Skip to main content

भोग आणि ईश्वर २६

भोग आणि ईश्वर  २६
   
मनाच्या नकाराविरुद्ध वागून बघण्याच्या प्रयोगातील दुसरी पायरी पाहिली ती म्हणजे जे आवडत नाही ते करून बघणं. त्याआधी शांत बसून मनाचा खेळ पाहिला. आता पुढे आपण एक नवीन प्रयोग करूया. पण त्याआधी हे सर्व का करायचं व  भोग आणि ईश्वर या शिर्षकाखालील मालिकेशी याचा संबंध काय याचा जरा विचार करूया. कारण काही जणांनी शंका काढली, व्यक्तिगत माझ्याशी बोलताना की, विषयांतर तर होत नाही ना, म्हणून जरा खुलासा.

मुळात आपण आपल्या भोगांबद्दल बोललो त्यावेळी हा विचार केला की, जे येईल ते स्वीकारून पुढे जायचं आणि तद्नंतर यावर उपाय काय हे बघायचं. पण मुळात या खेळात मन हेच एक महत्वाचं माध्यम आहे, जे आपल्याला जीवनात सर्व बाबतीत मदत करतं किंवा खोडा घालतं. उत्साह, आळस, मोह, मद, मत्सर, निराशा, आशा, घाई, शांतपणा, राग, क्रोध, वासना यासह विविध भावाअवस्था असलेल्या मनाला क्षणात वेगळ्या वाटेवर नेणं किंवा पटलं तरी कार्य करण्यास कचरणाऱ्या वा कृतीस साथ न देणाऱ्या मनाला, प्रवृत्त करण्यासाठी, त्याला नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. तरच जे पटतंय त्यावर मार्गक्रमणा करण्यास ते साथ देईल. कारण इच्छा आणि कृती यामध्ये मन हे अशी कळ आहे की जी दाबताच अनेक उपकरणं चालू होतात. 

मनाच्या याच खेळात आता पुढची पायरी आहे, आवडणाऱ्या पण अहितकारक गोष्टी न करणे. उदाहरणार्थ आपल्याला मधुमेह नाही हे गृहीत धरून सांगतो. जर आपण ६ ते ७ गुलाबजाम खाऊ शकतो आणि तशी इच्छा आणि क्षमता आहे तर, जाणूनबुजून १ किंवा २ कमी खाणं. हे जाणीव पूर्वक करायचं,जेणेकरून हळूहळू यात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीत आपला अधिकार हा अंतिम राहील, मनाचा नाही. 

आता हे ठरवायचं कसं. तर साधारण छानछोकी, मनमुराद पणे जगणं, अमर्याद वागणं या सर्व गोष्टीत कुठेतरी वासना चाळवली जाऊन पुढे ती आपली सवय बनते आणि नंतर मग आवश्यकता. म्हणून तो नियम होणार नाही यासाठी ही पूर्वतयारी. या पुर्वतयारीचं कारण असं की, ज्यावेळी आपण मुख्य मार्गावर जाऊ, म्हणजे नाम वगैरे, त्यावेळी आपलं मन, आपल्या आत्म्याच्या इच्छेने कार्य करेल. नेटाने ते सत्कर्म करता येईल. धरसोड वृत्ती वेळीच आवरली जाईल. 

या तीन पायऱ्या, (म्हणजे शांत बसून मनाचा खेळ पाहणं, नको असलेल्या पण हितकारक गोष्टी मुद्दाम करून बघणं आणि हव्या असलेल्या पण अहितकारक गोष्टी टाळणं वा कमी कमी करत आणणं), पार केल्यानन्तर पुढे मनाला स्वस्थ बसवून त्याला आपल्या मर्जीचे विचार करायला लावणं.  यासाठी पुन्हा पहिल्या प्रयोगाकडे वळावं लागेल. त्या प्रयोगात आपण मुक्तपणे येतील ते विचार करू दिले. आता त्यातील एखादा चांगला अर्थात योग्य, सकारात्मकआणि सन्मार्गी विचार धरून त्याच्या मागे जाणं.

उदाहरणार्थ अनेक विचारात एखादा विचार असाही असू शकेल की, मी कोणत्यातरी छानश्या मंदिरात गेलोय वा एखाद्या शांत स्थळी मी गेलोय. आता या विचाराला धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया आणि अशी कल्पना करूया 
की त्या ठिकाणी त्या मंदिरात आपण कल्पनेत छान पूजा अर्चा केली आहे, त्या देवाचं वा मूर्तीचं मनोभावे मनसोक्त आणि आपल्याला वाटेल तितका वेळ दर्शन घेत उभे आहोत. कारण बरेचदा प्रत्यक्षात असं दर्शन गर्दीमुळे शक्य होत नाही आणि सध्या कुठे जाणं धोकादायक पण आहे. 

याच दर्शनसुखाचा आनंद आपण घेऊ आणि त्यात मनाला सामील करून घेऊघेण्याचा प्रयत्न करूया. तद्नंतर आपण त्या ठिकाणी ध्यान लावून शांत बसलो आहोत. नित्य जप जो करतो तो त्या अवस्थेत करत त्या मंदिरात वा तिर्थस्थळी बराच काळ व्यतीत केलाय. हा अनुभव घेऊन बघा.  यात खूप महत्वाचं सूत्र म्हणजे असा विचारधागा धरूया जो मनात व देहात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. त्या ऊर्जेची जाणीव हळूहळू होईल, योग्यवेळी. परंतु आपण निदान आपल्या मर्जीने, आपल्या मर्जीचे विचार करायची सवय मनाला लावू. 

आता एक लक्षात घ्या पहिले तीन प्रयोग प्रयत्नपूर्वक केले की आपल्याला जाणवेल की जे मन नाकारतंय पण हितकारक आहे ते आपण हळूहळू त्याला स्वीकारायला लावू शकतो आणि जे त्याला हवंय पण अहितकारक आहे ते नाकारायची सवय आपण हळूहळू मनाला लावू शकतो.
हे घडल्यावर आणि पहिल्या पायरीनुसार मनाचा मुक्त खेळ
पाहून त्याचा अभ्यास केल्यानंतरच आजची चौथी पायरी ओलांडणं हितकारक आहे. 

बघूया पुढील भागात पुढची पायरी. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/१२/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...