भोग आणि ईश्वर २ (इतिश्री)
बहुतेकवेळा आपण भोग हे व्यक्तिगत पातळीवर मोजतो, अर्थात एका अर्थाने ते योग्यच आहे. परंतु एकूण समाजात वा आजूबाजूला पाहिलं तर एक लक्षात येईल की, प्रत्येकाला काहीतरी दुःख, त्रास, तापत्रय वेगवेगळ्या प्रमाणात व वेगवेगळ्या स्वरूपात आहेतच. बरेच वेळा आपण समजतो किंवा मानतो की, माझ्याइतकं दुःख वा त्रास कोणालाही नाही.
काही लोकांचे कष्ट हे सहज दिसून येतात किंवा आपल्याला समजून येतात. परंतु याचा अर्थ असा नाही की जे दुःख दाखवत नाहीत ते दुःखी नसतात वा त्यांच्या नशिबात त्रास नसतो. परंतु प्रारब्धाने आलेल्या स्वभाव गुणधर्मामुळे त्यांना ते दुःख वा त्रास इतरांना दर्शवणं आदर्श वाटत नाही. म्हणून अश्या लोकांना तुम्ही केव्हाही विचारा कसे आहात. त्यांचं कधीही उत्तर असेल, बरा आहे वा छान आहे किंवा उत्तम आहे.
खरतर अश्या प्रकारचा स्वभाव गुणधर्म असणं हे भाग्याचं लक्षण आहे. माझी अशी धारणा आहे की, अनिष्ट व अहितकारक वा नकारात्मक ग्रहस्थिती असताना होणारा त्रास जितका दर्शवू वा आपल्याच मनाला दर्शवत जाऊ, तितकी त्यावेळी असलेल्या ग्रहांची मानसिकता असुरी होत जाते. कधीकधी वेळ अशी असते की तुंम्ही जितका त्रास करून घेत जाल, तितकाच अजून त्रास होत जाईल.
यात थोडा मानसिकतेचा वा इच्छाशक्तीचा देखील हातभार लागतो. म्हणजे आपण जितके म्हणत जाऊ काय मला त्रास आहे, काय माझं नशीब खडतर आहे, काय मला भोग आहेत, तितकीच आपल्या नकळत आपली इच्छाशक्ती नकारात्मक कार्य करत जाते आणि सकृतदर्शनी फार नकारात्मक न वाटणारी गोष्ट, कल्पनेपेक्षा जास्त नकारात्मक परिणाम करून जाते.
आता त्रास तर आहे, पण मग भोगत असताना अजून अजून वाढत जातो. अश्यावेळी मनाला थोडं चिंतनात न्यायचं आणि विचार करायचा की, आजचा त्रास कालच्यापेक्षा कमी आहे आणि उद्याचा याहून कमी असेल. म्हणजे होणाऱ्या त्रासाचा दुःखाचा दगदगीचा परिणाम शरीरावर होईल, पण मनावर होणार नाही. याचा परिणाम म्हणजे आधीच नकारात्मक असलेल्या काळात अजून नकारात्मकता वाढणार नाही. उलट सकारात्मक परिणाम होईल.
कारण खूपवेळा दृढ मानसिकता, इच्छाशक्तीला कार्यरत करून अनिष्ट गोष्टींची तीव्रता कमी करायला मदत करेल.
याच जोडीला प्रबळ इच्छाशक्तीबरोबर श्रद्धा असेल तर परिणाम काहीही आला म्हणजे सकारात्मक वा नकारात्मक, तरी मन ते स्वीकारायला खंबीर होईल. शेवटी परिणाम व्हायचा तोच जर होणार तर निदान आपली मानसिकता तरी ढळणार नाही.
कारण जीवन हे सुख आणि दुःख, आराम आणि कष्ट यांचं मिश्रण आहे. त्यात्यावेळी तीतीगोष्ट होणार, आपला मानसिक, आत्मिक तोल न ढळल्यास, पुढे लवकर सावरायला मदत होईल. मन लवकर सकारात्मक होईल.
बघा विचार करा. सोप्प वा कठीण ही देखील मनानेच केलेली व्याख्या आहे. यावर अजून विस्ताराने मध्ये मध्ये लिहीत राहीन साधण्यासाठी उद्यापासून करुणाष्टके विवेचन सुरू करत आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/१२/२०२०
Comments
Post a Comment