सुभद्राहरण १६
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
साधुवेशातील अर्जुनाने अर्थातच याला संमती दिली आणि श्रीकृष्ण सवेगे द्वारकेत प्रसादाकडे निघाला. श्रीकृष्ण विचार करतो आहे की शीघ्रतेने जाऊन दादांना हे थोर साधुपुरुष आल्याचे वर्तमान सांगावे म्हणजे त्यांची अनुमती मिळाली तर अर्जुनाचा मुक्काम चार महिने इथे राहील आणि आपला हेतू साध्य करता येईल. या अपेक्षेत श्रीकृष्ण द्वारका प्रासादातील दादांच्या महालात येतो.
श्रीकृष्ण दादांच्या समीप जाऊन म्हणतो
" दादा , एक महायोगी, तपस्वी, सिद्धपुरुष अनेक तिर्थक्षेत्रांचं दर्शन घेऊन तपयोगसाधना करून यात्रा करत करत द्वारकेपर्यन्त येऊन पोचले आहेत आणि नगराबाहेर आश्रमात थांबले आहेत."
" अरे कृष्णा मग त्यांना हे चार मास द्वारकेत मुक्काम करण्यास सांगायचस म्हणजे आपल्यालादेखील सेवेची संधी मिळेल."
" दादा आपलं मन जाणणारा या जगतात मीच आहे फक्त. मी त्यांना तशी विनंती करूनच आलोय. आपल्या अनुमतीसाठी आधी येण्याऐवजी नन्तर आलो याबद्दल क्षमा असावी."
" कान्हा तू कधी कधी खूप चतुराईने वागतोस आणि माझ्या मनातलं आधीच करतोस. अश्या वेळी कशाला उगाच क्षमेचा उपचार. असुदे तरीही केली क्षमा. परंतु त्यांच्या आदरा तिथ्यात काहीही कमतरता खपवून घेतली जाणार नाही, हे लक्षात ठेव. कारण अश्या पवित्र चरणांची सेवा करण्याचं सद्भाग्य द्वारकेला मिळतंय आणि ते कोणतीही चूक न होता पार पडलं पाहिजे, ही माझी आज्ञा आहे हे लक्षात असुदे."
" दादा अर्थातच आपल्या आज्ञेनुसारच होईल आणि त्या स्वामींची पूर्ण काळजी घेतली जाईल. त्यांची काहीही नाराजी होणार नाही याचं मी आश्वासन देतो. परंतु आपण आणि पिताश्री यांनी स्वये त्या तापसी महायोगींचं दर्शनाचा लाभ घेतला असतात तर अत्यानंद झाला असता"
श्रीहलधर याला अर्थातच नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी पिताश्री वसुदेव यांना याबाबत पृच्छा करून अनुमती घेण्याचं कार्य श्रीकृष्णावर सोपवून त्वरित त्याबाबत सूचना करण्याची आज्ञा केली. श्रीकृष्णाने दादांना नमस्कार करून पिताश्रींच्या महाली प्रवेश केला. यादवराज श्रीवसुदेव यांना चरणस्पर्श करून श्रीकृष्ण म्हणाला
" पिताश्री, नगराबाहेर एक महायोगी तपस्वी सिद्धीप्राप्त साधुपुरुष आले आहेत. दादांच्या अनुमतीने त्यांना द्वारकेत चातुर्मास विश्राम करण्याची विनंती करून आलो आहे. दादा त्यांच्या दर्शनास उत्सुक आहेत परंतु आपणासह निघण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. आपणही यावं अशी माझीदेखील तीव्र इच्छा आहे. आपली अनुमती असेल तर मी रथ तयार करून निघण्याची आज्ञा देतो."
"बलराम आणि तू दोघे तयार आहात आणि साधुसज्जनांच्या दर्शनाचा लाभ घेण्यास कोण अनुत्सुक असेल. लगोलग निघुया. शुभकार्याला विलंब नको"
पिताश्री आणि दादा यांची अनुमती मिळताच कृष्णाने त्वरित दोन रथ मागवून पिताश्री आणि दादा यांना संदेश पाठवून आपण रथासमीप प्रतीक्षेत उभा राहिला.
क्रमशः
भाग १६ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment