Skip to main content

भोग आणि ईश्वर १६

भोग आणि ईश्वर  १६

मुळात इच्छा या शक्ती घेऊनच येतात आणि आपल्या शक्तीनुसार कार्य करतात. त्या फक्त मन, देह यानाच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाला कार्यरत करण्याची शक्ती व क्षमता बाळगतात. परंतु यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की, सर्व इच्छा या प्रकाराने कार्यरत करतात असं नाही. मुळात इच्छांना तशी शक्ती प्रदान करण्याचं कार्य मनच करतं. 

ज्या इच्छा मनात तीव्रतेने प्रकट होऊन मनाच्या अंतराचा ठाव घेतात, मनाला पछाडून टाकतात, त्याचा माणूस ध्यास धरतो, ज्या दृढ असतात वा मानवी मन त्यांच्यामागे प्राण ओतून लागतं, ज्या इच्छा मनाबरोबर देहालासुद्धा तितक्याच इर्षेने कार्यरत करतात, त्याच्यामागे माणूस एकाग्र होऊन प्रवृत्त होतो अश्याच इच्छा या प्रकारात येतात. ज्याला आपण ध्येयाने पछाडलं जाणं म्हणतो त्या प्रकारातील इच्छा प्रचंड शक्तीरुप असतात. 

अश्या दृढ इच्छा ब्रह्मांडातील सदर शक्तींना कार्यरत करू शकतात. हे भारतीय शास्त्र, वेद, पुराण यातून अनेक उदाहरणांनी दाखवून दिलं आहे. यावर आधारित एक संवाद ओम शांती ओम या चित्रपटात नायकाच्या तोंडी आहे. किसींभी चीजको अगर शिद्दतसे चाहो तो पुरी कायनक उसे तुम्हे मिलानेमे जुट जाती है. अष्टवक्र ऋषींनी लिहिलेल्या अष्टवक्र गीतेत याचा उल्लेख सापडतो. यावर आधारित एक प्रमेय, पाश्चात्य जगतात, The Secret अर्थात Laws of Attractions या नावाने प्रसिद्ध आहे. 

आपल्या इथे त्यावर काहीही विचार केला जात नाही, प्रसार होत नाही. पण पाश्चात्य त्या सर्वावर,  आपला theory चा शिक्का मारून, आपल्या नावाने प्रसार करून मोकळे होतात. त्याचं महत्वाचं कारण आपलंच आहे पण आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, आत्मसात करणं लांबची गोष्ट आहे. 

अश्या अनिवार्य, तीव्र आणि दृढ इच्छा, मनात धारण केल्यानंतर, सतत अंतर्यामी त्याच इच्छेचा पाठपुरावा केल्याने,  त्या इच्छेद्वारे प्रेरित शक्ती विश्वशक्तीला, त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी कार्य करण्यास प्रवृत्त करू शकते. अश्या तर्हेने कार्य करणाऱ्या दृढ इच्छाशक्तीने प्रसंगी अशक्य ते शक्य करण्याची किमया घडू शकते. पुराणात याची अनेक उदाहरणं आहेत. सूर आणि असुर दोघांनीही आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी दृढसंकल्प करून केलेले तप व त्याद्वारे आपल्या इष्टदेवतेला प्रसन्न करून इच्छित वरप्राप्ती करून घेणे हे त्यातीलच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. हे अश्याच दृढ इच्छा व त्यातील शक्तीचा परिणाम आहे. 

मुळात तप म्हणजे काय तीव्र इच्छेच्या शक्तीने मनोबलाचं रूपांतरण आत्मबलात करून त्याद्वारे इंद्रियातीत ऊर्जा कार्यरत करून,  कार्य वा संकल्प साध्य करून घेण्यासाठी केलेला आत्मयज्ञ. ज्यामध्ये आपल्या इतर सर्व इच्छा, आकांक्षा, भाव, भावना यांचा होम करून फक्त इप्सित हेतू साध्य करण्यासाठी मग्न होऊन आराध्याचं ध्यान करणं. 

ध्यान धारणा समाधी या मन एकाग्र करून त्याची शक्ती वा बल कार्यार्थ वापरणं अथवा त्या शक्तीचा सदुपयोग करण्यासाठी तिला विशिष्ट हेतूने प्रेरित करणं यासाठी आहेत. मन हे मुळात चंचल असताना इतकं एकाग्र होऊन आपण अविचल राहू शकतो हेच मुळात आश्चर्यकारक आहे. पण  सहज नाही तरी प्रयासाने, दृढ इच्छेने, सतत ध्येयासक्त राहिल्याने मनाला हळू हळू त्या मार्गाकडे वळवता येते.

मन हा कधीही हातात न येणारा पारा आहे. परंतु एखाद्या गोष्टीची सवय जाणूनबुजून लावण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जातो त्यावेळी मन ती गोष्ट अस्वीकार करून, त्याविरोधात बंड करतं. याच वेळी मनाला थोडं चुचकारून हळू हळू मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करावा. यात संकल्प या गोष्टीचा खूप मोठा हातभार लागतो. 

मनाला वळवण्यासाठी अनेक मार्ग पूर्वजांनी , मुद्दाम योजून त्याना वेगवेगळ्या युक्त्या करून आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवलं होतं, जे काळाच्या ओघात लुप्त होत जाऊन एक बहुमूल्य ठेवा नष्ट होऊ शकतो. ते उपाय, मार्ग व युक्त्या कोणत्या पाहू पुढील भागात. 


©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...