद्गुरूंना माहीत आहे म्हणून त्यांनी घडू दिले. इतके स्वतःशी प्रामाणिक व सद्गुरूंशी निष्ठावान राहणे जमले पाहिजे.

संपूर्ण शरणागती म्हणजे प्रार्थना करणे की हे गुरूवर आता आपल्या पायावर एकदा डोकं ठेवलं आहे, आता आपण तारा किंवा मारा, पण कोणत्याही स्थितीत हे चरण सोडून जायला सांगू नका. गुरूआज्ञा पालन हा शरणागतीचा दुसरा घटक आहे. गुरूआज्ञा पालन म्हणजे गुरूंनी सांगितलेले साधन वा नाम पूर्ण प्रामाणिकपणे करणे. शरणागतीचा तिसरा घटक म्हणजे तुलना न करता साधन करत राहणं. म्हणजे अमक्याला मिळालं मला का नाही, हा विचार न येऊ देणे. तुला न मिळण्यात काहीतरी कारण असेल आणि ते सद्गुरू जाणतात, त्यामुळे त्यांना ठरवू दे की, कधी तुझा नंबर लावायचा.

शरणागतीचा चौथा घटक म्हणजे अटीरहीत साधन करणं. सदुगुरूंना अटी घालून त्यांना संकटात न टाकणं. सद्गुरू हे कृपावंत आहेत व असतात. त्यांना मागायची वा अटी घालायची गरज नसते, ते सर्व जाणतात. अमुक द्या तर नाम घेईन, तमूक द्या तर इतकं करीन ही भाषा कोणत्याही सद्गुरूंना रुचत नाही. 

गुरू हे कसलीही कमतरता नसलेले असतात. त्यांना तुमच्याकडून काहीही जरुरी नसते. नाम वा साधन हे सुद्धा आपण आपल्यासाठी करतो त्यांना त्यातून काहीच मिळवायचं नसतं हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून फक्त इच्छा मनात धरून नामात राहणे हे आपलं कार्य आहे. सद्गुरू तुमच्या हृदयात नित्य आहेत. त्यामुळे ते तुमच्या इच्छा जाणतात. त्यातील योग्य त्या ते पूर्ण करतील. 

अजूनही काही गोष्टी आहेत ज्या पुढील भागात बघूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/१२/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...