सुभद्राहरण २२
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
अर्जुन एकाग्रतेने कृष्णाचं म्हणणं ऐकत होता आणि कृष्ण पूढे सांगत होता.
"क्षत्रियांमध्ये बलपूर्वक कन्येचे हरण करून तिच्याशी विवाह करण्याची प्रथा देखील शास्त्रसंमत आहे. प्रत्यक्ष माझाही विवाह रुक्मिणीचे हरण करून झाला आहे , हे तू जाणतोस. अर्थात यात मी रुक्मिणीच्या संमतीने तिचे हरण केले हा भाग आहे. परंतु तुला याच मार्गाने जाऊन सुभद्रेशी विवाह करावा लागेल. कारण आजच्या घडीपर्यंत दादांचा रुकार या विवाहास नाही हे नक्की,म्हणून ही योजना."
अर्जुन कृष्णाला विचारता झाला.
" परंतु हे सखया तुझी यात मुकसंमती आहेच हे गृहीत धरून मला हे कसे साध्य होईल हे विस्ताराने सांग. कारण त्यायोजने प्रमाणे करण्यास मी समर्थ आहे. पृथ्वीच्या पाठीवर जे प्रशस्त मार्ग उपलब्ध आहेत, त्यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून मला सुभद्रेशी विवाह करावयाचा आहे. कारण तिच्या प्रथम नेत्रप्रहाराने मी पूर्ण घायाळ झालो आहे, हे तू जाणले असशील."
कृष्ण मंद स्मित करून म्हणाला
" वत्सा तू माझा सन्मित्र आहेस आणि मी तुझा एक सच्चा हितचिंतक असल्याने मी तुझ्या हिताचेच मार्ग सांगीन. ऐक तर, या उत्सवानिमित्ताने आम्ही येथे निवासी आहोत. त्याच्या आत तुला ही संधी आहे सुभद्रेचं हरण करून तिच्याशी विवाह करण्याचा. कारण या उत्सवाच्या धामधुमीत सर्वजण व्यग्र असतील, याकारणे थोडे दुर्लक्ष असेल.
म्हणूनच जेंव्हा, निघण्याआधी पुन्हा सुभद्रा महाशक्तीच्या पूजेसाठी येईल आणि पूजेपश्चात ती रथातून येथील आमच्या निवासस्थानी प्रस्थान करण्या साठी रथारुढ होईल, याच समयी तू तिला रथातून उचलून तुझ्या रथात घेऊन हरण करावेस. तिच्या रक्षणार्थ तिच्या सोबत सैन्य असेल, परंतु मला तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे."
" परंतु वासुदेव या कार्यसाठी मला एखादा उत्तम रथ मिळाला असता तर......."
"जाणतो मी , म्हणूनच माझा सारथी दारुकासह तुला माझा दिव्य रथ सर्व शस्त्र अस्त्र यांसह सुसज्जीत स्थितीत मी देतो. तो रथ तुला या कार्यात नक्कीच सहाय्यक होईल. अर्थात माझा रथ मी तुला महायोगी म्हणून देईन हे सांगणे न लगे."
यावर दोघेही प्रशस्त हसले. कृष्ण पुढे म्हणाला
" ज्या वेळी ही गोष्ट माझ्याप्रत येईल तेंव्हा नक्कीच मी यावर माझे मत , जे तुझ्या बाजूनेच असेल , ते देईन.बाकी कार्य सिद्धीस नेण्यास श्रीगणेश समर्थ आहेत आणि तुझ्याकडे त्यायोग्य सामर्थ्य आहे. माझ्या सदिच्छा तुझ्या सोबत आहेतच."
अर्जुन कृष्णाला म्हणाला
" माझी अशी इच्छा आहे की या कार्यात ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिर यांची अनुमती शीघ्र गतीने प्राप्त करावी हे माझे मानस आहे. यास्तव तुझेच सहकार्य लागेल, यदुवीरा."
कृष्णाने यास संमती दिली आणि तातडीने शीघ्र गतीने जाणाऱ्या अश्वासह एक दूत त्वरित , अर्जुनाचा संदेश घेऊन इंद्रप्रस्थाला धाडला. इंद्रप्रस्थाहून अतिशीघ्र गतीने तो दूत रैवतक निवासी, महाराज युधिष्ठिर यांची अनुमती घेऊन, आला. आता सर्व मनासारखे योजले गेले. मात्र त्याची अंमलबजावणी करणे बाकी राहिले.
क्रमशः
भाग २२ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment