भोग आणि ईश्वर २३
आपल्याला बऱ्याचश्या गोष्टी कळतात, काय करावं हे देखील कळतं. पण मन हे असं रसायन आहे की ते काही केल्या बऱ्याचश्या गोष्टी करू देत नाही. मुळात मन शांत रहात नाही. हीच मोठी समस्या आहे. मनाला अनेक जणांनी अनेक तऱ्हेने समजावून, कश्या प्रकारे त्याला शांत करून, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा, याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. यात सर्वात मोठं योगदान आहे ते समर्थ रामदासस्वामी यांचं.
त्यांच्या मनाच्या श्लोकांचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की किती तऱ्हेने त्यांनी मनाचा अभ्यास करून, मनाच्या सर्व भावावस्था जाणून, मनाची चलबिचल, तगमग, ओळखून त्याला आपल्या वचनांनी समजावून, चुचकारून, अंजारून गोंजारून पदोपदी त्याला मित्रासम वागवून प्रसंगी त्याला दटावून , धाक भीती दाखवून आपल्या इप्सितासाठी अर्थात आपल्या सद्इच्छेप्रमाणे त्याला कार्यास लावून सन्मार्ग, सुसंगती या माध्यमातून अंतिम उद्देशाप्रत नेऊन एक आदर्श व्यक्तित्व म्हणून कसे घडावे याचं उत्तम विवेचन व विश्लेषण करून मार्ग देखील सांगितले आहेत.
खरतर त्यातील उपदेश अंमलात आणला तर माणसाचं आयुष्य सकारात्मक होऊन, स्वऊर्जेचा योग्य मार्गाने वापर करता येऊ शकेल. परंतु मुळात आपणच आपल्या मनाला बऱ्याच वाईट व चुकीच्या सवयी लावून ठेवल्यात, ज्या आता सुटत नाहीत आणि आपण सुधरत नाही. दुसरी खूप मोठी समस्या म्हणजे एकाग्रता येत नाही. कारण आपण तशी बैठक कधी केली नाही.
खरतर आपल्या धर्मात स्तोत्र पठण, भजन, कीर्तन, सणवार, व्रत वैकल्य, पूजाअर्चा, मंदिरात जाणं या सर्व गोष्टी करण्या मागचं प्रयोजन मनाला काही विशिष्ट नियम पाळण्याची सवय लागावी, ठराविक वेळी ठराविक गोष्टी केल्यामुळे त्याचे फायदे कळावेत आणि अश्या नियमबद्ध आयुष्यातून आपलं मन एकाग्रतेकडे नेऊन त्याला जीवनाचा खरा उद्देश समजून त्यावर अंमल करताना सहजता यावी हे आहे.
या मूळ प्रयोजनाची आखणी केली त्यावेळी राहणीमान, जगण्याच्या पद्धती, मिळकत व खर्च यांची साधनं, प्रवासाच्या सोयी व त्याची साधनं, यांची मर्यादा या सर्व गोष्टी ध्यानात घेण्यात आल्या होत्या. त्या सर्व गोष्टी आज जश्याच्या तश्या अस्तित्वात नाहीत. किंबहुना त्यातील कोणत्याच गोष्टी आज शक्य नाहीत. कामाच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती, पेहराव, खाणं पिणं या सर्व गोष्टी सर्वस्वी भिन्न झाल्या आहेत. म्हणजे त्यावेळी असणारी संस्कृती ही आजच्यापेक्षा पूर्णतः भिन्न आहे.
मनःशाती व मनस्वास्थ्य मात्र त्या काळापेक्षा शतपटीने भंग पावली आहे. त्यावेळी प्राप्त परिस्थिती व वातावरण यामुळे शांतता सहज प्राप्त होत होती. ध्यान धारणा, जप जाप्य या गोष्टी प्रामाणिकपणे व नेटाने केल्या जात. आज त्यातील बऱ्याच गोष्टी शोधून सापडणार नाहीत आणि करायचं ठरवलं तरी करता येणार नाही. कारण मधल्या काळातील राष्ट्रीय व सांस्कृतिक आक्रमणांमुळे जीवन जगण्याच्या, कमावण्याच्या पद्धती पूर्णतः बदलून गेल्या आहेत. या कारणाने पूर्वीच्या काळातील मनःस्वास्थ्याचे , एकग्रतेचे अनेक मार्ग प्रत्यक्षात अंमलात आणता येतील का हे शंकास्पद आहे. रूढी, परंपरा, संस्कार, शिक्षणाच्या पद्धती, कमाईची साधनं व पद्धती या सर्व बदलून बरच परिवर्तन घडून आलं आहे. या सर्वांचा संयुक्तिक परिणाम म्हणजे आपण मनःस्वास्थ्य कमालीचं गमावून बसलो आहोत.
त्यामुळे आधी हे मनःस्वास्थ्य परत मिळवण्यासाठी काय करता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण तीच सर्वांची पहिली पायरी आहे. पुढील भागात याचा विचार करूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/१२/२०२०
Comments
Post a Comment