सुभद्राहरण १२
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
अर्जुनाचं धनुष्यातील कौशल्य आणि निपुणता पाहून निषाद संतोषला. निषादाच्या भात्यातील सर्व बाण व अस्त्रांना अर्जुनाने अचूक प्रत्युत्तर दिलं होतं. अर्जुनाच्या या धनुष्य कौशल्याने अत्यंत हर्षित झालेल्या निषादाचे स्वरूप बदलून प्रत्यक्ष उमापती कैलासेश्वर समोर उभे राहीले. अर्जुन ते पाहून क्षण एक स्तब्ध झाला, स्तंभित झाला पण लगेच सावरून शिवशंकरांना चरणांवर मस्तक ठेवून पूर्ण श्रद्धेने नमन करून हात जोडून उभा राहिला.
अर्जुनाच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. ते पाहून भगवान शंकर अर्जुनाला म्हणाले
" हे वीरपुरुष तू कोण आहेस, तुझा परिचय काय आहे आणि कीं कारणम् येथे आला आहेस. तू उत्तम धनुर्धर आहेस, तुझे गुरुकुल कोणते आहे आणि तुझ्या नेत्रातून अश्रू का येत आहेस."
भगवान शंकराच्या आश्वस्त बोलने भानावर येत हात जोडलेल्या स्थितीत अर्जुन म्हणाला
" हे त्रिलोचन , भगवान महेश्वर, सर्वप्रथम मला आपण क्षमा करावी, अजाणता मी आपल्यावर शस्त्र चालवून आपल्यासमवेत द्वंद्व केलं आणि अत्यंत उद्दंडतेने आपल्याला आव्हानीत केलं. मी त्याबद्दल क्षमायाचना करतो. आपण दयानिधी आहात. आपण नक्कीच मला क्षमा कराल.
मी पांडू आणि कुंती यांचा पुत्र धनंजय अर्थात अर्जुन आहे. मी श्रीकृष्ण यांचा दास आणि गुरुवर्य श्रीद्रोणाचार्य यांचा शिष्य आहे. आता मी प्रायश्चित्त करण्यासाठी बारा वर्षे ब्रम्हचर्याचं पालन करण्यासाठी निघालो आहे."
भगवान म्हणाले
" हे श्रेष्ठ धनुर्धारी वीर अर्जुना, एक योद्धा आणि क्षत्रिय जे करेल तेच तू केलंस. त्याबद्दल तू कोणताही संकोचभाव बाळगू नकोस आणि मी त्याबद्दल क्रोधीत नाही. किंबहुना मी तुझ्यावर अतिप्रसंन्न आहे. मी तुझ्या धनुर्विद्येतील कौशल्याने प्रभावित आहे. त्याकारणे तुला एक वर देऊ इच्छितो. बोल वत्सा."
अर्जुन नमस्कार करून म्हणाला
" हे पिनाकपाणी, त्रिशूलधारी, आपण मला दर्शन दिलंत यातच मला सर्व प्राप्त झालं. परंतु आपण जे योग्य समजाल ते मला द्या मी त्याचा स्वीकार करेन."
अर्जुनाच्या या लीन व याचनारहित वृत्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी अर्जुनाला कवच किरीट प्रदान केले. अर्जुनाने त्याचा स्वीकार करून पुनः नमन करून आशिष घेतले. शिवशंकर प्रसन्नतेने अंतर्धान पावले. अर्जुनाने आपली यात्रा पुढे सुरू केली. अनेक तीर्थांचं दर्शन घेत त्यायोगे पुण्याचा लाभ घेत घेत महातीर्थ रामेश्वर येथे पोहोचला.
तिथे नित्यकर्म व रामेश्वरात तिर्थस्नान करून, रामेश्वराचे दर्शन घेऊन ध्यानधारणा करण्यासाठी रामेश्वरात समुद्र किनाऱ्यावर उत्तम स्थळ शोधतो. तिथे जाऊन बसणार इतक्यात अर्जुनाचं लक्ष जवळच बसलेल्या अंजनीसुत हनुमंताकडे जातं. अर्जुन बैठक सोडून हनुमंताजवळ जाऊन नमस्कार करून म्हणतो.
क्रमशः
भाग १२ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment