Skip to main content

देवकी ८

देवकी - ८

सुरक्षेसाठी नेमलेल्या सेनेचा मुख्य त्या संदेशवाहकाच्या दिशेने निघाला. संदेशवाहकाने आदरपूर्वक सेनाप्रमुखाकडे महाराजांचा संदेश असलेला लखोटा दिला. मी मात्र पाहण्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हते. स्तंभित आणि मूढ भावाने जे घडतंय ते पहात राहण्याव्यतिरिक्त अन्य काहीही हातात ठेवलं नव्हतं,नियतीने. त्यामुळे नियतीचे फासे जसे पडतील तसं आपल्याला पुढे ढकलायचं, किंबहुना ढकललं जायचं. कदाचित इतकंच आता आपल्या हातात उरलंय हे लक्षात आलं.

परंतु कितीही म्हटलं वा ठरवलं तरी मानवी भावना आणि मन काही गोष्टी स्वीकारून सुद्धा त्यासाठी स्वतःला बदलायला तयार नसतं. कारण आशा खूप वेडी असते. मनाचा गाभारा अंधःकाराने व्यापला होता तरी त्याच्या  कोपऱ्यात कुठंतरी एक आशा शिल्लक होती, ती अजून आस धरून होती, दादाला कदाचित पश्चाताप होईल. त्याच वेड्या आशेने मी संदेशाचा लखोटा हातात घेऊन येणाऱ्या सेनापतीकडे पहात होते. 

अर्थातच वसुदेव अजूनही निश्चल आणि अविचल होते. त्यांच्या चर्येवर तसूभरदेखील बदल दिसत नव्हता. सेनापती रथाजवळ येऊन , वसुदेव व मला ऐकू येईल इतक्या उंच आवाजात सारथी आणि सोबतची सेना यांना उद्देशून म्हटलेले , ते वज्रघाती शब्द कानात गरम शिसाचा रस ओतावा तसे आदळले. 

"रथ कारागृहाकडे न्यायचा आदेश आहे महाराजांचा आहे. तिथे गेल्यावर (एक क्षण सेनापती थांबले, त्यांनी वसुदेवाच्या निश्चल चेहऱ्याकडे पाहिलं, त्याच्या चर्येवरील भाव बदलले, तो थोडा खजील झाला, कारण त्याचं अनुमान चुकलं, वसुदेव शांतच होते) दोघांनाही हातापायात बेड्या घालून कारागृहात बंदी म्हणून ठेवण्याचा आदेश आहे, महाराजांच्या पुढील आदेशापर्यंत." 

सर्व सैनिक , सुन्न झाले होते. आदेश बंदी बनवण्याचा , तोदेखील प्रत्यक्ष महाराजांच्या भगिनीला. सर्व नभंगण क्षणात  अदृश्य अश्या भयाच्या वलयाने झाकलं गेलंय असाच भास होऊ लागला. कदाचित आपली मानसिक स्थिती जशी असेल त्यानुसार आपल्याला सभोवतालचं जग दिसतं वा जाणवतं, तसं काहीसं माझं झालं असावं.  त्याच भीतीच्या जोखडांनी आणि भविष्याच्या अनिश्चीततेने एकदा मनाला बेडी घातली की कारागृहाच्या बेड्या ही एक औपचारिकताच ठरते. 

रथ शांतपणे वळला आणि कारागृहाच्या दिशेने निघाला. इतकी वर्षे या राजप्रसादात घालवली, परंतु कारागृहाकडे जाण्याचा वा त्याबद्दल काही माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.  अशी वेळ कधी येईल या जन्मात असं स्वप्नात देखील कधी पाहिलं नव्हतं. पण आज प्राक्तनाने ती वेळ पण आणली आमच्यावर. मी वसुदेवांच्या चेहऱ्यावरील शांत भावाने विस्मयीत झाले होते.

अर्थातच त्यांनी माझा कर आपल्या करात आधीच धरून ठेवला होता, कदाचित माझ्या मनःस्थितीची त्यांना पूर्वकल्पना माझ्या स्वभावामुळे, आकाशवाणीच्या पश्चात लगेच आली असावी. तसं त्यांनी दिसू दिलं नाही परंतु त्यांची त्यांनंतरची प्रत्येक कृती त्याचंच द्योतक होतं. ईश्वराची तेवढीच कृपा, दुःखाच्या या महाप्रलयात, की त्याने जीवन रथाचा सारथी म्हणून  एका महान विभूतीला माझ्यासोबत या सागरात स्थापित केलं होतं. अन्यथा....... हा विचारदेखील माझं मन आज तरी करू धजत नाही. 

विचारांच्या या काळ्याकुट्ट मार्गावर, यमपाशाच्या आधी, हे कारागृह नावाचं जे काटेरी विश्व होतं ते आलं. हो विश्वच आणि कारागृह काटेरीच असणार कुणाच्याही आयुष्यात आणि या नरकयातनात, जर शेवट कधी, हे माहीतच नसेल तर, फक्त भयाण अंधःकाराचा विशाल सागर आणि आपण त्यात अडकलेले प्रवाहपतित यात्री, इतकंच उरतं. आम्हाला उतरण्याचा आदेश आला...

भाग ८   समाप्त .......

क्रमशः 

वसुदेवसुतं देवम कंसचाणूर मर्दनम ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुम ll


संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...