श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्ण नीति ६
आपला मूळ कथाभाग सोडून आज प्रथम श्रीराम व श्रीकृष्ण या भिन्नप्रकृतीच्या अवतारांविषयी लिहाव अस वाटतंय. पौराणिक वाङ्गमयानुसार दशावतारातील अनुक्रमे ७ आणि ८ वे अवतार असलेले हे देव विशेष आहेत . याच कारण आधीच्या ६ अवतारांमधे ५वा वामनरूपी आणि ६वा परशुराम हे दोनच मानवरूपी होते. यात देखिल वामन आणि भार्गवराम हे दोन्ही अवतार संसार न केलेले होते. म्हणजेच ब्रम्हचारी या सदरात येणारे होते. तद्वत तुलना ही फक्त ७ व ८ या दोन रितसर लग्नकार्य करून अवतार कार्याचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रभुश्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यातच होऊ शकते.
आता आपण या दोन्ही म्हणजेच श्रीराम व श्रीकृष्ण यांची साम्यस्थळे बघुया :
१. दोन्ही अवतार हे राजघराण्यात जन्म घेतलेले होते
२. दोघानाही राज्य भोग घेता आला (श्रीरामाचा वनवासा नंतर)
३ दोघानीही अनेक राक्षस रूपी दुष्ट शक्तिंचा विनाश केला
४. दोघानीही कमितकमी एका स्त्री राक्षसिणीचा निःपात केलाय त्राटिका व पूतना
५ दोघांचीही घराणी उच्च व मान्यताप्राप्त होती
६ दोघांचेही विवाह स्वयंवराशी संबंधित आहेत (यातील भिन्नता नन्तर बघू)
७ दोघेही तितकेच पराक्रमी होते
ही झाली ढ़ोबळ साम्यस्थळे . पण दोघांमधील भेद हे जास्त ठळक होते . ते येणेप्रमाणे :
१ श्रीरामाच जीवन हे जन्मापासुन वनवासापर्यन्त सुखमय असच गेलय . श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात गुप्ततेने होऊन तेथून लगेच प्रयाण गोकुळी आणि पुढील अनेक वर्ष आई वडिलांपासून ताटातूट.
२ श्रीरामांचा जन्म ऐन उन्हाळ्यात मध्यान्ही आणि श्रीकृष्ण जन्मले ऐन पावसाळी परिसीमा असताना मध्यरात्री.
३ श्रीरामाना राज्य हे परंपरेने मिळाले वा मिळणार होते . श्रीकृष्णाना संघर्षाने मिळवावे लागले
४ श्रीरामानी सर्व नात्यांचा आदर ठेवून एक आदर्श जीवन जगण्याचा सम्पूर्ण प्रयत्न केला. श्रीकृष्णाना सुरवातच पूतना , शकटासुर व तृणासुर यांच्या तसेच चाणूर आणि सख्खा मामां कंस यांच्या वधापासून करावी लागली. त्यानंतर सुद्धा उत्तर आयुष्यात आतेभाऊ शिशुपाल याचाहि वध करावा लागला. त्यानी कोणतेही आदर्श जीवन न जगता व्यावहारिक वस्तुपाठ घालुन दिला. व्यक्तिशः मला तेच आताच्या काळाला सुसंगत अस वाटत.
५ रामायणाच मुख्य व निर्णायक युद्ध हे रामचंद्रानी पत्नी सीता हिच्या सूटकेसाठी केलय. अर्थात त्यांच्यां अवताराच परम उद्दिष्ट तसच होत. त्यानी त्यासाठी सैन्य जमा करून स्वतः युद्ध करून अंतिम विजय प्राप्त केला आणि महाभारतातील निर्णायक युद्धात श्रीकॄष्ण मात्र पांडवांच्या हक्कासाठी आणि त्याना उद्युक्त करून लढतं करण्यासाठी रणांगणात उतरले ते सुद्धा कोणतेही शस्त्र हाती न घेता. त्याआधी स्वतः अनेक युद्ध केलीत तरी सुद्धा या अंतिम युद्धात फक्त एका उत्तम सल्लगाराची भूमिका पार पाडली. स्वतः माणसाला अन्यायाविरुद्ध उभ राहण्याच सामर्थ्य आणि चेतना देण्याचा खुप मोठा आदर्श श्रीकृष्णानी घालुन दिलाय. किंबहुना लढत देण्यासाठी मानसिकता तयार केली. बाहर राहून सर्व सूत्र ताब्यात ठेवली.
६ सम्पूर्ण आयुष्य श्रीरामानी आदर्श निर्माण करण्यात आणि लोकांच्या मतांचा आणि परंपरांचा मान ठेवण्याचा पूर्ण यत्न केला. श्रीकृष्णानी असा कोणताही आदर्श वा परंपरा यांचा फार बड़ेजाव न कराता व्यावहारिक कस वागाव याचाच परिपाठ घालून दिला. रामानी आदर्श बन्धु है ब्रीद सार्थ केल . पण श्रीकृष्णाने प्रसंगी बंधूच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेतले किंवा वडील बंधुना स्वतःच्या मनाविरुद्ध वागण्यास भाग पाडलं. कोणत्याही परंपरेचं अवडम्बर न माजवता काळाला सुसंगत जीवन कस जागावं याचा आदर्श परिपाठ घालून दिला. हे विशेषतः द्वापारयुगाच्या समाप्तिला आणि कलियुगाच्या सुरुवातीला याचा आदर्श घालून परंपरा आणि व्यावहारिकता यांचा सुंदर मिलाफ़ घालून दाखवला.
जाता जाता बाबजींच्या एका गाण्याची आठवण आली , जे यांच विषयाशी संबंधित आहे ' माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा , भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा ' या गाण्या हिच तुलना मांडण्यात आलेली आहे .
आज पुरत इथेच थांबतो हाच भाग उद्या पुन्हा पुढे नेउया बघू काय काय सापड़तय या अध्यात्मरूपी व्यवहार ज्ञानातून .
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
© प्रसन्न आठवले
१८/०९/२०१७
भाग षष्ठम समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment