सुभद्राहरण ३४ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
सर्वजण उपस्थित होऊन स्थिरस्थावर झाले आणि पुरोहितांनी मंत्रोच्चाराला सुरवात केली आणि विवाहविधीं प्रारंभ झाले.
तत्कालीन प्रथेनुसार विधींना सुरवात झाली. अर्थातच सर्वांना प्रतीक्षा होती ती वधूच्या आगमनाची. केशरी रंगाची सुंदर पैठणी नेसलेली, नखशिखांत अलंकारांनी सजलेली, मुळात रूपवती असलेली सुभद्रा आज वधूच्या शृंगारात अलौकिक दिसत होती.
जणू तिच्या प्रभेमुळे प्रत्यक्ष सूर्याची तप्त किरणं आपला ताप विसरून सुभद्रेला पाहायला आरक्त झाली आहेत. नील नभात सुरवर, देवादिकांना ज्यांच्यावर मत्सर उत्पन्न होतो ते गंधर्वसुद्धा, तिला पाहायला उत्सुक आहेत, रती स्वतः सुभद्रेच्या सौन्दर्याकडे पाहून , खिन्न झाली आहे अशी रुपसंपन्न सुभद्रा आलेली पाहून अर्जुनाचे नेत्र पापण्या मिटायचेच विसरले की काय असाच भास होतोय. ते पाहून सुभद्रा लज्जित होऊन तिच्या सौंदर्यात वृद्धी होत आहे.
वधू वर दोन्ही स्थानापन्न झाले. होमात हवनाच्या आहुत्या पडायला सुरुवात झाली. पुरोहित मंत्रोच्चाराच्या गजरात एक एक विधी पूर्ण करत होते. उपस्थित जनसमुदाय विधींचा आनंद घेता घेता जलपान, रसपान यांचाही आस्वाद घेत आहे. साक्षात नारायणाच्या भगिनीच्या विवाहाला कसलीच कमतरता नव्हती. विवाहाला उपस्थित सर्व आमंत्रित निमंत्रित
व जनसामान्य सर्वांच्या आदरातिथ्यासाठी यादववीर खासे राबत होते.
कोणाला कसलीही उणीव भासून तक्रार येईल हे खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त तंबीच दादांनी दिली असल्या मुळे कुणी काही मागायच्या आधीच पेय जल वा खाण्याचे जिन्नस बसल्याजागी दिले जात होते. मंडपात खास व्यवस्था ही विविध प्रकारच्या उंची सरबतांची होती. सर्व प्रकारच्या फळांच्या सरबतांचा वर्षाव होता. मंडळी पिऊन थकतील पण बनवणारे आणि देणारे कर थकणार नाहीत अशीच व्यवस्था होती.
कृष्ण स्वतः वरासोबत राहून त्याला काय हवं नको ते पाहण्यात मग्न होता. मध्येच उठून कार्याची व्यवस्था पाहून दादांकडे संतोष व्यक्त करत होता. जगतनियंता आपल्या लाडक्या सख्याचा, आपल्याच लाडक्या भगिनीसोबत, होत असलेला विवाह पाहून हरखून गेला होता. त्याच्या आनंदाला सीमाच नव्हती. कृष्णदेखील आज कमी देखणा दिसत नव्हता. परंतु हे तेज कार्याच्या समाधनाचं होतं.
बलरामदादा एका जागी स्थिर रहात नव्हते. कारण आल्या गेल्याचं आणि कार्याचं सर्व बघण्याची जबाबदारी घेतलेले दादा इथेही रणांगणातील वीराप्रमाणे आदेशाच्या गदा चालवून कार्यात कोणतीही कसूर राहणार नाही याचीच पाहणी करण्यात व काही न्यून आढळल्यास सदर व्यक्तीस रागे भरण्यास मागे पुढे पहात नव्हते. अंतरी निर्मळ असलेले दादा प्रत्येक कार्य हे युद्धासम तत्परतेने आणि यशस्वी करण्याच्या मनिषेने सज्ज होत असल्याने त्यांना गैरसोय वा कुचराई खपत नसे, इतकंच.
विवाहाचे विधी संपन्न होत असतानाच दोन्ही बंधू मान्यवर उपस्थितांची व्यवस्था पहात होते. एका अर्थी दोघेही कार्यव्यग्र होते. एक एक विधी होत होत कार्य विवाहाच्या मुख्य विधिकडे अर्थात विवाहाकडे पोहोचले. वराला विवाहवेदीवर उभा करून पुरोहितांनी वधुस घेऊन येण्याची आज्ञा केली आणि मंगलाष्टके सुरू झाली.
क्रमशः
भाग ३४ समाप्त
२८/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment