Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१

भोग आणि ईश्वर  ३१
   
पूर्ण शरणागती ही मन आत्मा आणि शरीर या तिन्हीद्वारे पत्करून अनन्य भावे गुरूंना शरण जाऊन फक्त लीनपणे नमन करून आपली व्यथा, चिंता, काळजी त्यांना सांगायची, जर काही चूक घडली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची. आपली  नित्य साधना मात्र अखंडपणे सुरू असावी, त्यात खंड नको आणि सुटकेसाठी मनोभावे प्रार्थना करावी. सद्गुरू हे योग्य असेल तेच करतील. 

आपली प्रार्थना, आपली इच्छा आणि आपल्या मनाची शक्ती श्रद्धेद्वारें आपल्या सद्गुरूंपर्यंत पोहोचते. श्रद्धेची ताकद ही देहाहून अधिक असते. त्यामध्ये दृढता आणि संकल्प असेल तर भगवंतालादेखील बोलावण्याची शक्ती व क्षमता ही श्रद्धेत असते. आपल्या श्रद्धेच्या तरंगलहरी गुरूंच्या हृदयापर्यंत पोहोचतात. त्यांना त्या स्पंदनातून आपल्या मनातील व्यथांची जाणीव होते.

तसं त्यांचं आपल्याकडे लक्ष असतंच. त्यामुळे त्यांना सर्व ज्ञात असतं. परंतु आपल्याकडून वदवून घेण्यामागे पूर्ण शरण जाण्याचा भाव मनात आला पाहिजे, इतकाच हेतू त्यामागे असू शकेल. यात आपले भाव शुद्ध होऊन भक्तीमध्ये अनन्यता येते. ज्ञान माणसाला अधिक अधिक वर नेतं. परंतु त्याचबरोबर अहं वाढायची शक्यता असते. परंतु सद्गुरूंकडे शरणागत झाल्यावर आपल्याला आपले पाय जमिनीवर ठेवण्यास मदत होते. 

सद्गुरुंच्या कृपाप्रसादाला तोड नाही. जो साधक, सद्गुरूंनी सांगितलेली साधना वा सद्गुरूंनी दिलेला मंत्र, नित्य जप करून, साधनेत असतो, त्याला एकदा शरणागत झाल्यानंतर पुन्हा काही वेगळं सांगावं लागत नाही. अश्या साधकाकडे आणि त्याच्या साधनेकडे सदुगुरूंचं पूर्ण ध्यान असतं. अश्या साधकाची नित्य चिंता वाहण्याचं काम सद्गुरू करतात. 

साधना ही साधकांचा प्राण असली पाहिजे. म्हणजेच कोणत्याही स्थितीत व मनाच्या कोणत्याही अवस्थेत साधना सुटता कामा नये. मुळात कलियुगी नित्य आणि शाश्वत साधना म्हणजे नामस्मरण हेच आहे आणि नामस्मरण देहाच्या व मनाच्या कोणत्याही अवस्थेतमध्ये घेता येते. त्याला कोणतीही बैठक, आसन, योग वा कर्मकांड लागत नाही. मुळात ते शुद्ध व पवित्र आहे त्यामुळे त्याला कोणत्याही विधीची वा सोपस्काराची काहीही आवश्यकता नसते.

साधना हे साध्य नसून त्याने एकाग्रता व मनाची शांतता साधता येऊन ईश्वराकडे मनाचा ओढा वाढला पाहिजे हे मुख्य साध्य आहे. कारण ज्या परम ईश्वराची आराधना वा साधना वा स्मरण आपण करतो त्याची आपल्याला ओळख नसली तरीही आपल्या सद्गुरूंना त्याची पूर्ण ओळख असल्याकारणाने ते आपल्या हातून योग्य ते घडवून घेतीलच, परंतु संकल्प हा आपला व इच्छाशक्ती आपलीच असावी लागते. त्या संकल्पाला, इच्छेला व इच्छेच्या शक्तीला बळ देण्याचं काम सद्गुरुच करतात. त्यामुळे सद्गुरू हे आपल्या ध्येयाचे प्रेरक व साधनेचे कर्ता करविता आहेत. 

अनेक साधना, उपासना, जपजाप्य, नामस्मरण करण्यापेक्षा एकच साधन व एकच साधना करावी. अन्यथा एक ना धड भराभर चिंध्या तशी गत व्हायची. प्रत्येक देव हा एकाच तत्वाचा आणि प्रत्येक गुरू एकाच गुरूतत्वाचा अंश आहे. त्यामुळे सर्वत्र पाहताना आपण करत असलेल्या साधनेचे तत्व विराजित आहे, हे जाणून, सर्वत्र त्याचेच अस्तित्व आहे हा भाव मनात कायम असावा. 

पण आपण मानलेले गुरू नाहीत असा भाव ठेवून एखाद्या ठिकाणी जाणं वा नमस्कार करणं टाळू नये. त्यामुळे आपण एकप्रकारे आपल्याच गुरूंचा मान ठेवत नाही हे लक्षात घ्या. कारण सरतेशेवटी गुरुतत्व एकच आहे, फक्त भिन्न देही प्रकट झालेले. म्हणून कोणत्याही इतर गुरू वा महाराज यांच्या तीर्थस्थानी गेल्यावर आपण आपल्या  गुरुस्थानी आहोत असेच मानून आपली उपासना करावी. ज्या ठिकाणी तुम्ही आला आहात ते गुरू वा महाराज हे विशाल दृष्टीचे असतात. त्यामुळे ते सर्व जाणतात व ते समजून घेतील.

 पुढील भागात बघूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३१/१२/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...