सुभद्राहरण २०
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
इकडे सीमेवर यदुवीर आश्रमातून अर्जुनाच्या कपिध्वज विराजित रथातून आश्रमाबाहेर आला. अर्थातच तपस्वी रूपातील अर्जुनाला हात जोडून नमस्कार करत कृष्णाने त्याचा निरोप घेतला. सर्व सुवर्णरथ दादांच्या आज्ञेने दळभार सुरक्षेसह निघाले आणि द्वारकेच्या सीमेवर पोचले. सर्व परिवारवासी एकत्र आल्यावर कृष्ण तपस्वी साधूंना म्हणाला
" मी आपल्याला यात्रेस्थळी भेटीन. आपण सकुशल आपल्या रथातून यात्रेस्थळी यावं. आपल्या सेवार्थ सेवकवर्ग सह येईलच. "
इतकं बोलून कृष्ण द्वारकेच्या रथांच्या समीप आला.
सीमेवर अर्थातच यादवनरेश कृष्ण स्वतः दादांच्या रथात आरूढ झाला. सर्व जनासामान्यांना सोबत घेऊन सर्व लवाजमा मजल दरमजल करत रैवतक पर्वतावरील यात्रेस्थळी निघाला. मार्गात एका रथाकडे सुभद्रेचं लक्ष सतत जात होतं, ज्यावर कपिध्वज विराजमान होता. वेगळाच पण सुशोभित ध्वज दुरूनच दिसत असल्यामुळे सतत त्या ध्वजाकडे ती आकृष्ट होत होती. यात्रेत पोहोचताच सुभद्रेच्या सर्व सख्या तिला घेऊन जायला आल्या. परंतु माता देवकीने सांगितले की,
" यात्रेत आल्याप्रमाणे आधी शक्तीपूजा होईल तद्नंतर तुम्ही सुभद्रेला यात्रेत घेऊन जाऊ शकता. अर्थात राजकीयकारणे उचित सुरक्षा सोबत घेऊनच तुम्हाला जावे लागेल. "
सुरक्षासोबत राहिल याकारणे थोड्याश्या नाखुषीनेच सर्व सख्या तयार झाल्या. सर्व राजपरिवाराचं स्वागत उत्सवाचे पारंपारिक आयोजक भोज, वृष्णी संघ आणि अंधक वंशाचे यांनी केलं. प्रमुख स्वागतासाठी मंदिर परिसरात उपस्थित होतेच. राज परिवारातील सर्वांचं यथोचित स्वागत झाल्यावर राज परिवारातील सर्वांनी विधिवत पूजा अर्चनेचा आनंद घेतला. अर्थातच आयोजकांनी सर्वांना उंची भेटवस्तू देऊन कृष्ण बलरामदादा यांसह समस्त परिवाराचा सन्मान केला.
यात्रेत विविध शोभिवंत व उपयोगी वस्तूंच्या व साज शृंगाराच्या खरेदी करता, सुभद्रेच्या सर्व सख्या अर्थातच मातेची अनुमती घेऊन, सुभद्रेला घेऊन हास्यनादात पसार झाल्या. कृष्ण दादांच्या अनुमतीसाठी दादांना म्हणाला
" दादा आपल्या आज्ञेनुसार महायोगी यात्रेत आले आहेत. मला वाटतं माझं हे कर्तव्य आहे की त्यांना यात्रेत काही हवं नको विचारणं. यास्तव मी आपल्या अनुमतीने त्यांच्या सोबत राहून मग निघताना आपल्या सोबत येईन."
" ठीक आहे परंतु आपली निघण्याचा समय येईपर्यंत या , आम्हाला ताटकळत ठेवू नका."
याला अर्थातच कृष्णाने मानेनेच होकार दिला. माता पिता उग्रसेन व स्वभार्या यांची अनुमती घेऊन कृष्ण, तपस्वी अर्जुन याच्याकडे रवाना झाला. अर्थातच कोणालाही कळू नये म्हणून कृष्ण अर्जुनाशी महायोगी असल्याप्रमाणेच संवाद करत असे. यास्तव अर्जुनासमीप पोचल्यावर स्वामींना नमस्कार करून अर्जुन म्हणाला.
" आपल्याला इथे येण्यास फार कष्टतर झाले नाहीत ना आणि द्वारकेच्या सेवकांनी आपली पुरेशी विचारपूस मार्गात केली ना."
" हे द्वारकानाथ केशव, आपल्या आदरातिथ्यात काही कमतरता असूच शकत नाही. सर्व व्यवस्था उत्तमच होती. आमची काही तक्रार नाही. परंतु यात्रेत फिरून थोडा यात्रेचा आनंद घ्यावा असा मानस आहे. याकारणे आपण सोबत आलात तर उत्तम."
कृष्ण म्हणाला
" अर्थात याचसाठी मी दादांची अनुमती घेऊन आपल्याला यात्रेत नेण्यासाठी घेऊन जायला आलो आहे."
दोघेही कृष्ण आणि साधुवेशातील अर्जुन कृष्णाच्या रथात आरूढ होऊन निघाले. मार्गात रथ थांबवून यात्रेत फिरण्याचा आनंद घेता यावा यासाठी दोघे पायीच निघाले. विविध वस्तूंची अनेक दुकाने पार पाडत पाडत वार्ता करत करत दोघे एका मोठ्या चौकात पोहोचले. अर्थातच समोरच्या बाजूला आपल्या सख्यांसह हास्यविनोद करत उभी असलेली, सुस्वरूप कोमलांगी सुभद्रा अर्जुनाच्या नजरेस आली आणि चालता पाय तिथेच स्थिर झाला, जणू की एखादा खांब भुवर स्थापित करून स्थिर करावा.
अर्जुन आपलं देहभान व परिस्थिती दोन्ही विसरून एकटक सुभद्रेकडे पाहात आहे आणि कृष्ण अर्जुनाकडे.
क्रमशः
भाग २० समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment