Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

भोग आणि ईश्वर १८२

भोग आणि ईश्वर  १८२ दोन्ही प्रकारची माणसं, अर्थात नकारात्मक व सकारात्मक, आपण मागच्या दोन लेखात पाहिली. त्यामुळे हा विषय संपला असं होणार नाही. कारण या दोन्ही प्रकाराच्या मध्ये काहीजण आहेत व असतात. ती म्हणजे नेहमी द्विधा मनःस्थितील व्यक्ती. म्हणजे जे नेहमी गोंधळलेले असतात. ज्यांना सर्वच बाजू योग्य वाटतात. त्यामुळे हे योग्य की ते यावर नेहमी त्यांच्या मनात खल अर्थात वाद चालू असतो. या प्रकारातील लोकांना कोणतीही गोष्ट, कोणीही सांगितली की  पटते. म्हणजे यांचं स्वतःचं मत काय आहे हे, यांना स्वतःला ठाम माहीत नसतं किंवा यांची ठाम भूमिका कधीच ठरलेली नसते. आपल्या विषया संदर्भात बोलायचं झाल्यास, नाम साधना, पूजाअर्चा इत्यादी विषयी आपण त्यांना जे सांगू ते यांना पटतं. त्यावर विचार करून, हे कार्य सुरू करतात.  सर्व सुरळीत आहे वा चालेल, या विचारात ते स्वतः असताना, एखादा दुखावलेला वा प्रसंगोपात अविश्वास निर्माण झालेला एखादा स्नेही यांना भेटतो. यांना आपण करत असलेली साधना वा नामस्मरण याबद्दल, खुंटा हलवून बळकट करायची इच्छा असते किंवा इच्छा निर्माण होते. कारण यांचं स्वतःचं मत ठाम नसतं आणि कायम दुसऱ...

भोग आणि ईश्वर १८१

भोग आणि ईश्वर  १८१ काल आपण पाहिलं की सकृतदर्शनी नकारात्मक भाव प्रकट करणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्यातील सुधारणेसाठी उपाय काय केला जावा, त्याबद्दल. आज आपण याविरुद्ध विचार, स्वभाव, वृत्ती आणि कृती असलेल्या लोकांबद्दल विचार करूया आणि काही शिकता येईल का याचा विचार करू. अर्थातच काही लोक नेहमी सकारात्मक वृत्तीचे असतात, कोणत्याही प्रसंगात, आपत्तीत, विपत्तीत ज्यांचा तोल कधीच ढळत नाही, ज्यांना पाहून वा ज्यांच्याशी बोलून आपल्यालासुद्धा सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.  अश्या व्यक्तींच्या भोवती नेहमी एक सकारात्मकतेचं वलय असतं. ज्याचा लाभ त्यांना तर होतोच, पण त्यांच्या संपर्कात येणाऱ्या, प्रत्येक व्यक्तीला होतो. यांना आपल्या बोलण्याने, वागण्याने किंवा नुसत्या अस्तित्वाने सर्वांना उत्तम मानसिकतेचा लाभ देता येतो. अनेक संकटं, समस्या, प्रश्न, अडचणी यांच्यासमोर आल्या तरी, यांच्या विचारात काडीचा सुद्धा फरक पडत नाही.  म्हणजे यांची वृत्ती वा मती तसुभर सुद्धा बदलत नाही. या व्यक्तींना अश्या व्यक्तित्वाचा लाभ अर्थातच आधीच्या जन्मातील, त्यांच्या उत्तम कर्माचं फलस्वरुप म्हणून बहुतेक वेळा जन्मतः प...

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ६ समाप्त

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ६ समाप्त त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।। वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय   वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ज्ञानमय आणि विज्ञानमय ही श्रीगमेशाच्या कोषातील अनेक प्रकट रुपांपैकी काही. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की, प्रकट रुपांपैकी जी विश्व व्यापून आहेत, ती श्रीगणेशाची रुपं, इतकी मोहक, आनंद दायी, विश्वव्यापक, प्रफुल्लित, विलोभनीय आणि स्वयंनिर्मित  आहेत की, अप्रकट गुण किती अद्भुत असतील, हे अवर्णनीय आहे. कदाचित या समस्त विश्वाबाहेर, जर खरच अजून काही लोक जसं भुवर, भुव, स्वरलोक अर्थात स्वर्गलोक, यांसह ओंकारात समाविष्ट समस्त ब्रह्मांडच नव्हे तर, मारुती स्तोत्रात समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अनेक ब्रह्मांडे असतील,  तर त्यात असलेलं,  परंतु आपण कधीही न पाहिलेलं आणि पाहू न शकणारं सर्व जगत किती सुरेख असेल, याची कल्पना, फक्त पृथ्वी या एका ग्रहावरील अद्भुत सृष्टीने व आनंद, नाद, शब्द, स्वर, लहरी, तरंग यांच्या सौन्दर्याने नटले...

भोग आणि ईश्वर १८०

 भोग आणि ईश्वर  १८० मी अश्या प्रकारची माणसं पाहिली आहेत, किंवा आपल्यालासुद्धा अश्या माणसांचा अनुभव आला असेल, जी सदोदित नकारात्मक भाव धरूनच असतात किंवा बोलतात. कदाचित कृती सकारात्मक करत असतील आणि त्यांच्या इच्छासुद्धा  सकारात्मकच असतील,  पण विचार अथवा मन सतत नकारत्मक असतं  किंवा वाचेने नेहमी नकारात्मकच बोलतात. खरतर हा अश्या माणसांचा दोष आहे कि नाही हे पूर्णतः कळत नाही. परंतु यांच्या संपर्कात येणारी माणसं अश्या लोकांना एका ठराविक काळानंतर टाळण्याचा प्रयत्न करतात.  मुळात अशी माणसं नकारात्मक का बोलतात वा विचार करतात त्यावर आधी चर्चा करूया. याची बीजं आदल्या जन्मात असू शकतात किंवा यांच्या लहानपणीच्या वातावरणात. अर्थात असं वातावरणात जन्माला येणं किंवा लहानपणी असं वातावरण आजूबाजूला असण्यात, यांचा या जन्मीचा काही दोष असेल हे संभवत नाही. कारण कळायला आणि समज येऊन, आपल्या मनाप्रमाणे वागायला किंवा विचार करायला लागायच्या आतच ही माणसं  अश्या वातावरणात वाढतात की, त्यांची मानसिक अवस्था नकारात्मक होण्यात या गोष्टीचा मोठा हातभार असतो.  कदाचित अशी माणस...

भोग आणि ईश्वर १७९

भोग आणि ईश्वर  १७९ खरतर मनात आपण खूप किल्मिष, जाळी, जळमट जमवून मनातील गुंता कसा वाढवतो आणि त्यामुळे अनेक अडथळे आपणच निर्माण करतो, याचा अनुभव आपल्याला येतो. आधीच्या भागात आपण त्यावर बोललो सुद्धा. परंतु आपण या दोन गोष्टीचा संबंध लावत नाही किंवा तसा काही संबंध असतो, हे आपण जाणत नाही अथवा मान्य करत नाही. त्यामुळे आपल्याच वाटेत आपणच खड्डे करून ठेवतो. त्या खड्ड्यातून आपण कधीच बाहेर पडत नाही, जोपर्यंत त्यांच्याकडे डोळसपणे  पाहून सुधारणा करत नाही. आपण मत्सर, द्वेष, जळफळाट, तुलनात्मक टीका, कुत्सितपणे बोलणं अश्या प्रकारच्या नकारात्मक आणि अविचारी स्वभावातून शेवटी काहीच मिळवत नाही. मला असं म्हणायचं नाही की, सर्वजण पूर्णपणे अश्याच वाईट स्वभावाचे असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावात काही अंशी हे दोष असतात. यात त्यांचं कसब आहे, जे यावर नियंत्रण मिळवून, मनात असे विचार येण्यापासून, स्वतःला वाचवू शकतात आणि कर्माच्या या फेऱ्यातून स्वतःला वाचवतात. मुळात कर्म हे फक्त कृतीतून नाही तर काया म्हणजे देहाने कृती वा कर्म, वाचा म्हणजे बोलून केलेलं कर्म आणि मन म्हणजे विचारात आलेलं वा विचाराने झालेलं कर्म....

भोग आणि ईश्वर १७८

भोग आणि ईश्वर  १७८ चित्तशुद्धी साधून आणि विकल्प बाजूला सारून, संकल्पाच्या मार्गावर दृढपणे चालत, नामाचा रेटा सुरू ठेवणं खरतर सहज व्हायला हवंय. पण वास्तविक तसं होत नाही. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण त्यांचा परामर्ष घेऊ. मन जे मागील गोष्टी, दुःखाच्या घडून गेलेल्या घटना, भविष्याची चिंता, हातून घडलेल्या चुका वा प्रमाद, मोहाचे क्षण व मार्ग, नात्यातील गुंता आणि नात्यातील मोहमाया इत्यादी अनेक गोष्टी नाम घेताना म्हणजे दृढपणे नाम घेताना आड येतात.  आपण एक एक गोष्टीचा विचार करू. मागे घडून गेलेल्या गोष्टी अर्थातच आनंदाचे, दुःखाचे प्रसंग हे मनात नेहमी पिंगा घालत असतात. ज्याचा विचार मन मध्ये मध्ये अर्थातच रिकामा वेळ मिळाला की,करत असतं. त्यात दोन गोष्टीचा विचार करायचा. आनंदाचे घडलेले प्रसंग आठवून त्यातील सकारात्मकता पुढे नेऊन,  त्याचाच उपयोग नामात एकाग्रता साधण्यासाठी करता येईल वा करून घेता येईल. प्रश्न राहिला दुःखाचे प्रसंग, घटना या कितीही आठवल्या तरी त्यातून असाध्य ते साध्य होणार नाही आणि घडलेलं बदलता येणार नसेल तर त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही, हे मनाला समजावता आलं पाहिज...

भोग आणि ईश्वर १७७

भोग आणि ईश्वर  १७७ नाम घेताना मन एकाग्र होत नाही, अशी एक तक्रार ऐकायला मिळते. वास्तविक एकाग्र या शब्दातच, त्याचं सारं सार दडलंय. एका अग्रावर अर्थात टोकावर मन स्थिर ठेवून, मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एकाग्रता साधणं. कदाचित हा शब्द, ध्यान धारणा करणारे किंवा धनुर्विद्येचा अभ्यास करणारे, या पैकी कोणीतरी शोधून वा यांच्या कृतीतून अपभ्रंशाने तयार झाला असावा. म्हणजे एकाग्रता या शब्दामध्येच, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तरी, काय अपेक्षित आहे, ते समजतं. एक म्हणजे एक नाम आणि त्या एका नामाच्या अग्रावर आपण मन स्थिर करायचं. म्हणजे यात दोन कृती आहेत, किंवा दोन कार्य अपेक्षित आहेत. एक मन किंवा मनाचे सर्व घटक एकत्रित करणं आणि त्यांना लक्षाकडे नेऊन, तिथे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत, ती स्थिरता साधत कार्य करणं.   विचार करा की, कोणत्याही वस्तूचे, लक्षाचे अग्र, अर्थात टोक किती सूक्ष्म असणार. त्या सूक्ष्म लक्ष्यावर मन केंद्रित करून, तिथे ते मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे किती गाढा अभ्यास करावा लागत असेल. कारण मुळात मन चंचल, डोळे कधीही फार स्थिर राहणार नाहीत, कारण प...

भोग आणि ईश्वर १७५

भोग आणि ईश्वर  १७५ याच जन्माचा विचार करून प्रतिदिन, चिंतन, मनन, श्रवण, वाचन, नामस्मरण या अनेक मार्गांनी नित्य ईश्वर सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करावा. कारण या जन्मातून पुढे कुठे जाऊ हे माहीत नाही, मागचं स्मरणात नाही. म्हणून सध्याच्या जन्माचाच सर्वार्थाने विचार, उद्धार व उन्नती यासाठी करावा. हे साधण्याची जाणीव झाली, तीच सकाळ आणि तीच पूर्वदिशा. या जणीवेतच भगवंताची इच्छा वा संकल्प दडला आहे, हे नक्कीच समजा. यामागे अजून एक विचार आहे. कर्मगतीच्या चुकलेल्या फेऱ्याला कर्मानेच सुधारता येतं. ते कर्म भक्तीचं, परोपकरचं, दान पुण्याचं, कोणत्याही मार्गाने केलेलं असू शकतं. म्हणून व्यवहारात तसच परमार्थात, कर्मरत राहणं अत्यंत गरजेचं आहे. नव्हे चार पुरुषार्थांपैकी  धर्म पालन आणि मोक्षप्राप्ती साठी प्रयत्न करणं हे कर्तव्य असल्यामुळेसुद्धा आत्म्याला त्याच्या निहित मार्गावर घेऊन जाणं, हे देहाचं आणि मनाचं आद्यकर्तव्य आहे.  गीतेत श्रीकृष्ण भगवान यांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्य करणं हे मानवाचं ब्रीद आहे. जसे भगवंत आपल्या ब्रीदासाठी अनेक रुपात प्रकट होऊन नित्य आपलं कर्तव्य बजावतात, त्याचप्रमाणे,...

भोग आणि ईश्वर १७६

भोग आणि ईश्वर  १७६ एकदा दृढ संकल्प केला की, त्यामागे ईश्वर ठाम उभा राहतो. हे आपण जाणतोच. अगदी पुराणकाळापासून सूर असुर आणि मानव यांच्या दृढ संकल्पमागे ईश्वर उभा राहिला. त्याने त्या प्रत्येकाची परीक्षा जरूर घेतली. पण जे त्यात खरे उतरले आणि जे आपल्या ध्येयासाठी, संकल्पासाठी कठोर इच्छा शक्तीने उभे राहिले, त्यांना ईश्वर सर्वतोपरी सहाय्यार्थ धावून आला.  म्हणजे आपण जी साधना करतो, त्या मार्गावर आपण ठाम आहात हे ईश्वर कधीही कशाप्रकारे पाहू शकतो. अर्थात त्या पायरीवर पोचायला वेळ आहे, असा चुकीचा विचार कधीही करू नये. कारण आपण नाम घेत आहोत, ही साधीशी सुरवातसुद्धा आपल्या सद्गुरूनमार्फत ईश्वरापर्यंत नक्की पोचलेलं असतं. अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंवरसुद्धा ईश्वराचं लक्ष असतं. म्हणून तर आपण म्हणतो की, ईश्वराच्या मर्जीशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. याचा वास्तविक अर्थ, सर्व चराचरावर सत्ता असलेल्या ईश्वराच्या संकल्पनेतून निर्माण झालेली सृष्टी आणि सृष्टीतील प्रत्येक त्या वस्तू व सजीव यांच्या प्रत्येक बारीकबारीक हालचालीसुद...

हलकं फुलकं १

हलकं फुलकं १ वर्क फ्रॉम होममुळे वैतागलो होतो, त्यात उन्हाळा, उकाडा म्हणून, संध्याकाळी बाहेर चक्कर मारायला जाण्यासाठी तयार झालो. टेबलाच्या खणातून काही घ्यायचं म्हणून डबल दरवाज्यापैकी एक दार उघडलं, तितक्यात त्या टेबलाला टेकून ठेवलेली एक जुटची पिशवी कलंडली. सहज शब्द कानावर आले.  पिशवी : फुकट झोपमोड झाली ना, जरा नीट करायचं की. मी : तूला आज सकाळी हिने आणलं भाजी आणि किराणा  सामान भरून. भाजी काढली, फ्रिजवर ठेवली, बाकीचं सामान ठेवून, तुला इथे टेकवून ठेवली. तेंव्हा पासून आरामच करतेस ना. जरा कलंडलीस तर काय झालं, एवढं. काम काय तुला दुसरं. पिशवी : तेच म्हणते, मला काम काय. हे सामान काढेपर्यंत इथे आणि नन्तर घडी करूनच ठेवणार ना? मग पडू दे की जरा. फुकट झोपमोड च्या.......... मी : ऐ शिवी नाही द्यायची. पिशवी : जे ऐकते आजूबाजूला, तेच येणार ना.   मी : असुदे, रहा इथेच पोट पुढे काढून उभी.  असं म्हणून मी तिला क्लडलेली होती ती सरळ केली आणि निघालो.  दरवाजाबाहेर आलो तर, चप्पल एक पूर्व आणि दुसरी पश्चिम अशी होती. म्हटलं त्या पिशवीला बोललो तर हिलाही राग आला की काय. सहज म्हटलं,  दिव...

हलकं फुलकं २

हलकं फुलकं २  सकाळी उठल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आवरून चहा बनवला. एक कप मगात घेतला.  नॉर्मली मी मग असेल तर खाली बशी न घेता, स्टीलची बाकदार डिश घेतो, उद्देश हा की बाय चान्स चहा सांडलाच, तर  डिश मध्येच सांडेल. स्वतःवर ठाम विश्वास असल्यामुळे exact तसच घडलं. खुर्चीत बसताना, बेडवर डिश ठेवता ठेवता, थोडासा तोल गेला आणि चहा डिशमध्ये सांडला. कल्पनेनेच घाम फुटला की डिश नसती तर. कल्पनेतला घाम कल्पनेनेच पुसला (म्हणजे imagination) . तेवढ्यात आवाज आलाच सांडून तर बघायचा माझ्या अंगावर चहा, नाही तुमची सकाळ, रंगीत झाली असती तर नाव चादर नसतं लावलं.  चादरीने लगेच पिंक टाकलीच टोमण्याची. मी गप्पच बसलो. म्हणजे आपली चूक असेल तर गप्पच बसणं बेस्ट असतं. म्हणून तर मी पंचवीस वर्षे गप्पच असतो, ज्या ज्यावेळी आपली चूक असेल तेंव्हा. मला गप्प पाहून चादर कुत्सितपणे हसली. शेवटी ती पण 'ती' होती, काय करणार. गरम गरम चहा आणि डिशमध्ये भिजलेली बिस्कीटं  माझी वाट बघत होती,  त्यांची बिचार्यांची काहीच चूक नव्हती. म्हणून भिजलेल्या बिस्किटांना तसंच फस्त केलं. भिजून हिरमुसल्यामुळे बिस्किटांनी, आवा...

भोग आणि ईश्वर १७४

भोग आणि ईश्वर  १७४ परीक्षा, मोठ्या वर्गातली परीक्षा, उच्च पातळीची परीक्षा या त्याच विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात, जे पुढे जाण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी बाळगून असतात. म्हणजेच जे अश्या परीक्षेला बसून त्यात उत्तीर्ण होण्यास इच्छुक असतात. बसण्याची इच्छा, पुढे जाण्याची मनीषा किंवा आकांक्षा आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास करण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांनाच खडतर मार्गावरून जावं लागतं. अश्या उच्चपदप्राप्ती करून देणाऱ्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील कष्ट व नन्तर प्राप्त गुणवत्ता,या बळावर पुढील आयुष्य हे उत्तम जातं. अर्थात त्यानंतर कष्ट संपतील असं अजिबात नाही, पण त्या कष्टाचं चीज करणारं वेतन, भत्ते इत्यादी मिळून व्यावहारिक जगण्याचा उत्तम आनंद स्वतःबरोबरच कुटुंबियांना मिळून घेता येतो.  अगदी हीच अवस्था आत्मोन्नतीच्या मार्गावर असणाऱ्या साधक, भक्त आदींची होते. आपण कोणत्या जन्मात या आत्मउन्नतीच्या मार्गावर मार्गक्रमण सुरू केलं, हे वास्तविक आपणही जाणत नाही. पण विश्वचालक , विधाता,नियती आणि संचित यांना त्याची माहिती असतेच असते. त्यानुसार आपली नियती, तसेच प्रश्न आयुष्...

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ५

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ५ त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।। वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय   ज्ञान विज्ञान वाङ्मय चिन्मय यांचा विस्तृत अभ्यास केल्यानंतर, आता आनंदमय या शब्दकडे वळूया. आनंद हा खरतर एक अद्भुत ठेवा विधात्याने मानवाच्या मनात भरून अनंत उपकार केलेत. राग क्रोध भय हे भाव प्राण्यांच्या ठायी सुद्धा भरून आहेत. पण ते फक्त विशिष्ट करणांसाठीच.  म्हणजे आपल्या हद्दीत आलेल्या एखाद्या श्वानाला, त्या भागातील इतर सर्व श्वान, ओरडा आरडा करून निघून जाण्यास भाग पाडतात. हे वानगीदाखल सांगितलं म्हणजे प्राण्यांच्या ठायी असलेल्या राग वा क्रोध याची कल्पना येईल. पण त्याचा वास्तविक संबंध हा फक्त भूक आणि भय याच गोष्टींशी असते, जी निसर्गतः त्यांना प्राप्त आहे.  मानवाला वैचारिक देणगी, अगदी विपरीत परिस्थितीत सुदधा आपला तोल वा संतुलन जाऊ न देता, परिस्थितीच्या विरुद्ध जाऊन, आपले भाव संयत पद्धतीने मांडणं किंवा अव्यक्त राहणं. पण तरीही, हे केवळ ज्ञानी ...

भोग आणि ईश्वर १७३

भोग आणि ईश्वर  १७३ आत्मा या अविनाशी तत्वाला सजीवसृष्टीच्या या प्रांगणात खेळायला पाठवून, मातेचं हृदय असलेला परमेश्वर हा खरतर कसा स्वस्थ बसू शकत असेल, याची कल्पना करता येणार नाही. म्हणजे मातेच्या ममत्वाने तो त्या प्रत्येक जिवाकडे लक्ष देऊन असतो, ज्याला या मर्त्यालोकात पाठवलं जातं, किंवा यावं लागतं. म्हणूनच प्रत्येक आत्म्याची उन्नती व्हावी यासाठी त्या जिवानेच धडपड करावी ही खरतर एका मातृ हृदयी ईश्वराची मनापासून इच्छा असते. पण त्या कोमल हृदयी ईश्वराच्या मनामध्ये आणि संकल्पा मध्ये एक कठोर पिता दडलेला असल्या कारणाने, जिवाने आपली उन्नती स्वतः साध्य करावी आणि परिस्थितीला टक्कर देऊन, आपलं मन घट्ट करून मोह माया, दुःख, सुख, भोग व उपभोग, यांच्या कोणत्याही फेऱ्यात न अडकता पुढे पुढे जात राहून, प्रगती साधावी, ही दुर्दम्य इच्छा त्याच ईश्वराची असते,जो मातेचं ममत्व बाळगून आहे.  त्यामुळे कधी कठोर व्हावं आणि कधी कोमलतेने सांभाळून घ्यावं हे योग्य प्रकारे तोच जाणतो. त्याला हे पक्के ठाऊक असतं की, आत्म्याच्या या प्रवासात, कोणत्या देहातील आत्मा मानसिक, शारीरिक यातनांचे, दुःखाच्या वादळाचे, भोगाच्या आडवळ...

भोग आणि ईश्वर १७२

भोग आणि ईश्वर  १७२ शंका घेण्याच्या या वृत्तीचा अभ्यास करताना एक शंका मनात आली की, तिसरी एक शक्यता अशी असू शकेल का की, अश्या शंका येण्यात विधात्याचा काही हेतू असेल का. याचं कारण असं की माया ही भगवंताधीन असल्यामुळे, ती सर्वच गोष्टी स्वतःच्या मर्जीनेच करत असेल असं नाही. काही सूचक  गोष्टी वा विचार हे विधात्याच्या कल्पनेतून वा मनात आलेले, माया आज्ञा म्हणून नक्की पार पाडत असेल.  जसं बरेचवेळा निष्ठा, श्रद्धा, विश्वास, ठामपणा यांची चाचपणी नक्कीच विधात्याकडून केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा अवाजवी शंका उत्पन्न करून साधनेत असलेल्या व्यक्तीला सुरवात करतानाच संभ्रमित करून, हतोत्सहित करत, त्याच्या निष्ठेला सुरवातीलाच धक्का लावला तर, साधकाची चिकाटी, उत्साह आणि आत्मीयता यांची कसोटी आधीच पाहण्याची ही एक पद्धत असूही शकेल. म्हणून शंका रास्त असो वा अयोग्य साधना आणि त्यावरील विश्वास न ढळू देता साधन सुरूच ठेवणं हिताचं आहे, शंकांचं समाधान योग्यवेळी होईल, याची खात्री बाळगा. शंका कुशंकांच्या या दोन तीन लेखात दोन शब्द वापरात आले, आत्मोन्नती व आत्मोद्धार. वास्तविक अर्थाने समान शब्...

भोग आणि ईश्वर १७१

भोग आणि ईश्वर  १७१ खरतर कालच्या विवेचनानंतर बरेचसे संभ्रम दूर व्हायला हवेत. पण तरीही मन हे संभ्रम, शंका, कुशंका यांनी भरलेलं असतं. वास्तविक अश्या शंकांचे मी दोन विभाग करीन. एक साधना किंवा कोणतंही कार्य करण्याआधी आलेल्या शंका आणि दुसरा विभाग साधना किंवा कोणतंही कार्य करत असतानाच्या शंका.  पहिल्या विभागातील शंकांचे दोन उपप्रकार होतील. एक म्हणजे जे कार्य किंवा साधन योजलं आहे, त्या संबंधी माहिती मिळावी म्हणून आलेल्या शंका आणि दुसरं म्हणजे कार्य वा साधन करण्यापेक्षा किंवा करून बघण्यापेक्षा ते टाळण्याच्या उद्देशाने विचारण्यात आलेल्या किंवा डोक्यात आलेल्या शंका. या मध्ये मुख्यतः समोरच्या व्यक्तीच्या मनातील खरे भाव लक्षात आणून देतात जेणेकरून जाणवतं  की, शंका विचारणारी व्यक्ती कितपत गंभीर आहे, निहित कार्यात वा साधनेत. दुसऱ्या विभागात सुद्धा दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे साधना वा कार्य करताना येणाऱ्या अडचणीच्या रूपातील शंका,ज्या सदर कार्य सुरळीतपणे, निर्धोकपणे पुढे नेण्यासाठी आलेल्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी केलेली विचारणा आणि दुसरा उपप्रकार म्हणजे शुद्ध भाव न धरता, कार्य सुर...

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ४

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ४ त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।। वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय विज्ञान, हे या जगताच्या खरतर अणूरेणुत सामावलेलं आहे आणि सर्व चराचर या विज्ञानाचाच भाग आहे. विज्ञान नाही तर हे जगत अस्तित्वात आलंच नसतं. कारण प्रत्येक कणामागे शास्त्र, ज्ञान आणि विज्ञान भरलेलं आहे. किंबहुना विज्ञानाच्या अधिष्ठानावरच या ब्रह्मांडाचं अस्तित्व आहे. जिथे आपलं अस्तित्वच विज्ञानमय आहे तिथे, आता आपण पाश्चात्यांमुळे विज्ञानाची ओळख करत आहोत, असा एक सार्वत्रिक समज आहे. मुळात इथे हे लक्षात घ्या की, या जगतातील चराचरात वसलेलं विज्ञान जाणायला आता त्यांनी सुरवात केली. आपण हे सर्व पुराणकाळात जाणलं ओळखलं आणि अभ्यासून कागदोपत्री बद्ध करून, गणित, शास्त्र, यांची मांडणी, एका सूत्रबद्ध पद्धतीने आधीच नोंदवली होती. पुराणकाळात सहजी अस्तित्वात असलेल्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य आपल्यासमोर मांडत आहेत, यात त्यांच्या बुद्धीला कमी लेखण्याचा प्रयत्न...

भोग आणि ईश्वर १७०

भोग आणि ईश्वर  १७० वास्तविक देह हा आत्म्याला सदेही येऊन, आत्मोद्धार आणि आत्मोन्नती साधण्यासाठी देवाने दिलेलं एक साधन आहे. मूळ पूर्णांशातून विलग होऊन आत्मा मर्त्यलोकात देह धारण करण्यासाठी येतो, हे निमित्त नसून खरतर ती विधात्याचीच खेळी आहे. बर या देही येऊन पुनरुत्पादन करण्याचं तंत्र याच देहाला देऊन आपल्यासह पुढील जीवांचा उद्धार करण्याचं कार्य या देहातून घडावं हासुद्धा उद्देश ईश्वराने मनात योजला. हा उद्देश आत्मा अवकाशातून जीवसृष्टीवर येईपर्यंत त्याचा मंत्रच असतो. सोहम. म्हणजे मीच त्या अविनाशी आत्म तत्वाचा अंश आहे. पुढे जीवसृष्टीत येऊन गर्भात आल्यानंतर हाच आत्मा देहाच्या प्रकृतीनुसार सर्व विसरून, मायेच्या अधीन होतो. देहधारणेचं मूळ कारण विसरून गेल्यामुळे, या जीवसृष्टीला भुलून, खेळात दंग होऊन जातो.  एक उदाहरण घेऊ म्हणजे समजेल. एका लहान मुलाने हट्ट केला की, मी शेजारी जाऊन खेळतो. आधी नाही म्हणणारी आई, नन्तर हो म्हणते, पण एका अटीवर तयार होते. जेवायच्या वेळेपर्यंत परत ये. मुलगा म्हणतो चालेल तू साद घाल मी येईन. आईला खात्री असते की आपला मुलगा काही लवकर व साद घालून बोलावल्याशिवाय येणार नाह...

भोग आणि ईश्वर १६९

भोग आणि ईश्वर  १६९ समाधान आणि आनंद या प्राप्त करण्यासाठी नाम आणि नाम घेत तोच आनंद आणि समाधान मिळत जाणं, या शुभंकर चक्रात, आपण कधी बसून पुढे जाऊ ते समजणार सुद्धा नाही. मुळात या जगात कलियुगात जन्माला येऊन, काही शुभ, पुण्यकारक कर्म आणि ईश्वराच्या स्मरणासारखं काही आपण करत आहोत , हेच खूप मोठं सद्भाग्य आहे या देही आल्याचं. या जन्मात येऊन भोग आणि उपभोग या फेऱ्यात स्वकर्माने सापडून, अनेक जन्माचं संचित जोडत जोडत, अनेक देह धारण करत, पुढे जाताना, अनेक टप्पे अनेक अडथळे पार करत, वासना,माया यांच्या ताब्यात अडकत मार्गक्रमण करताना, सुटकेचा मार्ग, जो निदान या युगा साठी फक्त आणि फक्त ईश्वरस्मरण आहे, ते करण्याचं मनात योजून, ते साध्य करणं हे बुद्धीच्या आणि विवेकाच्या आधारावर मानवी देह प्राप्त करू शकतो. आतापर्यंत मन आत्मा यावर आपण खूप बोललो, आज जो नश्वर म्हणतात त्या देहाबद्दल बोलू. नश्वर किंवा नष्ट होणारा आहे म्हणून, त्याचे फार लाड न करता, फक्त ईश्वर चिंतनाचं आणि स्मरणाचं काम करत राहावं, हे नक्कीच योग्य आहे. पण अनेक लक्ष योनी फिरून हा देह,ही बुद्धी, मनाची विचारांची ही शक्ती, देहाच्या माध्यमातून, एक देह...

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ३

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख ३ त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।। वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय वास्तविक श्रीगणेशाचं महत्व फक्त अग्रपूजा हा सन्मान सोडुन अनेक दृष्टीने अनेक पट आहे. जगाच्या इतिहासात आजपर्यंत हे काही आपण साधू शकलो, शोधू शकलो, मिळवलं, म्हणजे संशोधन, नवनिर्मिती, रासायनशास्त्र, पदार्थविज्ञान, जैविक व वनस्पती यांसह सूक्ष्मजीवशास्त्र, संगणकीय शास्त्र, सॉफ्टवेअर हार्डवेअर, त्यातील सर्व तांत्रिक गोष्टी, अंतराळशास्त्र, समस्त ब्रह्मांडात भरारी मारून सर्व जगत शोधण्यासाठी मानव करत असलेलं संशोधनकार्य या सर्व वैज्ञानिक आकलनाच्या गोष्टी आहेत. त्यासाठी विविध क्षेत्रात, विविध देशात विविध संशोधक, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, हे सर्व करत असलेलं कार्य आणि त्या कार्यामागची शक्ती, प्रेरणास्थान, प्रेरणास्रोत आणि यशस्वीतेमागची कर्मगती प्रत्यक्ष श्रीगणेशाचीच आहे. व्यापक रुपात व स्वरूपात, आपलं अस्तित्व व त्या अस्तित्वाने सर्व जगत, व्यापून सर्व कार्यामागील विद्येच...

भोग आणि ईश्वर १६८

भोग आणि ईश्वर  १६८ समाधान या शब्दाची व्याख्या आणि विवेचन आपण मागील दोन भागात पाहिलं. खऱ्या समाधानाचा क्षणिक सुद्धा अनुभव घेतलेले समजू शकतील की, खऱ्या अर्थाने धन आणि ऋण आयर्न किंवा भार अथवा लहरी व तरंग एका समान पातळीवर आणणाऱ्या या संतुलन क्रियेला समाधान का म्हणतात, याचा सर्वात मोठा उपयोग हा की, यामुळे मनाला शांती मिळते. मनातील नकाराच्या लहरी नष्ट होऊन मन सकारात्मक विचार करायला लागतं.  या सकारात्मकतेचा लाभ शरीराला मिळून, योग्य ती रसनिष्पत्ती अर्थात हार्मोन्स पाझरून, शरीर एका विलक्षण संतुलनाचा लाभ घेतं. याचा पुढील परिणाम म्हणजे मन एकाग्रतेने पुढील कार्यात काम करायला सुरुवात करतं. या सर्व गोष्टी ऐहिक जीवनातच उपयोगाच्या आहेत असं नाही. परंतु अध्यात्मिक जीवनात याहून जास्त उपयोगी समाधान ही मानसिक स्थिती आहे. समाधानी वृत्ती माणसाला कार्य करायला प्रवृत्त करते. समाधानी वृत्ती अंगी बाळगून माणूस नामाच्या पूर्ण लाभाचा आनंद घेऊ शकतो. म्हणजेच सहसा आनंदामागून येणारं समाधान, हे आनंद द्यायला सुरुवात करतं. समाधानी वृत्ती कशी काय बाणवावी याबद्दल अनेक संत महंत याची उदाहरणं देता येतील. या सर्वांचं व...

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख २

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख २ त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।। वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय या सर्व शब्दात मय हा शब्द समान आहे. या शब्दाने श्रीगणेशाची व्याप्ती, महती आणि कीर्ती अधोरेखित केली गेली आहे. तरीही या शब्दांचे सखोल विश्लेषण करून खालील निरूपण मांडत आहे.  वाङ्मय हे साहित्य, भाषा व त्यासंबंधातील कला म्हणजे लेखन, काव्य, नाट्य, इत्यादी सर्व कला यांच्याशी निगडित आहे म्हणजेच हे सर्व या एका शब्दात व्याप्त आहेत. तरीही या सर्वांना व्यापून श्रीगणेश त्यावर विराजित आहे. म्हणजेच भविष्यात येऊ शकणाऱ्या या क्षेत्रातील कलांचा सुद्धा प्रणेता प्रत्यक्ष बाप्पाच आहे.  काल आपण ज्ञानाबद्दल बोललो ,  ते विश्वव्यापक ज्ञान हे भाषा या ज्ञानातून सुरू होऊन अनेक प्रकारे विस्तार पावून जगत आपल्या कवेत घेऊ इच्छिते. ज्ञानाचा विचार करता त्यामध्ये गणित, शास्त्र, वेद, पुराणं यांसह समस्त ब्रह्मांडाचं ज्ञान समाविष्ट आहे आणि याचा कर्ता प्रत्यक्ष श्रीगणेश आहे....

भोग आणि ईश्वर १६७

भोग आणि ईश्वर  १६७ बदललेल्या काळाने आणि बदलणाऱ्या सांस्कृतिक वाऱ्याने एकूणच हाव, लोभ आणि मत्सर या विकारांचा फैलाव करून तो वाढवला. काळाच्या ओघात पैसा हे माध्यम न राहता, त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. तो  कमावण्याच्या नादात, आपल्या मूळ सांस्कृतिक समृद्धीचा पाया व प्रतीक असलेलं समाधान मात्र हरवून गेलं. त्यामुळे समाधान हे अध्यात्मिक जीवनातच नव्हे तर एकूणच सर्वच स्तरावर हरवून गेलं. पण जे गेलं आहे ते परत मिळवणं हाच सूज्ञपणा आहे. निदान अध्यात्मिक मार्गावर स्मरण, चिंतन, श्रवण करताना, आपण या समाधानाचा धागा धरून पुढे गेलो तर, कर्मगतीच्या नियमाप्रमाणे आणि लहरी तरंग व कंपनं या शास्त्रीय सिद्धांतानुसारसुद्धा आपल्याला त्या समाधानाचा योग्य तो परतावा ईश्वरी प्रेरणेने परत मिळेल. पण हे साधणार कसं. तर आनंद हा समाधानाचा पाया आहे आणि तो आनंद आपण ईश्वर स्मरण करताना अनुभवू शकतो. मुळात एखाद्या कृतीत मन ओतलं की, त्या कृतीतून आनंद नक्कीच मिळतो. आपण नेहमीच्या कामात वा अभ्यासात किंवा परीक्षेत अथवा कार्यालयीन कामातसुद्धा अनुभवलं असेल की, जेंव्हा आपण ते काम जीव लावून, मनापासून व आपला स्व शंभर टक्के...

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख १

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख १  त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।। वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय या सर्व शब्दात मय हा शब्द समान आहे. या शब्दाने श्रीगणेशाची व्याप्ती, महती आणि कीर्ती अधोरेखित केली गेली आहे. तरीही या शब्दांचे सखोल विश्लेषण करून खालील निरूपण मांडत आहे.  गणपती हा विश्वात्मक देव आहे. श्रीगणेशाला सृजन शीलता, अर्थात creativity,  साहित्य, कल्पनाविश्व, कला आणि उपलब्ध ज्ञानातून व मार्गाने निर्मिती, अश्या अनेक कलात्मक गोष्टींचा निर्माता म्हटलं जातं. कलेचा, विद्येचा,, शास्त्रांचा, साहित्याचा, ज्ञानाचा, इतकंच काय तर विज्ञानाचा रचयिता किंवा आद्य आणि अंत म्हटलं जातं. यामध्ये एक मेख दडलेली आहे. आद्य म्हणजे दोन अर्थ. एकतर ज्याने या कला, विद्या, ज्ञान इत्यादीं निर्माण केल्या, असा किंवा त्याच्यापासून या कला, विद्या, ज्ञान इत्यादी निर्माण झाल्या असा. म्हणजेच या सर्व ज्ञान निर्माण केलेला, अर्थात या सर्व ज्ञानाचं मूळ असलेला  त्वं मू...

भोग आणि ईश्वर १६६

भोग आणि ईश्वर  १६६ सद्गुरू, साधना आणि 'स्व'ची आहुती ही त्रिसूत्री सांभाळली की चवथा स अर्थात समाधान हा निश्चित प्राप्त होतो. पण समाधान तर अनेक गोष्टींपासून प्राप्त होतं. मग नक्की आपण अध्यात्मिक वाटेवर का जावं, या समाधानासाठी, याचा शोध घेऊया.  मुळात समाधानाचं वर्गीकरण होईल का,जेणेकरून हा विषय ,समजून घ्यायला, थोडं सोप्प होईल. समाधान हे ढोबळमानाने, मुख्य दोन प्रकारचं असतं. एक तात्पुरतं समाधान आणि एक कायमस्वरूपी समाधान. हे वर्गी करण मुख्यतः ते कोणत्या वस्तूपासून मिळतं, त्यावर आधारित आहे. तात्पुरतं समाधान हे फार काळ न टिकणारं समाधान आहे आणि कायमस्वरूपी समाधान हे अनंत काळापर्यंत टिकतं. समाधानात अजून तीन उपप्रकार आहेत, ते म्हणजे शारीरिक मानसिक आणि आत्मिक समाधान. या तिन्ही नावावरून अंदाज येईल, तो म्हणजे ऐहिक समाधान हे शारीरिक व मानसिक प्रकारात येतं. भौतिक सुखाच्या गरजा या मुख्यतः शारीरिक व मानसिक समाधान देतात. एखादा चांगला पदार्थ खाण्यात आला, एखादं उत्तम फळ जसं आंबा खाल्ला, मेजवानी झोडली की मिळणारा आनंद आणि समाधान अवर्णनीय असतो. मुळातच आनंद आणि समाधान हे खूपदा एकाच अर्थाने वापरले जाणार...

भोग आणि ईश्वर १६५

भोग आणि ईश्वर  १६५ सद्गुरू, साधना आणि 'स्व'ची आहुती, ही खरतर अध्यात्मा तील मार्गक्रमणेची त्रिसूत्री आहे. या तीन गोष्टीचं पालन मना पासून,  अंतःकरणाने आणि आत्मप्रेरणेने केलं तर, आयुष्यात, धनदौलत माहीत नाही, पण समाधान नक्कीच कमी पडणार नाही. सरतेशेवटी हे समाधानच माणसाला अध्यात्मात उन्नत्ती आणि यशस्वीतेकडे नेतं.  अध्यात्मात यशस्वी म्हणजे काय,  सद्गुरुकृपा आणि उत्तम साधना यांची प्राप्ती.  बाकी नादलहरी, प्रकाश, स्वप्न, आत्म प्रेरणा अर्थात इंट्युशन आणि तत्सम सिद्धी प्राप्ती होणं ही खरतर अनेक स्थानकं आहेत, जी बरेचदा मायास्वरूप असतात. त्याने वाहावत न जाता, आपली साधना आणि गुरुदास्यत्व हेच श्रेष्ठ मानलं पाहिजे. म्हणजेच इथेसुद्धा समाधान हाच श्रेष्ठ मंत्र अर्थात guiding principle असलं पाहिजे.  ते समाधान असेल तर माणूस, जीवनाच्या कोणत्याही स्थितीत उत्तम साधना करून उन्नत होऊ शकतो. कारण एकदा माहीत झालं की जे वर्तमानात प्राप्त झालंय किंवा होतंय , ते आपल्याच गतकाळातील वा गतजन्मातील कर्माचा परिणाम आहे,  मग माणूस प्राप्त परिस्थितीने विचलित न होता, पुढील मार्ग सुधारण्याकडे, ...

भोग आणि ईश्वर १६४

 भोग आणि ईश्वर  १६४ काळाच्या विषयासंदर्भात अजून एक मुद्दा जो मनात येऊ शकतो, त्याबद्दल आपण आज चर्चा पुढे सुरु ठेवू. कालपर्यंत आपण २ प्रकारचे लोक  बघितले. एक म्हणजे जे  स्वकर्मफल आणि गुरुकृपास्वरूप, संकटापासून पूर्ण अलिप्त राहतात. म्हणजे हे संकटात सापडत नाहीत. याचं  उत्तर यांच्या गत काळातील व गतजन्मातील पूर्वपुण्याई संचयामुळे, त्यांना संकट स्पर्शही करू शकत नाहीत. हे अद्भुत कर्मफल घेऊन आलेले जन असतात. काहीजण  या संकटात सापडतात पण काहीही क्षती न होता वा परिणाम न होता, यात सापडले तरीही, सुखरूप बाहेर पडतात. या साधकांना त्यांची पूर्वसंचित काहीसं कमी असल्यामुळे, गुरुकृपा  तारते.     आता जे यात सापडतात, क्षतिग्रस्त होतात आणि काहीजण तर या लोकीची यात्रा संपवून पुढील लोकी वा जन्मी प्रस्थान करतात. अश्या सामूहिक आपत्तीत या लोकांना आणि त्यांच्या परिवाराला खूप अपेष्टा, कष्ट व ताप सहन करावा लागतो. पण एक लक्षात घ्या कि, मुळात हे जगच  एकप्रकारचं यज्ञकार्य आहे. ज्यामध्ये सूर आणि असुर शक्तींचा संघर्ष नित्य आणि अवि...