देवकी - ६
या आयुष्याचं मर्म काय, जगण्याचं वर्म काय हे माहीत नाही आजतरी. पण वसुदेवांशी का गाठ मारली माझी, विधात्याने हे मात्र त्या क्षणी जाणवलं, समजलं. आजही मी हाच विचार करते आणि थरकाप होतो अंगाचा की जर त्या दिवशी वसुदेव नसते तर माझा अंत कंसाच्या हातून निश्चित होता. पण त्यानंतरचं जीणं हे तर मृत्यूहूनही भयंकर अस दुःस्वप्न आहे. ही कारागृहातील रात्र, नव्हे तर, प्रत्येक क्षण अंतरात्म्याचा ठाव घेतो, काळजाचा ठोका चुकवतो. प्रत्येक पळ मृत्यू एक एक पाऊल पुढे येतो आहे, हीच जाणीव काळीज पोखरून टाकते आणि मग जाणिवा चेतना व संवेदना आत्मक्लेश देतात. का हे अस जीणं वाट्याला यावं, आपल्याच.
फक्त वसुदेवांची आयुष्यातील उपस्थिती हाच काय तो जगण्याचा आशावाद. मृत्यूच्या या घनघोर तांडवात मला आधार हा फक्त त्यांचा आहे, वसुदेवांचा. त्यांचा धीरोदात्तपणा कधी काळजाचा ठेवा बनतो तर कधी आश्चर्य वाटतं. कसं काय एखादा मानव मृत्यू प्रत्यक्ष धर्मपत्नीच्या भावाच्या रुपात थैमान घालत असताना शांतपणे वचन बद्धता पाळण्याचं धैर्य दाखवू शकतो. इतका टोकाचा स्वभाव व वर्तणूक असलेली दोन व्यक्तित्व माझ्या इतक्या निकट आहेत. एक जन्मतः भाऊ, पण आज कट्टर वैरी झालेला आणि एक साता जन्माचा सोबती. पण या जन्मात ओळख होऊन फार काळ न लोटलेला, तरीही आपल्या जीवासाठी कोणतंही धाडस करायला न भिणारा.
अंतर्मनात ही चाललेली घालमेल, कोणालाही आपल्या चर्येवरील भावावरून सहज समजू शकेल. पण ह्या जगण्यातील दाहकता कदाचित जो हा जन्म जगेल त्यालाच कळू शकेल. पण हे विधात्या, हे सर्वेश्वरा, असं जीणं, असं वास्तव आणि हा अंतरात्म्याला पिळवटून काढणारा, जाळणार आणि तरीही न संपणारा विस्तव , हा वणवा अनंतापर्यंत कोणाच्याही वाट्याला येऊ देऊ नकोस, इतकाच आर्जव आज मी तुला करू शकेन आणि माझं काही जरी पुण्य प्रारब्धात शेश असेल तर या अर्जवाचा नक्की विचार करावास , हे जगतपालका.
भाग ६ समाप्त .......
क्रमशः
संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment