सुभद्राहरण २१
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
अर्जुन आपलं देहभान व परिस्थिती दोन्ही विसरून एकटक सुभद्रेकडे पाहात आहे आणि कृष्ण अर्जुनाकडे. अर्जुनाच्या नजरेने स्वर्गीय सौन्दर्य पाहून अर्जुनाला जणू एका जागी खिळवून ठेवलं. तिकडे सुभद्रेची देखील तापसींवर नजर गेली आणि तिला त्यांचा चेहरा व एकूण वर्तन यातून अर्जुनाचा भास झाला. त्या एक क्षण झालेल्या नजरानजरेने घायाळ अर्जुनाची मनःस्थिती अर्थात कृष्णाव्यतिरिक्त अन्य कोणीच जाणू व समजू शकला नसता.
कृष्णाच्या लक्षात आल्यावर कृष्णाने हळूच अर्जुनाच्या कानात म्हटलं
" हे पार्था , आता तू महंत वेशात आहेस त्यामुळे लोकांच्या लक्षात येईल अशी गोष्ट करू नकोस. दुसरी गोष्ट अशी की जीच्याकडे तू भान हरपून पाहत आहेस ती वसुदेवांची लाडकी कन्या आणि माझी व दादांची लाडकी भगिनी सुभद्रा आहे. तुझी मनःस्थिती मी जाणतो पण इथे जनात शोभा होईल."
कृष्णाचे म्हणणे ऐकून त्याच अवस्थेत जराही विचलित न होता कृष्णाला अर्जुन म्हणतो.
" हे यदुनाथा , तूच माझी मनःस्थिती जाणू शकतोस आणि जर खरच जाणली असशील तर काहीही करून सुभद्रेशी माझा विवाह करून ती माझी राणी होईल हे तूच बघ."
यावर कृष्ण अर्जुनाला म्हणाला
" हे धनंजया, एक तर दादा यावेळी हे जाणत नाहीत की तूच अर्जुन आहेस. त्यांना असं वाटतंय की, तू एक तप बाहेर आहेस, त्यामुळे त्यांचा सुभद्रेच्या विवाहाबाबत , सध्या मानस भिन्न आहे. याकारणे, माझी इच्छा असूनही, मी तुला प्रत्यक्ष काहीही साहाय्य करू शकत नाही."
" म्हणजे केशवा तुझा या विवाहास रुकार आहे तर, मग एक सच्चा मित्र , प्राणप्रिय सखा म्हणून तुच माझी इच्छा तडीस नेण्यासाठी मार्ग सुचव."
" धनंजया , तुझ्या धिटाईचं कौतुक आहे.माझ्या सख्ख्या भगिनीवर,माझ्या समक्ष तुझं प्रथमक्षणी प्रेम जडले, यास्तव मीच तुझे सहाय्य करावे, हे तू मलाच म्हणजे तिच्या भावासच सांगतो आहेस. कौतुक आहे."
" हे यदुवीरा , जितका मी तुला जाणतो त्यात हे मी नक्कीच जाणले आहे की,जर ही गोष्ट तुला रुचली नसती वा नापसंत असती तर तंत्क्षणीच तू यात मोडता घालून मला हे करण्यापासून परावृत्त केले असतेस. खरे ना ?. त्यामुळे आता या तुझ्या दासास तूच सहाय्य करावेस हे माझे तुझ्या चरणी मागणे आहे."
" तुझी हीच गोष्ट मला सर्वात प्रिय आहे मित्रा. तू जे वाटते ते बोलून मन मोकळे करून टाकतोस. म्हणजे आत एक बाहेर एक असे नाही. म्हणून पाचही भावंडांमध्ये तू मला अतिप्रिय आहेस."
" हे कृष्णा तुझा हा स्नेह मला शेवटच्या श्वासापर्यंत मिळो. हीच तुझ्याकडे प्रार्थना."
" राहील वत्सा राहील, चिंता नसावी. आता तुझ्या समस्येकडे वळू. मी प्रत्यक्ष यात काही करू शकत नाही हे निश्चित. त्याचप्रमाणे तुमच्या इथे जशी स्वयंवर प्रथा आहे तशी आमच्यात ती नाही. परंतु जरी असं स्वयंवर आयोजित केलंच तरीही सुभद्रा तुला वरमाला घालेल याची संपूर्ण शाश्वती नाही.तिच्या मनात त्यादिवशी जो वर उचित वाटेल त्याला ती वरू शकते. "
अर्जुन एकाग्रतेने कृष्णाचं म्हणणं ऐकत होता आणि कृष्ण पूढे सांगत होता.
क्रमशः
भाग २१ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment