Skip to main content

भोग आणि ईश्वर ३

भोग आणि ईश्वर  ३

आम्हाला भोग भोगावे लागले की आम्ही म्हणतो ईश्वर नाही दया माया झूठ आहे. जेंव्हा सुख उपभोगतो तेंव्हा म्हणतो की पूर्वपुण्याई व पूर्वकर्म यांचं फलित आहे. हे असे विचार प्रत्येकाच्या मनात येतात. आपण ईश्वराचं अस्तित्व दुःखाशी जोडतो. म्हणजे माझं कर्म योग्य होत, मी या आयुष्यात काहीही गैर केलं नाही, , पण ईश्वराने आपलं अस्तित्व दाखवलं नाही, म्हणून दुःख आयुष्यात आलं. पण जे काही थोडाफार मी चांगलं कर्म केलं त्यामुळे मला चांगल्या कर्माचं थोडं तरी फळ मिळालं. 

ईश्वर हा नेहमी दुसऱ्यावर कृपा आणि माझ्यावर अन्याय करतो, ही आपली धारणा असते. कारण आपण स्वतः काही वाईट केलं, असं स्वीकारत नाही वा स्वीकारायला तयार नसतो. आपली चूक वा वाईट कर्म स्वीकारायला एक अहंगंड आड येतो. हा अहंगंड विचारात येतो तो आपल्याच कर्माचा परिपाक आहे. 

खरतर युगापूर्वी प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन कर्मसिद्धांत मांडला. तोदेखील रणांगणात युद्ध थांबवून.  स्थळ काळ योग्य होतं की अयोग्य, ते माहीत नाही. पण यात एकच विचार करा की, युद्धप्रसंगात सुद्धा भगवंत शांत चित्ताने अत्युत्तम शिष्याला, जो त्यांचा भक्तसुद्धा आहे, त्याला एकटं सोडत नाहीत आणि चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाहीत. इतकं ते आपल्याला प्रिय व्यक्तीला सांभाळून घेतात.

मग आमच्यासाठी का येऊ शकत नाहीत. याचं महत्वाचं कारण म्हणजे, दृढ श्रद्धा, विश्वास आणि संपूर्ण शरणागती. अर्जुन त्या बिकट परिस्थितीतसुद्धा आपल्या मनातील भाव बोलायला घाबरला नाही की स्तंभित झाला नाही. त्याला कोणताही किंतु कृष्णाबद्दल नव्हता. त्याला पूर्ण विश्वास होता की, मी काहीही बोललो तरीही माझा मित्र असलेला हा कृष्ण मला टाकून बोलणार नाही, माझा अपमान करणार नाही वा मला नाराजदेखील करणार नाही. 

इतका ठाम विश्वास श्रद्धा आणि दृढता असायला हवी. प्रत्यक्ष युद्ध थांबवून, काही वेळ काळाची गती रोखून भगवंताने अर्जुनाचा विषाद तर दूर केलाच परंतु त्यानिमित्ताने जगताला अत्युच्च विचारांची देणगी दिली. युद्ध पुढे गेलं तरी चालेल पण माझा अर्जुन अश्या स्थितीत युद्धाला उतरता कामा नये. 

केवढी विलक्षण घटना आहे. अठरा अक्षौहिणी सैन्य प्रतीक्षेत आहे, असुदे, भीष्म, द्रोण, युधिष्ठिर, शल्य, कृपाचार्य, अभिमन्यू, अश्वत्थामा यांसारखे वीर खोळंबले आहेत असुदे. पण माझा अर्जुन जोपर्यंत शंकामुक्त होत नाही तोपर्यंत हे युद्ध सुरूच होऊ देणार नाही.

आपल्या संदर्भात या सर्व गोष्टी आपण ताडून पहाव्या. ज्या ज्यावेळी खरा समरप्रसंग येतो, त्या त्यावेळी आपण इतक्या उत्कटतेने देवाचा धावा करून त्यावर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवतो का. अर्जुन होऊ शकतो का. कृष्ण वा परमात्मा हा आपलादेखील आप्त, सखा, मित्र, हितचिंतक आहे, हे मनात दृढपणे धरले आहे का. यालाच धारणा म्हणतात. 

आपली अशी धारणा असेल तर ईश्वर नक्की परिस्थितीनुसार आपल्या पाठीशी उभा राहतो. आपली श्रद्धा दृढ हवी, इच्छाशक्ती तीव्र हवी, प्रयत्न प्रामाणिक हवेत आणि पूर्वसुकृतानुसार घडणारे स्वीकारण्याची तयारी असावी. यानंतर ईश्वरी प्रेरणा नक्की आपल्या शक्ती व श्रद्धेनुसार आपल्याला मदत करेल. अर्थात कार्य सद्हेतुने प्रेरित असावे, मार्ग सापडेल हे निश्चित. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...