सर्वात प्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!💐💐
खरतर गत वैभवाच्या शिखरावर अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचं कौतुक करायचं की, भविष्यात पुनः एकदा कधीतरी त्या वैभवाप्रत पोहोचू या आशेने शुभेच्छा द्यायच्या हा एक संभ्रमच आहे. कारण सलग पंधरा वर्षे राज्य करूनही राज्याला त्या वैभवाला न पोचवू शकलेले, पाच।वर्षात तुम्ही काय केलंत म्हणत निवडणूक मैदानात उतरले. मतदारांनी त्यांना पूर्ण परास्त करूनसुद्धा जवळजवळ सत्तेत पोहोचलेल्या युतीला शह देत त्यातील एक मोठा पक्ष फोडत त्यांना नाममात्र मुख्यमंत्रीपद देत सर्व सत्तेचं नियंत्रण आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झाले.
म्हणजे 20% मिळवलेले दोन आणि 20% वाला तिसरा मिळवून आमचं बहुमत असं येनकेनप्रकारेण करून सत्तेत तर पोहोचले. परंतु त्यातील खरा आनंद त्यांनाही नियतीने मिळू दिला नाही. आधी तिजोरी रिकामी असल्याचं नाटक करून झालं. त्यांनतर लगेचच करोनाचं जागतिक संकट आलं. यात सत्तेतील पक्षांची होत असलेली तारांबळ, ताळमेळाचा गोंधळ, अंमलबजावणीतील अनियमितता आणि समन्वयाचा अभाव हा ठायी ठायी जाणवतोय. त्यातही कमजोर नेतृत्व आणि बलशाली सत्ताबाह्य केंद्र यामुळे सत्तेत राहून कोणताच निर्णय धडपणे व स्वतःच्या मर्जीने घेऊ न शकणारे जेरीस आले नाहीत तरच नवल.
त्यातही त्यांना 25 वर्षांची सवय काय तर, भाजपाचे वरिष्ठ नेते येऊन नाकदूऱ्या काढत होते. पण इथे तर चित्र उलट दिसत आहे. यांनाच पंचम जॉर्ज आणि राणी व्हिक्टोरिया यांची मर्जी सांभाळून काम करावं लागतं आहे. किंबहुना त्यांच्या सल्ल्यानेच आदेशांवर फक्त सह्या कराव्या लागत आहेत. हे चित्र काँग्रेसच्या काळातील 70, 80 व 90 च्या दशकातील सर्व होयबा मुख्यमंत्र्यांची आठवण करून देत आहे.
या सर्वात हे त्यांच्या लक्षात येत नाहीये की, ज्या महाराष्ट्राचे पाईक म्हणून त्यांनी पक्ष स्थापन केला त्याच राज्याचं अपरिमीत नुकसान करत आहोत. पक्षाची वाताहत होते आहे ती वेगळीच. पक्षाचं आणि पक्ष कार्यकर्त्यांचं मनोधैर्य दिवसागणिक खच्ची होत आहे ते वेगळंच. परंतु आजतरी त्यांनी डोळ्यावर पट्टी ओढल्यामुळे ह्याचे दृश्य गंभीर परिणाम हे झाल्यावरच त्यांना दिसतील आणि त्यावेळी काळ खूप पुढे निघून गेला असेल.
या सर्वात भाजपला काहीच गमवायचं नाहीये. उलटपक्षी जेवढे जास्त दिवस हा खेळ चालू राहील तेवढे जास्त ते सत्तेच्या जवळ पोहोचतील हे नक्कीच. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. जसं फडणवीस देखील चुकीच्या मित्रावर विश्वास ठेवल्याचा परिणाम भोगत आहेत. त्यामुळे प्रत्येकाची वेळ येते हे शास्त्रवचन आहे.
असो करोनाच्या रोजच्या वाढत्या प्रकोपाने आधीच हैराण झालेली जनता सत्तेतील हा खेळ निमूटपणे पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यातही पोलीस व वैद्यकीय पथकांवरील हल्ले आणि त्याविरुद्ध काहीही कारवाई न करू शकणारे सत्ताधीश पाहून, काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची होऊ नये हीच सद्इच्छा.
पुन्हा एकदा आशा करूयात की, महाराष्ट्र या आपत्तीवर लवकरात लवकर मात करेल आणि विकासात अग्रेशीत होईल.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
जय महाराष्ट्र !!!!!!
©® लेखन : प्रसन्न आठवले
०१/०५/२०२०
०८:४५
Comments
Post a Comment