प्रभुश्रीराम आणि देवी जानकी, यांच्या मिथिलानगरीतील प्रथम भेटीवर आधारित गीत मालिका :
राजकुमारी जानकी, भगिनी व सखींसह, मिथिला नगरीतील राज उद्यानात विहार करत असताना अचानक राजकुमार श्रीराम बंधू लक्ष्मण यांच्यासह तिथे आलेले त्याना दिसतात. दोघांची नजरानजर होते. दोघानाही एकमेकांच्या तेजाचा परिचय होतो आणि अचानक झालेल्या या भेटीमुळे लज्जित आणि स्तंभित झालेली जानकी सखी आणि भगिनी उर्मिला हिला म्हणते
सखे उर्मिले कोण कुंवर हा तेजस्वी दिसतो
ओळख नाही तरी अलौकिक क्षात्रतेजी भासतो
जणु कुणी हे तेज नभीचे अवनिवरी धाडले
सारे जणु तारांगण घेऊन कुणी आला भासतो
मज हे कोड़े पडले की तुज ही दिसते तैसेची
त्या तेजाची उजळ पताका नभी जणु जाणवे
डोळे बघ ते सहस्रसूर्या तेजासम तैसेंची
मन हे मजवर रुष्ट जहाले भुलले जणु जाणवे
वदे उर्मिला सखे जानकी तूच बोलसी सारे
म्हणसी, तूज कधी ना कोणी भुलवू ग पाहे
कोण्या क्षत्रिया वाचून मी कोणा ना पाहिन
मग या क्षत्रिया पाहुनि ना हाती मन राहे
तुझ्या प्रश्नी या काय उत्तरे देऊ ना सुचते
कोड़े हे तू पिताश्री प्रति मांडावे वाटते
तेच तुला या कोडयातूनी सोडवीती भासते
श्रुतकीर्ति मांडवी यांस ही तैसेची वाटते
खट्याळ तुम्ही आहा विषय हा चेष्टेचा करता
मज जे दिसते तेज भुवरी तुम्ही न का देखता
वदेन तुमच्या चेष्टा राज्ञा जाऊनी पहा आता
तरी सत्य हे कोड़े न कळे तेज अपौरुषेया
तुझा निश्चयो तूच विसरशी जानकी ग सखये
वदलीस मागे कधी न कोणा पुरुषा मी पाहिन
जा ग चहाटळे त्या उद्देश्ये नसे पाहिले मी
असती जरी हे प्रथम भेटले पराक्रमा वंदन
हीच प्रभुंची आणि देवी जानकी यांची रामायणातील पहिली दृष्टादृष्ट . यावर सखींच म्हणण पुढील भागात.
कवन : प्रसन्न आठवले
०२/०९/२०१७
०८:४६
Comments
Post a Comment